Wednesday, May 09, 2018

आयझॅक न्यूटनचे इतर संशोधन



न्यूटनचे शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण आणि अॅक्शन रिअॅक्शन असेच अनेक लोकांना वाटते. त्यांना असलेली माहिती सफरचंद किंवा इतरही गोष्टींचे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जमीनीवर पडणे इथपर्यंतच मर्यादित असते. सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ, शनि या सगळ्यांना पृथ्वी तिच्याकडे खेचत असते आणि ते सर्व गोल पृथ्वीला तसेच एकमेकांना स्वतःकडे ओढत असतात हे बहुतेकांच्या गांवी नसते. गुरुत्वाकर्षण आणि गतिचे नियम या दोन संशोधनांमुळे न्यूटनने विज्ञानाच्या विकासाला चालना दिल्यामुळे त्याला खूप उंचीवर नेऊन ठेवले असले तरी न्यूटनने केलेले इतर विषयांमधील, विशेषतः गणितातील  संशोधनसुद्धा अत्यंत महत्वाचे आहे.

सर आयझॅक न्यूटन या महान शास्त्रज्ञाचा जन्म १६४२ मध्ये  इंग्लंडमधल्या एका लहान गावात झाला. त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि ते  तीन वर्षाचे असतांनाच त्यांच्या आईने दुसरे लग्न केले आणि ती तिच्या दुसऱ्या नवऱ्याकडे रहायला गेली. त्यामुळे त्यांचे संगोपन आणि शालेय शिक्षण त्यांच्या आजीने तिला जमेल त्याप्रमाणे केले. कांही वर्षांनंतर न्यूटनची आई विधवा होऊन परत आली आणि तिने आयझॅकला शेतीकडे लक्ष द्यायला सांगितले. अशा परिस्थितीत न्यूटनला लहानपणीच अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. कॉलेजच्या शिक्षणासाठी पडतील ती लहान सहान कामे करून त्याने ते सुरू ठेवले. पुढे त्याच्या हुषारीमुळे त्याला चांगली शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने एमए पर्यंतचे शिक्षण सुरळीतपणे पूर्ण केले.

 गणित हा विषय न्यूटनच्या अत्यंत आवडीचा होता. या विषयाला त्याने वाहून घेऊन त्याच्या निरनिराळ्या शाखांमध्ये प्रावीण्य मिळवलेच, त्यातल्या प्रत्येक शाखेत त्याने नवी भर टाकली.  त्याच्या आधी होऊन गेलेल्या पास्कल आदि शास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारांच्या आधाराने त्याने सर्वंकष स्वरूपातला बायनॉमियल थिरम मांडला. क्ष अधिक य अशा दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग, घन इत्यादि कितीही घातांकाचे मूल्य या सूत्राचा उपयोग करून काढता येते. त्यातली एक संख्या मोठी म्हणजे १००० यासारखी असली आणि त्यात १, २ किंवा ३ अशी एकादी लहान संख्या मिळवली तर १००१, १००२, १००३ अशी बेरीज येईल. त्या बेरजेचा वर्ग किंवा घन केला तर तो १००० या संख्येच्या वर्ग किंवा घनाहून किती प्रमाणात मोठा असतो अशा प्रकारची बरीच आकडेमोड करून त्यातून त्याने निश्चित असे निष्कर्ष काढले. एकाद्या चौरसाची किंवा चौकोनी ठोकळ्याची एक बाजू किंचित म्हणजे १ किंवा २ सहस्रांशपटीने इतकी वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किंवा ठोकळ्याचे घनफळ किती सहस्रांशपटीने वाढेल अशा प्रकारच्या गणितात त्याचा उपयोग होतो. न्यूटनने याला वाढीचे शास्त्र असे नाव दिले होते. त्या अभ्यासामधूनच कॅल्क्युलस या गणिताच्या नव्या शाखेचा उदय झाला.   

