Tuesday, July 18, 2017

सिंहगड रोड - भाग ४


मध्यप्रदेशातले आमचे एक आप्त पाच सहा वर्षांपूर्वी स्थाईक होण्याच्या विचाराने पुण्याला आले. त्यांच्यासाठी सोयिस्कर घर शोधतांना त्यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून तिथे बांधल्या जात असलेल्या अनेक संकुलांमधील इमारतींची पाहणी केली. त्यांच्या सर्व गरजा भागवण्याइतक्या सुखसोयी असणारे आणि त्यांच्या बजेटमध्ये बसणारे असे धायरी भागात बांधले जात असलेले एक घर त्यांनी विचारपूर्वक निवडून पक्के केले. त्या वेळी आम्ही मुलाकडे पुण्याला आलो होतो आणि वारजेजवळील आदित्य गार्डन सिटीमध्ये रहात होतो. तिथून बंगलोर हायवेवरून जाऊन मुठा नदी ओलांडली की वडगाव लागते आणि तिथून सिंहगड रोडने पुढे गेले की धायरी, म्हणजे ती जागा वारजेपासून फक्त पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर असणार असे आम्हाला आधी वाटले आणि आम्ही उत्साहाने ती जागा पहायला गेलो. पण नदी ओलांडून पलीकडे गेल्यानंतर लगेच एक फ्लायओव्हर सुरू झाला आणि तो काही नाले आणि वाटा यांच्यावरून जात सिंहगड रोडला सुध्दा ओलांडून पलीकडे दूर जाऊन पोचला. हायवेच्या डाव्या बाजूलाच सिंहगड रोडला जोडणारा रस्ता एक रस्ता होता, पण तो फक्त तिकडून हायवेकडे येणा-या वाहतुकीसाठी एकेरी करून ठेवलेला असल्याने आमच्या उपयोगाचा नव्हता. त्यामुळे आम्ही कात्रजच्या दिशेने आणखी पुढे गेलो आणि पुढल्या फ्लायओव्हरच्या खालच्या कमानीखालून हायवे ओलांडला. तिथून यू टर्न घेऊन वारजेच्या दिशेने परत आल्यावर सिंहगड रोडला जाऊन मिळणारा दुसरा रस्ता घेतला. अशा रीतीने ज्या पॉइंटला आम्ही हायवेवरून सिंहगड रोड ओलांडला होता तिथून दीड दोन मैलांचा फेरा घालून पुन्हा त्याच ठिकाणी खालून जाणा-या सिंहगड रोडला येऊन लागलो.

सिंहगड रोडवर खूप ट्रॅफिक जॅम होता. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे सरकत गेल्यावर त्याचे कारण समजले. तिथे एका उड्डाणपुलाचे बांधकाम चालले होते. त्यासाठी अर्धा रस्ता खणून ठेवला होता आणि दोन्ही बाजूची वाहतूक उरलेल्या रस्त्यातून कशीबशी होत होती. धायरी फाट्यावर तर सगळा सावळागोंधळ होता. बांबूच्या स्कॅफोल्डिंगमधून वाट काढत वळणारी वाहने आडवी तिडवी येऊन रस्ता जास्तच अडवीत होती. कसेबसे आम्ही धायरीच्या वाटेला लागलो तेंव्हा तो रस्तासुध्दा वाहनांनी फुललेला होताच. आम्ही आता मुंगीच्या पावलांऐवजी गोगलगाईच्या गतीने सरकायला लागलो. कुठल्या गल्लीत वळायचे हे आम्हाला नेमके माहीत नव्हते. खुणेचे गणपतीचे देऊळ शोधता शोधता थोडे पुढेच गेलो आणि मागे वळून परत आल्यानंतर जे के हिल पार्कचा फलक दिसला. तिकडे जाणारी गल्ली मात्र संपूर्णपणे मोकळी होती. पण तिथे पोचेपर्यंत चांगला सव्वादीड तास वेळ लागला होता.