न्यूटनच्या आधी होऊन गेलेल्या कोपरनिकस, गॅलिलिओ आणि केपलर या शास्त्रज्ञांनी सूर्य आणि ग्रह यांच्या आकाशात दिसणाऱ्या भ्रमणाचे सूक्ष्म निरीक्षण करून खगोलशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता, त्यावरून खूप माहिती गोळा करून ठेवली होती, त्याच्या आधाराने सूर्यमालिकेची कल्पना मांडली होती.  केपलरने तर ग्रहांच्या सूर्याभोवती होणाऱ्या परिभ्रमणाविषयी काही महत्वाचे नियम सांगितले होते. न्यूटनने त्यांचा सखोल अभ्यास केला, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची जोड देऊन ते नियम गणितामधून सिद्ध केले आणि विश्वाच्या केंद्रस्थानी पृथ्वी नसून पृथ्वीसहित सारे ग्रहच सूर्याभोवती फिरतात या त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांवर पक्के शिक्कामोर्तब करून त्यावर कायमचा पडदा पाडला. पाश्चिमात्य देशातल्या सर्व विद्वांनांनी ते मान्य केले. गुरुत्वाकर्षण आणि गतिविषयक नियम यांवर न्यूटनने केलेल्या संशोधनाची माहिती मी याआधीच्या दोन लेखांमध्ये विस्ताराने दिली आहे. त्याने या व्यतिरिक्त विज्ञानाच्या इतर शाखांमध्येसुद्धा आपला ठसा उमटवला होता.

प्रकाशिकी (ऑप्टिक्स) या विषयावर न्यूटनने भरपूर संशोधन केले. पांढऱ्या शुभ्र सूर्यप्रकाशात सात रंग असतात आणि प्रिझममधून तो प्रकाश आरपार जातो तेंव्हा अपवर्तनामुळे (रिफ्रॅक्शन) ते रंग वेगळे होतात इतकेच नव्हे तर त्यांना एका भिंगामधून पुन्हा एकत्र आणून पांढरा प्रकाश निर्माण करता येतो हे त्याने प्रयोगामधून दाखवून दिले.  भिंगांमधून प्रकाशकिरण जात असतांना अपवर्तन होते ते टाळण्यासाठी त्याने परावर्तनी दुर्बीण (रिफ्लेक्टिव्ह टेलिस्कोप) तयार केली आणि त्यामधून आकाशातल्या ताऱ्यांचे अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ निरीक्षण केले. न्यूटनने एका अंधाराने भरलेल्या खोलीत निरनिराळ्या रंगीत वस्तू ठेऊन त्यांच्यावर निरनिराळ्या रंगांचे प्रकाशझोत टाकले आणि त्या प्रकाशात त्या कशा वेगळ्या दिसतात हे पाहून असा निष्कर्ष काढला की रंगीत वस्तू विशिष्ट रंगाचे प्रकाशकिरण जास्त प्रमाणात परावर्तित करत असतात. तो पदार्थ आणि त्यावर पडणारे प्रकाशकिरण या दोन्हींच्या संयोगाने त्याचा रंग ठरतो. याला न्यूटनचा रंगाचा सिद्धांत असे म्हणतात. अतिसूक्ष्म अशा कणिकांपासून (कॉर्पसल्स) प्रकाशकिरण तयार होतात असे न्यूटनने सांगितले होते. त्या तत्वानुसार प्रकाशाचे परावर्तन आणि अपवर्तन या दोन्ही गुणांचे स्पष्टीकरण देता येत होते. पुढील काळात प्रकाशाच्या लहरी असतात हे सिद्ध करण्यात आले आणि क्वॉँटम थिअरीनुसार तो एकाच वेळी लहरी आणि कणिका अशा दोन्ही स्वरूपात असतो असेही सांगितले गेले.

प्रकाश हे जसे ऊर्जेचे एक रूप आहे त्याचप्रमाणे ऊष्णता हे दुसरे एक रूप आहे. न्यूटनने यावरसुद्धा संशोधन केले.  अत्यंत तापलेला पदार्थ अधिक वेगाने निवतो पण कोमट पदार्थ हळूहळू थंड होतो या निसर्गाच्या नियमाचे पद्धतशीर संशोधन करून न्यूटनने तो एका समीकरणाच्या स्वरूपात असा मांडला. "वस्तूचे तापमान बदलण्याचा वेग त्या वस्तूचे तापमान आणि सभोवतालच्या वातावरणाचे तापमान यांच्यामधील फरकाच्या समप्रमाणात असतो." बर्फासारखे थंडगार पाणी किंवा उकळते पाणी भांड्यांमध्ये भरून ठेवले तर ते किती वेळात सामान्य तापमानावर येऊन पोचेल याचे गणित या नियमानुसार करता येते.