या वसाहतीमध्ये हिल म्हणजे टेकडी नव्हतीच, उलट थोडा उतार होता आणि पार्क किंवा बागेच्या नावाने फक्त कुंपणावर एका रांगेत लावलेली शोभेची झाडे होती. लांबट आकाराच्या त्या प्लॉटमध्ये दहा टोलेजंग इमारतींचे अजस्र चौकोनी ठोकळे एका सरळ रेषेत उभे करून ठेवले होते. त्यातल्या जवळ जवळ शेवटच्या इमारतीत आम्हाला जायचे होते. तोंपर्यंत अंधार पडायला लागला होता. इमारतीचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसल्यामुळे लिफ्ट बसवली नव्हती, जिन्याच्या पाय-यांवर लादी नव्हती, जिन्याचे कठडेही नव्हते, दिवे तर नव्हतेच. आम्ही अंधारात चाचपडत सिमेंटच्या पाय-यांवरून दोन मजले चढून वर गेलो. तिथे पुन्हा दोन्ही बाजूंना जाणा-या दोन बोळकंड्या होत्या आणि त्यांच्या दोन बाजूंना प्रत्येकी दोन दोन फ्लॅट असे एकूण आठ फ्लॅट होते. त्यातल्या टोकाच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो.

त्या घराच्या भिंती उभारल्या होत्या, पण त्यांना दरवाजे आणि खिडक्या नव्हत्या. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी आत शिरून सगळीकडे ओल झालेली होतीच, त्यात सिमेंट आणि माती मिसळलेली होती. पँट दुमडून आणि हाताने थोडी वर धरून आम्ही आपला तोल सांभाळत आत शिरलो.  आमच्या आप्तांनी माहिती सांगायला सुरुवात केली, "हा हॉल, हे किचन, या बेडरूम्स, इथे टॉयलेट्स" वगैरे वगैरे. त्या घराला दोन प्रशस्त बाल्कन्या होत्या, पण तिथे बरेच पाणी साठलेले होते आणि निसरड्या जमीनीवर पाय घसरून पडण्याची खात्री होती. यामुळे आम्ही तिकडे जाऊन पाहण्याचे धाडस केले नाही. "त्या बाल्कनीमधून दिसणारे दृष्य फार मोहक असते, आधी दूरवर पसरलेली निसर्गरम्य शेते, झाडेझुडुपे वगैरे आणि पलीकडे डोंगरांच्या रांगा, त्यांच्याच एका बाजूला नांदेडसिटीमधले गगनचुंबी टॉवर्स आणि टेकडीवर वसवलेले डी एस के विश्व ..." वगैरेंचे रसभरीत वर्णन माझ्या आप्तांनी केले. त्यांना तो फ्लॅट आवडला होताच. मी यापूर्वी राहिलेलो असलेल्या प्रशस्त घरांच्या तुलनेमध्ये तो माझ्या पसंतीला उतरत नसला तरी मी सुध्दा त्यांच्या होकारात होकार मिळवत आणि त्या जागेची तोंडदेखली स्तुति करत राहिलो.

वारजेला परत येतांना पुन्हा एकदा सिंहगड रोडवरील त्या ट्रॅफिकमधून मुंगीच्या पावलांनी सरकत जाण्याचे दिव्य तर करावे लागलेच, पण तिथून परत जातांनासुध्दा सरळ हायवेला जोडणारा रस्ता नव्हताच. आता हायवेच्या पुलाखालून आधी पलीकडे गेलो, तिथून उलट कात्रजच्या दिशेने मैलभर जाऊन दुसरा फ्लायओव्हर गाठला, त्या ठिकाणी हायवेच्या पुलाखालून पुन्हा अलीकडे आलो आणि हायवेवर चढून आमच्या मार्गाला लागलो. या भागातल्या रस्त्यांचे नियोजन करणारा इंजिनियर बहुधा सातारा किंवा क-हाडचा असावा. तिकडच्या बाजूने हायवेने आल्यास थेट सिंहगड रोडला जोडणारे रस्ते होते तसेच सिंहगड रोडवरून थेट त्या दिशेने जाण्याची सोय होती, पण वारजे, वाकडच्या बाजूला राहणा-या आमच्यासारख्या लोकांना मात्र येतांना आणि जातांना अशा दोन्ही वेळा दोन दोन मैलांचा वळसा घालावा लागत होता.