पृथ्वीचा आकार सपाट नसून गोलाकार आहे हे न्यूटनच्या आधीच्या काळातच सर्वमान्य झालेले होते. पण तो चेंडूसारखा नसून त्याचा विषुववृत्ताजवळचा मध्यभाग फुगीर आहे आणि दोन्ही ध्रुवांकडचा भाग चपटा आहे असे न्यूटनने सांगितले. अशा प्रकारचे अनेक विचार किंवा शोध त्याने जगाला दिले.

न्यूटनच्या जीवनकालातच इंग्लंडमध्ये काही राजकीय उलथापालथी झाल्या होत्या पण त्याची प्रत्यक्ष झळ त्याच्या संशोधनाला फारशी लागली नाही. त्याच कालावधीत इंग्लंडमध्ये तसेच जर्मनीसारख्या पाश्चात्य देशांमध्येसुद्धा इतर अनेक शास्त्रज्ञ गणित आणि भौतिकशास्त्रावर संशोधन करत होते. त्यामुळे न्यूटनने लावलेल्या  कांही शोधांवर आणखी काही शास्त्रज्ञांनी ते लावले असल्याचा दावा केला आणि त्यावर वादविवाद होत राहिले. त्या काळातली संपर्कसाधने आजच्यासारखी वेगवान नसल्यामुळे प्रकाशित झालेल्या पुस्तकांशिवाय इतर काही मार्ग नव्हते. ती पुस्तकेसुद्धा लॅटिनसारख्या सामान्य लोकांना अगम्य भाषेत असायची आणि ती सहजासहजी उपलब्ध होण्यासारखी नव्हती. कोणत्या शास्त्रज्ञाने कोणत्या काळात नेमके काय लिहून ठेवले आणि त्याने ते स्वतंत्रपणे सांगितले की दुसऱ्याने लिहिलेले वाचून सांगितले हे ठरवणे कठीणच आहे आणि आता त्यामुळे कांही फरक पडत नाही. कोणाच्या का प्रयत्नाने होईना, विज्ञानामध्ये भर पडत गेली हे महत्वाचे आहे.  न्यूटनच्या संशोधनांचा एकंदर आवाका पाहता त्यानेच त्यात प्रमुख भाग घेतला असणार असे वाटते.

न्यूटनची अनेक महत्वाच्या पदांनर नेमणूक करण्यात आली होती. शास्त्रीय संशोधनासाठी काम करणाऱ्या रॉयल सोसायटीवर तर त्याने अनेक पदे भूषवली पण सरकारी टांकसाळीसारख्या जागासुद्धा सांभाळल्या आणि त्या काळात तयार करण्यात आलेल्या नाण्यांची गुणवत्ता सुधारली. सार्वजनिक क्षेत्रात अनेक मानाची स्थाने भूषवली, त्यात खासदारपदसुद्धा होते. तो मनाने धार्मिक प्रवृत्तीचा होता आणि त्याने धर्मगुरूंना दुखावले नाही. एवढेच नव्हे तर त्याचा अतींद्रिय अद्भुत शक्ती किंवा चमत्कार यांचेवरसुद्धा विश्वास होता आणि त्याने बराच काळ कृत्रिमरीत्या सोने तयार करणाऱ्या परीसाचा शोध घेण्यातही घालवला होता. त्या प्रयत्नात त्याने रसायनशास्त्रातसुद्धा काम केले होते. तीनशे वर्षांपूर्वीच्या काळात हे अनपेक्षित नव्हते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास सर आयझॅक न्यूटन हे एक अतीशय बुद्धीमान, अभ्यासू, कष्टाळू आणि कल्पक असे संशोधक होऊन गेले. गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी मौलिक शोध लावले. प्रायोगिक आणि सैद्धांतिक अशा विज्ञानाच्या दोन्ही बाजू त्यांनी उत्तम सांभाळल्याच, आपले संशोधन अत्यंत व्यवस्थितपणे सादर करून त्याला विद्वानांकडून मान्यता मिळवली. बुद्धीमत्तेच्या बाबतीत काही लोकांना न्यूटनपेक्षा आइन्स्टाइन उजवे वाटतात, पण ज्यांच्या शास्त्रीय संशोधनामुळे विज्ञानाच्या प्रगतीला प्रचंड वेग मिळाला आणि त्यामुळे जगाच्या इतिहासावर किंवा मानवजातीच्या जीवनावर परिणाम करणारी औद्योगिक क्रांति सुरू झाली अशा वैज्ञानिकांमध्ये अजूनही न्यूटनचाच पहिला क्रमांक लागतो.
--------------------------

स्मृती ठेउनी जाती - भाग १५ - सतीश भावे

आमच्या कॉलनीमधल्या बिल्डिंग्जच्या स्टिल्टमध्ये आणि रस्त्याच्या कडेला बाकडी मांडून ठेवलेली आहेत. मोकळ्या हवेत श्वास घेत घटका दोन घटका गप्पा मारत बसणारे माझ्यासारखे काही रिकामटेकडे लोक सकाळ संध्याकाळी त्यांच्यावर बसलेले दिसतात. आमच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे सतीश भावे रोज सकाळी लवकर उठून सव्वासहाच्या सुमाराला खाली उतरत असत, हातातली काठी टेकत एक एक पाऊल टाकत ते हळूहळू कॉलनीच्या गेटपर्यंत जाऊन येत आणि एका बाकड्यावर बसून विश्रांती घेत असत. चौथ्या मजल्यावरचे वैद्य कांही मिनिटांनंतर खाली उतरून त्यांना झेपेल तेवढे चालून फिरून येत आणि भाव्यांच्या शेजारी येऊन गप्पा मारत बसत. त्यांचा समवयस्क असा मी सुद्धा सकाळी साडेसहाच्या सुमाराला खाली उतरून येत असे तेंव्हा मला रस्त्यावर फिरत असलेले भावे बहुधा रोज भेटायचे आणि कधी कधी वैद्यसुद्धा. मी साडेसात वाजता परत येत असे तेंव्हा अनेक वेळा ते दोघेही बाकड्यावर बसलेले असायचे.

एकदा त्यांनी मला पाहून खूण करून बोलावून घेतले आणि आम्ही एकमेकांशी ओळख करून घेतली. त्यानंतर मीसुद्धा दहा वीस मिनिटे त्यांच्यासोबत थांबायला लागलो. भावे अत्यंत वक्तशीर होते. त्यांची घरी परत जाण्याची ठरलेली वेळ झाल्यावर ते उठून चालले जात असत पण वैद्यांना घाई नसे. ते मला थांबवून घेत आणखी कोणी येणारा जाणारा दिसला तर त्यालाही हाक मारत. वैद्य आणि भावे हे दोघेही अस्सल पुणेकर आणि चौकसपणा हा पुणेरी गुण त्यांच्या अंगी पुरेपूर भरलेला.  त्यांना इथली खडा न् खडा माहिती असायची. पुण्यातले अमूक भाऊसाहेब किंवा तमूक काकासाहेब यांच्यापासून ते त्यांचे सगळे बहीणभाऊ, काकामामा वगैरे कोण कोण कुठल्या पेठेमधल्या कोणत्या वाड्यात रहात होते आणि तिथून कुठल्या नगरातल्या कोणत्या सोसायटीत रहायला गेले वगैरे आणि ते काय काय उद्योग करत होते या सगळ्या माहितीचे ज्ञानकोष त्यांच्याकडे असल्याने ते आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून सहजपणे पुण्याच्या भूतकाळात जाऊन त्यात रमत असत. मी इथे नवखा असल्यामुळे त्यातल्या काही प्रसिद्ध माणसांची आणि कांही जागांची नांवे कधी तरी माझ्या कानावर पडली असतील एवढेच माझे ज्ञान होते. या जोडीच्या गप्पा ऐकून माझ्या पुण्याबद्दलच्या सामान्यज्ञानात खूप भर पडली.  भाव्यांचे इतर बाबतीतले सामान्य ज्ञानसुद्धा चांगले समृद्ध होते. त्यांचे  बोलणे खुमासदार असायचे, त्याला विनोदाची झालर असायची यामुळे मला ते ऐकतांना मजा वाटत असे.

ते स्वतःबद्दल मात्र फारसे बोलत नसत. त्यांच्या बोलण्यात आत्मप्रौढीचा तर लवलेशही  नसायचा. त्यांना चालतांना होत असणारे कष्ट पाहून मी एकदाच त्यांना कसला त्रास आहे असे चुकून विचारले. त्यावर त्यांनी हंसून उत्तर दिले की त्यापेक्षा कुठला त्रास नाही असे विचारा. आमच्या वयाचे इतर कांही लोक त्यांना असलेल्या किंवा नसलेल्या व्याधी आणि त्यावरील उपाय यांची चर्चा करून ऐकणाऱ्याला बेजार करतात, पण भाव्यांनी मात्र त्या विषयावर माझ्यापुढे कधीच चकार शब्दही काढला नाही. त्यांची बरीच मोठी मेडिकल हिस्टरी असावी एवढे मला जाणवत होते पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांत आणि प्रसन्न अशीच मुद्रा असायची. ते नेहमी आपल्यासोबत एक सेलफोन घेऊन येत आणि त्यावर सुरेल गाणी लावून स्वतः ऐकत आणि आम्हाला ऐकवत असत.

आमची इमारत ते कॉलनीचे गेट या रस्त्याशिवाय इतर कुठे मी भावे यांना पाहिले नाही. त्यामुळे मी त्यांना जास्त लोकांबरोबर बोलतांना पाहिले नाही. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीला त्यांची उपस्थिति नसायची. कदाचित त्यांना तेवढे चालणे झेपत नसावे, पण त्यांना अशा जनसंपर्काची आवड मात्र होती. ते आमच्या संघाचे सभासद तर झाले होतेच, त्यातल्या कांही लोकांनी सुरू केलेल्या वॉट्सअॅप ग्रुपचेही सदस्य झाले होते आणि वेळोवेळी निवडक मजेदार पोस्ट टाकत असत.

तीन चार दिवसांपूर्वी एकदा मी संध्याकाळी कुठेतरी चाललो होतो. लिफ्टमधून खाली उतरलो तर ही जोडगोळी समोरच्या बांकड्यावर बसली होती. भाव्यांनी मला हात उंचावून दाखवला आणि मी त्यांना हातानेच टाटा करीत माझ्या वाटेने पुढे गेलो. मला त्यांच्याशेजारी पांच मिनिटे बसून बोलायला पाहिजे होते, माझ्या अंतमनाला तसे वाटलेसुद्धा होते, पण तेंव्हा ते घडले नाही. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेलो नाही कारण मला एका अत्यंत महत्वाच्या समारंभाला जायचे होते. ते मंगल कार्य चाललेले असतांनाच मला वॉट्सअॅपवरून एक धक्कादायक बातमी समजली, पण ती कुणाला न सांगता मी वॉट्सअॅपच बंद करून टाकला. संध्याकाळी परत आल्याआल्याच आमच्या बिल्डिंगच्या रखवालदाराने तिला दुजोरा देत भाव्यांना वैकुंठधामात नेले असल्याचे सांगितले. दिवसभर झालेल्या दगदगीनंतर तिकडे जाण्याइतके त्राण माझ्या अंगात उरले नव्हते.

दुसरे दिवशी सकाळी साडेसहा वाजता मी रोजच्या प्रमाणेच योग वर्गाला जाण्यासाठी म्हणून घरामधून निघालो आणि लिफ्टमधून खाली उतरलो. तळमजल्यावरील लिफ्टच्या बाजूला असलेल्या कोलॅप्सिबल गेटच्या बाहेर एक पेपरवाला वर्तमानपत्रांचा गठ्टा घेऊन उभा होता आणि आतल्या बाजूला आमचे वैद्य आजोबा उभे होते. गेटला लावलेले कुलुप कोणीतरी येऊन उघडेल याची ते वाट पहात होते. त्यांच्याशी नजरानजर होताच आम्हा दोघांचेही डोळे पाणावले. रोज पहाटे आम्हा दोघांच्याही आधी उठून फिरायला जाण्यासाठी बाहेर पडणारे आमचे मित्र भावे आज खाली उतरले नव्हते आणि  . . .  ते यापुढे कधीच उतरणार नव्हते. कोणाच्याही ध्यानी मनी नसतांना ते आमचा कायमचा निरोप घेऊन, किंबहुना कुणाचाही निरोप न घेताच, काल अचानक देवाघरी चालले गेले होते. 

भावे यांचा बहुश्रुतपणा आणि त्यांचे संगीताचे प्रेम मला ठाऊक होते, पण त्याबद्दल जास्त माहिती त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याने फेसबुकवर वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून मला मिळाली. त्यातला काही भाग मी खाली दिला आहे. आमचे जे काही बोलणे झाले ते रस्त्यावर उभ्याउभ्या किंवा बाकड्यावर बसून झाले. ते शरीराने अपंग झाले होते, कुठे जात येत नव्हते, पण मग मीच पुढाकार घेऊन त्यांच्या घरी गेलो असतो, त्यांच्याबरोबर अधिक जवळीक केली असती तर त्यांच्या अमूल्य खजिन्यातली काही रत्ने पहायची संधी मिळाली असती.  आता असा विचार करून काही उपयोग नाही. सतीश भावे तर त्यांच्या आठवणी मागे ठेऊन  पुढच्या प्रवासाला चालले गेले आहेत.
---------------------------------------------------------------------------------

पराधीन आहे जगती.....

 एखाद्या व्यक्तीशी आपण जिवाभावाचे बोलतो आणि पुढच्या पंधरा मिनिटांनी ती व्यक्ती या जगाचा कायमचा निरोप घेते हे सत्य स्वीकारण्याच्या पलीकडचे होते, अनाकलनीय होते. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या एका वाक्यात ग दि मां नी वर्णन केलंय पण ते पचनी पडणे अवघड ! ज्यांच्याशी आपले भावबंध निर्माण झालेले असतात त्यांचे जाणे मनाला चटका देऊन जाते.

मी सात वर्षे सकाळ मध्ये नोकरी केली तेंव्हा भावेसाहेब माझे वरिष्ठ अधिकारी होते. सात वर्षे त्यांचा जवळून सहवास लाभला. आमचे भावेसाहेब म्हणजे पु लं चे रावसाहेबच ! वाक्याची सुरुवात शिवीशिवाय करणार नाहीत, पण या सर्व शिव्या प्रेमाच्या. कधी बोचल्या नाहीत, टोचल्या नाहीत. उलट त्या शिव्यांमुळेच आम्ही ' सकाळ' चे सर्व माजी कर्मचारी त्यांच्यावर प्रेम करायचो. हेवी डायबिटीसमुळे त्यांच्या शरीराला कधी साखर चालायची नाही पण जिभेवरच्या साखरेने मात्र त्यांनी सर्वाना आपलेसे केले होते. कधी कोणत्या कर्माचा-यावर रागावले नाहीत कारण प्रेमाच्या शिव्यांनी सर्व कामे आपसूक होऊन जायची. मधुमेहाने ते खरे तर आयुष्यभर बेजार झाले होते. रोज एक इंजेक्शन घेतल्याशिवाय त्यांना नास्ता, जेवण करताच यायचे नाही. त्यामुळे रोज तीन तीन वेळा स्वतः इन्श्युलीन टोचून घ्यायचे. पण आयुष्याच्या आनंदाला त्यांनी कधीही दूर लोटले नाही. विविध प्रकारची पेन्स गोळा करण्याचा त्यांना छंद होता. कोणतेही वेगळे पेन दिसले की ते विकत घेत. आजपर्यंत तीनेक हजार पेन्स त्यांनी नक्कीच जमवली असतील. शिवाय. ते स्वतः गायक नसले तरी शास्त्रीय संगीताचा त्यांचा अभ्यास होता. दरवर्षीचा सवाई गंधर्व महोत्सव कधी चुकवला नाही. प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, किशोरी आमोणकर, रशीद खान आणि पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे आवडते कलाकार ! त्यांच्या असंख्य कॅसेट आणि सीडीज त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर हा माणूस सतत संगीतात हरवलेला असायचा. मधुमेहामुळे असंख्य व्याधींनी शरीरावर ताबा मिळवला होता पण मनावर मात्र संगीताने अधिराज्य गाजवत व्याधींची तीव्रता कमी केली होती. इतकी दुखणी असूनसुद्धा हा माणूस कधी निराश झालेला दिसला नाही. त्या दुखण्याला दोन शिव्या हसडून मनातली वेदनेची भावना बाहेर फेकून देत असत. त्यामुळे त्यांचे जीवन तर सुसह्य झालेच शिवाय मृत्यूनेसुद्धा दबक्या पाऊलानेच झडप घातली. असा अचानक मृत्यू फार कमी भाग्यवंतांना येतो.

अरुण दाते या " तानसेनाच्या " जाण्याने काल संगीत क्षेत्राचे न भरून येणारे नुकसान झाले. आणि भावे साहेब यांच्यासारख्या " कानसेनाच्या " जाण्याने झालेले नुकसान सुद्धा माझ्यादृष्टीने मोठे आहे !

हरी ओम !

अभय देवरे