काही महिन्यांनंतर ती इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आमची आप्त मंडळी तिथे रहायला गेली. त्यांना भेटायला आम्ही पुन्हा सिंहगड रोडवरून धायरीला गेलो. आता ती इमारत रंगरंगोटी करून बाहेरून छान दिसत होतीच, आतमध्ये दिव्यांचा झगमगाट होता, अंतर्गत सजावटीने तो फ्लॅट आता सुरेख दिसत होता. बाल्कनीमधून दिसणारे सृष्टीसौंदर्य लोभसवाणे होते, त्यांनी घरातल्या सगळ्या सुखसोयी करून घेतलेल्या होत्याच. धायरी गावाच्या मुख्य रस्त्यापासून तो पुरेसा दूर असल्यामुळे तिथल्या रहदारीचा गोंगाटगलका ऐकू येत नव्हता, पण त्या रस्त्यावर सगळ्या प्रकारची दुकाने असल्यामुळे कुठल्याही जीवनावश्यक वस्तूची गरज पडली तर चालत जाऊन पंधरा वीस मिनिटात आणि वाहनाने गेल्यास पाच मिनिटात ती मिळण्याची सोय होती. तिथून पुणे शहराकडे अनेक बसेस जात होत्या, एकापाठोपाठ एक रिक्शा दिसत होत्या. आमचे नातेवाईक त्या जागेवर बेहद्द खूष झालेले दिसत होते.

सिंहगड रोडवरील धायरी फाट्याच्या कोप-यावर बांधलेला फ्लायओव्हर बांधून पुरा झाला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरची रहदारी थोडीशी सुधारली होती, पण गंमत अशी होती की त्या फ्लायओव्हरवरून पुढे खडकवासल्याकडे जाणारी वाहने अगदी कमी आणि धायरीकडे वळणारीच जास्त असा प्रकार होता. त्यामुळे त्या अरुंद वाटेत खूप गर्दी झाली होती. हायवेवरून सिंहगड रोडकडे जाणारा एक शॉर्टकट निघाला होता, पण झाडाझुडुपांमधून आणि ओढेनाल्यांमधून वाट काढत वळत वळत जाणारा तो कच्चा रस्ता अगदीच जुनाट ग्रामीण भागातला वाटत होता. वाटेत एका जागी तर अशी परिस्थिती होती की तिथून फक्त चिटपाखरेच दिसत होती. एकसुध्दा माणूस किंवा वाहन दृष्टीपथात नव्हते. रात्रीच्या अंधारात तर त्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्याने जाणे शक्यच नव्हते. त्यापेक्षा दोन मैलांचा वळसा घेतलेला बरा होता. सिंहगड रोडवरील धायरीला जाण्यासाठी या सगळ्या दिव्व्यांमधून जावे लागल्यामुळे मला ती जागा मनापासून विशेष आवडली नाही. आपण स्वतः सुध्दा तिथे रहायला जावे असा विचार त्यावेळी मनाला शिवला नाही.  

धायरीमधल्या त्या घराच्या खिडकीमधून दूर डोंगरावर वसलेले डीएसके विश्व दिसताच माझ्या मनात दडलेली एक जुनी आठवण जागी झाली. माझ्या हैदराबादच्या आतेभावाने सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्याला स्थायिक व्हायचे ठरवले होते तेंव्हा डीएसके विश्वामध्ये घर घेतले होते. मुख्य शहरापासून बरेच दूर असलेल्या एका मोठ्या टेकडीच्या माथ्यावरील माथेरानसारख्या रम्य वातावरणात ती जागा आहे, निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या अनेक उंच इमारतींमधून हे स्वर्गासारखे स्वयंपूर्ण विश्व वसवले आहे, तिथे सगळ्या सुखसोयी आहेत, पण शहरातला गोंगाट नाही वगैरे त्याचे रसभरीत वर्णन त्याने मागे एकदा तो कुठेतरी भेटला असतांना सांगितले होते. ती स्वर्गसम जागा नेमकी कुठे आहे हे मात्र तेंव्हा माझ्या लक्षात आले नव्हते. सिंहगड रोड हा पुण्याकडून तिथे जायचा रस्ता आहे हे ही मला त्या वेळी समजले नव्हते. या वेळी त्याचे जे दुरून दर्शन घडले ते मात्र सिमेंट काँक्रीटच्या जंगलासारखेच वाटले.

मी पहिल्यांदा सिंहगड रोड पाहिला तेंव्हा तिथल्या भिडे बागेत गेलो होतो. तो रस्ता काही खास वाटला नव्हता, पण ती बाग मला खूप आवडली होती. त्या दिवसाच्या अनेक गोड आठवणींमध्येच एक वेगळी आठवणही होती. त्या उपवनातल्या निसर्गाला न शोभणारे असे काही पुणेरी फलक जागोजागी लावलेले होते आणि त्यावर "झाडांवर चढू नये", "फुले तोडू नये" यासारखे अनेक नियम आणि ते न पाळल्यास त्याची काय फळे भोगावी लागतील याचा इशारा वगैरे बराच मजकूर होता. त्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तत्पर रक्षक आणि रक्षिका तैनात केल्या गेल्या होत्या. आम्ही सगळे सुशिक्षित, सुसंस्कृत, सूज्ञ वगैरे लोक असल्यामुळे ते बोर्ड न वाचताच तसे शहाण्यासारखे वागत होतो. पण अवखळ लहान मुलांना मात्र तिथे बागडायला शब्दशः मोकळे रान मिळाले होते. त्यांना निसर्गतःच निसर्गाचे जास्तच आकर्षण असते. त्यांना झाडाझुडुपांबरोबर लगट करायला आवडते. एकाद्या लहानग्या मुलाने किंवा मुलीने कुंपणावरच्या झुडुपाचे पान जरी तोडले तरी लगेच कोणी तरी येऊन तिचा कान पकडायचा, तिने भोकाड पसरले की तिची आई धावत यायची, मग तिला चार शब्द सुनावले जायचे, तिचा मूड गेल्यामुळे तिने आणखी दोघातीघींच्या मूडवर विरजण घालायचे असे प्रकारही होत होते.

या वेळी धायरीला जातांना मी भिडे बाग कुठे दिसते हे लक्ष देऊन पहात होतो. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे जात असल्याने ती माझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. तरीही मला ती कुठे दिसलीच नाही. त्या भागात एक मोठा मॉल उभाारलेला होता आणि तिकडे जाण्यासाठी दोन, तीन व चार चाकी वाहनांची रीघ लागली असल्यामुळे ट्रॅफिक जॅम जास्तच वाढला होता. या अभिरुची मॉलमुळे अनेक लोकांची खूप सोय झाली होते हे अगदी खरे असले तरी पूर्वीची सुंदर भिडे बाग नाहीशी झाल्याची हळहळही वाटली. जिथे पानालासुध्दा धक्का लागलेले खपवून घेतले जात नव्हते तिथली सगळी झाडे, संपूर्ण बागच उध्वस्त केली केली गेली होती आणि त्या जागेवर एक काँक्रीटचा अवाढव्य आणि बेढब ठोकळा उभा केला होता !
----------------------------------- (क्रमशः)


No comments: