Wednesday, December 26, 2012

आपल्या रक्तात काय काय असते? रक्ताची तपासणी

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग १

माणसाचे आईवडील, बहीणभाऊ आणि मुले यांच्याबरोबर असलेले नाते रक्ताचे नाते असते. आनुवंशिकतेमधून त्यांच्यात काही समान गुण आलेले दिसतात. त्याची शरीरयष्टी, बुध्दीमत्ता, स्वभाव, हावभाव वगैरे गोष्टी त्याला जीन्समधून मिळाल्या आहेत असे सांगतात. "ते त्याच्या रक्तातच आहे" असेही अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. संस्कारातून मिळालेले किंवा प्रशिक्षणातून अंगात बाणवलेले गुणसुध्दा "रक्तात भिनले आहेत" असे म्हंटले जाते.  प्रेमळ, शांत, धीरगंभीर वृत्ती, वाक्चातुर्य, खंबीरपणा, निर्भयता, धडाडी, निर्भीडपणा, विनय यासारखे चांगले गुण किंवा हटवाद, अरेरावी, धांदरटपणा, धरसोड, घाई, कचखाऊपणा, बुजरेपणा, विघ्नसंतोषी वृत्ती यासारखे दुर्गुण कुणाकुणाच्या रक्तातच आहेत असे म्हंटले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते.

ठेच लागणे, खरचटणे वगैरे गोष्टी लहान असतांना रोजच घडायच्या आणि त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात झालेल्या जखमेमधून लालभडक रंगाचे रक्त बाहेर पडते एवढी माहिती आपोआपच कळत गेली. शरीरात सर्वत्र असलेले हे रक्त कुठेही स्थिर नसते, शरीराच्या सगळ्या भागांमधून ते सारखे हृदयाकडे जात असते आणि तिकडून फुफ्फुसात जाऊन तिथे शुध्द होऊन हृदयात परत येते आणि त्यानंतर ते पुन्हा शरीरभर पसरते या क्रियेला 'रक्ताभिसरण' म्हणतात ही माहिती शालेय शिक्षणात मिळाली. त्याच बरोबर रक्तामध्ये तांबड्या आणि पांढऱ्या पेशी असतात वगैरेही समजले.

माझ्या लहानपणी आमच्या लहान गावात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी नव्हती. बहुतेक लोकांनी हे शब्दच मुळी ऐकले नव्हते. तिथले डॉक्टर लक्षणे पाहूनच रोगाची चिकित्सा आणि उपचार करायचे. आमच्या घरातले कोणीही रक्त तपासून घेण्यासाठी मोठ्या शहरातल्या दवाखान्यात गेले होते असे मी लहानपणी कधी ऐकले नाही. मला नोकरीला लागल्यानंतर आमची वैद्यकीय तपासणी झाली त्या वेळी माझ्या रक्ताची पहिली चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट मला मिळालाच नाही, पण माझी नोकरी शाबूत राहिली म्हणजे त्यात काही आक्षेपार्ह असे सापडले नसणार.

आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तेंव्हा तिथे एक सुसज्ज असे हॉस्पिटल बांधले गेले होते. त्यात पॅथॉलॉजीचा सेक्शनसुध्दा होता. घरातल्या कोणाला अचानक सडकून ताप भरला किंवा कोणाला आलेला ताप, खोकला वगैरे रेंगाळत राहिले तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाई, पण तो रिपोर्ट थेट आमच्या फायलीत जाई आणि तो वाचण्याची परवानगी फक्त डॉक्टरांनाच होती. त्या तपासणीमध्ये कुठल्या रोगाचे जंतू मिळतात ते पाहिले जात असेल असे सुरुवातीला मला वाटायचे. का कोणास ठाऊक पण पूर्वीच्या काळात आमच्या रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला पहायलाही मिळत नसे. एकाद्या ओळखीच्या डॉक्टरने मोठी मेहेरबानी करून तो दाखवलाच तरी बीएसएफ, पीपी, पीसी असली अक्षरे आणि त्यांच्या समोर लिहिलेले आकडे यांमधून काही बोध होत नसे आणि तो समजावून सांगणे हा डॉक्टरच्या ड्यूटीचा भाग नव्हता. पण ही अक्षरे जंतूबिंतूंची नावे असणार नाहीत असे मात्र वाटायचे.

चाळिशीत आल्यानंतर एकदा मी अलकाला घेऊन आमच्या दवाखान्यात गेलो होतो. तिला तपासल्यानंतर डॉक्टरांनी एक चिटोरे आमच्या हातात दिले आणि पॅथॉलॉजीमध्ये जाऊन रक्ताचे सँपल देऊन यायला सांगितले. त्यानंतर माझ्या किंचित स्थूलपणाकडे झुकलेल्या देहाकडे पहात मला विचारले, "तुमच्या बॉडीची केमिस्ट्री कशी आहे?"
माझ्या तोंडावरले प्रश्नचिन्ह पाहून विचारले, "तुमची लेटेस्ट ब्लडटेस्ट कधी झाली आहे?"
मी सांगितले, "मला तर आठवत नाही. तुम्ही जरा फाइलमध्ये बघा."
त्यांनी चारपाच पाने चाळून पाहिली, त्यात काही सापडले नाही हे पाहून आणखी एक चिटोरे लिहून माझ्या हातात दिले आणि अलकाबरोबर माझ्या रक्ताचेही सँपल देऊन यायला सांगितले.

मी धडधाकट असतांना दिलेल्या रक्तात डॉक्टरांना काय सापडणार आहे असाच विचार करत दोन दिवसांनी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. माझा रिपोर्ट पाहून ते एकदम म्हणाले, "तुम्हाला आता आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे आणि नियमितपणे थोडा व्यायामही करायला पाहिजे."

मी म्हंटले, "हे तर सगळेच सांगतात. मी सुध्दा इतर लोकांना सांगतो. या रिपोर्टवरून तुम्हाला हे सांगावंसं का वाटलं?"
"कारण तुमच्या रक्तातलं साखर आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण लिमिटच्या बाहेर गेलं आहे."
"पण मला तर तसं काही वेगळं जाणवत नाही. खरं तर मला कसला म्हणजे कसलाच त्रास होत नाही."
"या दोघांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यांची लक्षणं स्पष्टपणे दिसायला लागतात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. सुदैवाने तुम्हाला एक वॉर्निंग लवकर मिळाली आहे. आताच प्रयत्न केलात तर त्यांना आटोक्यात आणता येईल."

डॉक्टरांचा सल्ला मनावर घेऊन मी तोंडावर शक्य तेवढा ताबा ठेवायला आणि जमतील तेवढे हातपाय हलवायला सुरुवात केली. महिनाभरानंतर पुन्हा रक्त तपासून घेतले तेंव्हा दोन्हींचे प्रमाण मर्यादेच्या आत आले होते, पण ते सीमारेषेच्या जवळच असल्यामुळे पथ्य आणि व्यायाम हे दोन्ही चालू ठेवणे भार पडले ते कायमचे. त्या घटनेच्या आधीसुध्दा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर रक्ततपासणीबद्दल माहिती येत असे, पण मी तिकडे लक्ष देत नव्हतो. त्यानंतर मात्र मी लक्ष देऊन ती माहिती वाचायला लागलो. त्यातून बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. त्या थोडक्यात देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आपला श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, शरीराचे ठराविक तपमान राखणे, झालेली झीज भरून काढणे वगैरे शरीरातली महत्वाची कामे दिवसाचे चोवीस तास अव्याहत चालली असतात. त्यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल यांचीसुध्दा सतत आवश्यकता असते. यांचा पुरवठा आपल्या अन्नामधून होतो, पण आपण ते दिवसातून दोन तीन वेळाच खातो. त्या वेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्याचा रस रक्तात जातो आणि त्यातला थोडा भाग खर्च होऊन उरलेला रस शरीरातच निरनिराळ्या जागी साठवून ठेवला जातो. अन्नाचे पचन होऊन गेल्यानंतरच्या काळात हा रस तिथून पुन्हा रक्तात प्रवेश करतो आणि त्याच्या सहाय्याने शरीराच्या सर्व भागामधल्या सर्व अवयवांना पुरवला जातो. अशा प्रकारे अन्नरसाचा काही भाग नेहमीच रक्तात असतो. विशेषतः साखर, मीठ यासारखे रासायनिक पदार्थ रक्तात विरघळलेले असतातच. त्यांचे प्रमाण किमान आणि कमाल मर्यादांमध्ये ठेवण्याचे काम शरीरातल्या अनेक ग्रंथी मिळून बिनबोभाटपणे करत असतात. काही कारणामुळे त्यांचे संतुलन बिघडले तर मात्र ते प्रमाण लिमिटच्या बाहेर गेले आणि बराच काळ राहिले तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊन अनेक व्याधी जडतात. रक्तामधली साखर किंवा कोलेस्टेरॉल यांचा समावेश त्यातच होतो. हे आणि आणखी काय काय रक्तात असते आणि त्यासाठी तपासणी केली जाते हे पुढे पाहू.

.  . . . . . .  . . . . . .

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग २


भरपूर पाण्यात घालून शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट, मीठ, मसाले, चिंच, गूळ वगैरे घालून त्यावर फोडणी देऊन आमटी बनवतात. या पाककृतीत टाकलेली काही द्रव्ये आमटीतल्या पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत. तिचा समरस असा (होमोजिनियस) एकजीव पदार्थ होत नाही. रसायनशास्त्रानुसार आमटी हे एक संयुग (कॉम्पाउंड) नसते, ते एक मिश्रण (मिक्स्चर) असते. त्याचप्रमाणे रक्त हेसुध्दा अनेक घटकांचे मिश्रण असते. शिवाय पचन झालेल्या अन्नरसाचे मिश्रण त्यात मिसळते, तसेच शरीरामधील निरनिराळ्या ग्रंथींमधून निघालेले श्रावसुध्दा त्यात मिसळतात. शरीराला नको असलेली द्रव्ये रक्तामधूनच मूत्रपिंड (किडनी) आणि त्वचेमधील घर्मपिंडात जातात आणि तिथे ती रक्तामधून बाहेर काढली जाऊन लघवी व घामाद्वारे उत्सर्जित केली जातात. ही सारी द्रव्ये रक्तात मिसळलेली असली तरी त्यांच्या गुणधर्मावरून त्यांना ओळखणे आणि त्यांचे प्रमाण मोजणे शक्य असते. रक्ताच्या तपासणी (ब्लड टेस्टिंग)मध्ये हे काम केले जाते. अर्थातच या विविध द्रव्यांसाठी निरनिराळ्या प्रकारांच्या तपासण्या कराव्या लागतात. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे. मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. मी स्वतः आणि माझे कुटुंबीय यांना आलेला अनुभव आणि वाचनात आलेली माहिती या आधारावर हे लिहिले आहे.

१.पृथक्करणः (सीबीसी) रक्तामधील मुख्य घटकांची मोजणी या ब्ल़डकाउंटमध्ये करतात. ते असे असतात.
 तांबड्या पेशीः रक्तातला हा सर्वात मोठा घटक श्वासामधून फुफ्फुसात घेतलेल्या हवेतला प्राणवायू (ऑक्सीजन) शोषून घेऊन तो शरीरातल्या सर्व पेशींना पुरवतो आणि शरीरात निर्माण झालेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू गोळा करून त्याला फुफ्फुसांपर्यंत नेऊन पोचवतो. तांबड्या पेशींमधला हिमोग्लोबिन नावाचा घटक हे काम करत असतो. तांबड्या पेशींची आणि त्यांच्यातल्या हिमोग्लोबिनची संख्या कमी झाली तर शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे सारीच इंद्रिये अशक्त होतात.

पांढऱ्या पेशीः आपल्या शरीरात शिरलेल्या रोगजंतूंचा सामना करून त्यांना नष्ट करतात. यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढते. त्यांचे प्रमाण थोडे वाढलेले तपासणीमध्ये दिसले तर याचा अर्थ आपल्या शरीरात काही रोगजेतूंनी मुक्काम ठोकला आहे असा होतो. ते प्रमाण नीचांकाहूनही कमी झाले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

प्लेटलेट्सः रक्तवाहिनीला इजा झाली आणि त्यामधून रक्त बाहेर आले तर त्यातल्या प्लेटलेट्स लगेच गोठतात आणि एक जाळे तयार करून रक्ताची गुठळी बनवतात. त्यामुळे रक्तवाहिनीच्या फुटलेल्या भागावर एक बूच बसते आणि ते आतल्या रक्ताला बाहेर येण्यास प्रतिबंध करते अशा प्रकारे त्या जखमेमधून होणारा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. अशा प्रकारे आपला बचाव करणारा रक्तातला हा आणखी एक घटक आहे. त्यांची संख्या कमी झाली तर अगदी किरकोळ जखमांमधून किंवा साध्या खरचटण्यामधूनसुध्दा शरीरातले रक्त भळाभळा वहात राहू शकते.

इलेक्ट्रोलाईट्सः सोडियम, पोटॅशियम, क्लोरिन यासारखी काही मूलद्रव्ये शरीरामधील विविध इंद्रियांच्या कामासाठी आवश्यक असतात. या तपासणीत ते मोजले जातात.
वरील तीन्ही घटकांच्या ब्लडकाउंटवरून रोग्याच्या शरीराच्या धडधाकटपणाचा अंदाज येतो, तसेच अॅनिमियासारख्या काही विकारांची माहिती मिळते. यामधील कोठलाही घटक प्रमाणापेक्षा खूप जास्त असणेही चांगले नसते. ते एकाद्या दुर्धर रोगाचे लक्षण असू शकते.

२.साखरेचे प्रमाणः  आजकाल मधुमेह या विकाराचे प्रमाण वाढले आहे आणि ते वाढतच आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यामधील कार्बोहैड्रेट्सचे साखरेत रूपांतर होते. या साखरेचे प्राणवायूशी संपर्क आल्यावर ज्वलन होऊन त्यामधून ऊर्जा तयार होते. ही क्रिया होण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची गरज असते. मधुमेह झाल्यास शरीरातले इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, पुरेसे इन्सुलिन उपलब्ध नसले तर साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही आणि त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे हे प्रमाण सारखे बदलत असल्यामुळे ते मोजून त्या आकड्याची तुलना करण्यासाठी काही संदर्भ वेळ असणे आवश्यक असते. यासाठी दोन वेळा निश्चित केल्या आहेत.

फास्टिंग ब्लड शुगरः रात्रीचे जेवण करून झोपल्यानंतर आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचे रात्रभरात पचन होऊन त्यातली साखर यकृतात साठवली जाते आणि त्यानंतर ती यकृतामधून परत घेऊन तिचा उपयोग करणे चाललेले असते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी रक्ताची तपासणी केल्यास या परिस्थितीमधले प्रमाण समजते. निरोगी माणसाच्या रक्तात हे प्रमाण सुमारे ६० ते १०० च्या दरम्यान असते.

पोस्ट प्रॉन्डियलः सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर बरोबर दोन तासांनी रक्ताचे सँपल घेऊन ही चाचणी करतात. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या रक्तामधल्या साखरेचे प्रमाण एवढ्या वेळात पूर्वस्थितीवर आलेले असते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित येत नाही. सामान्य माणसासाठी हे प्रमाण सुमारे ८० ते १२० आणि मधुमेहींसाठी १४० पर्यंत ठीक समजले जाते.
आजकाल शर्करा तपासण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन रक्त काढून द्यावे लागत नाही. मुठीत मावू शकेल एवढे छोटेसे ग्ल्युकोमीटर वापरून आपण ही तपासणी घरच्या घरीसुध्दा करू शकतो. यात मिळणारे आकडे अगदी अचूक नसले तरी साधारण कल्पना येण्यासाठी ठीक असतात. रोज इन्सुलिनचे इन्जेक्शन घेणारे मधुमेहाचे काही रुग्ण या शोधामुळे आता ही तपासणी भोजनाच्या आधी करून त्यानुसार डोस ठरवतात.

ग्लायकोनेटे़ड हिमोग्लोबिनः या तपासणीमध्ये मागील तीन महिन्यातील साखरेच्या प्रमाणाची सरासरी समजते. वर दिलेल्या दोन वेळा सोडून इतर काळामध्येसुध्दा साखरेचे प्रमाण कमीजास्त होत असते. त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी अधून मधून ही तपासणी करून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.
 
३. क्लोरेस्टेरॉलः आपण खाल्लेले स्निग्ध पदार्थ कोलेस्टेरॉलच्या रूपाने रक्तात मिसळतात. लो डेन्सिटी. हाय डेंन्सिटी यासारखे त्याचे काही प्रकार आहेत. लिपिड प्रोफाईल नावाच्या ब्लडटेस्टमध्ये त्यांचा संपूर्ण आलेख मिळतो. पक्षघात आणि हृदयरोगाच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

४. लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, थाइरॉईड टेस्ट वगैरेः अशा प्रकारच्या तपासण्यांमध्ये रक्तात असलेली या इंद्रियांशी संबंधित रसायने किंवा स्त्राव यांची मोजणी करून त्यांचे प्रमाण दाखवले जाते. त्यावरून ही खास इंद्रिये किती चांगले काम करत आहेत किंवा बिघडली आहेत याचा अंदाज घेतला जातो.

५. पीटीः या तपासणीत रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो आणि लागणे अपेक्षित आहे हे मोजले जाते आणि त्यांची तुलना केली जाते. पक्षघात आणि हृदयरोगाच्या उपचाराच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

६. ब्लड टाईपः ए, बी, एबी, ओ आणि आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे रक्ताचे गट केलेले आहेत. रोग्याला दुसऱ्या माणसाचे रक्त द्यायचे असल्यास हा गट बघून घ्यावा लागतो. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यास रोग्याचे शरीर त्या रक्ताचा स्वीकार करत नाही, त्यामुळे उपायाऐवजी अपाय होऊ शकतो.

७. एलिसाः ही टेस्ट एड्स हा आजार ओळखण्यासाठी असते. आजकाल या आजाराने थैमान घातले असल्यामुळे रोग्याला दिलेल्या रक्तात या आजाराचे विषाणू नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्या रोग्याचे ऑपरेशन करायचे आहे त्यालासुध्दा या आजाराची लागण झालेली नाही हे पाहून घेणे योग्य असते.

८. ब्लड गॅसेसः या तपासणीसाठी थेट हृदयामधून आलेले रक्त रुग्णाच्या  रोहिणी (आर्टरी) मधून काढून त्यातील प्राणवायू, कार्बन डायॉक्साईड वायू वगैरेंचे प्रमाण मोजतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता यावरून पाहिली जाते.

९. ब्लड कल्चरः रक्तामधील रोगजंतूंना पोषक अशा वातावरणात वाढवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्यांचे निरीक्षण केले जाते. रोग्याला कोणत्या जंतूंचा संसर्ग झाला आहे आणि कोणती औषधे त्यांना मारक आहेत हे या तपासणीत समजते.

१० डीएनए टेस्टः मुलगा वा मुलगी आणि त्यांचे माता पिता यांचा रक्ताचा संबंध या तपासणीतून सिध्द करता येतो. प्रत्यक्ष जीवनापेक्षा नाटक, सिनेमे, टीव्हीवरील सीरियल्स यांमध्येच ही टेस्ट अनेक वेळा दाखवतात.
 

Friday, December 14, 2012

बाराचा महिमा आणि .... भाव

मुलाचा जन्म झाल्यापासून बारावे दिवशी त्याचे बारसे करतात. बाराव्या दिवशी त्याचे नामकरण करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही म्हणून त्या दिवशी बारशाचा समारंभ करतात असे म्हणतात. आतासारखी सगळ्या प्रकारच्या मुहूर्तांची माहिती देणारी जाडजूड छापील पंचांगे पूर्वीच्या काळात मिळत नसत. ज्योतिषविद्या जाणणा-या कोणा विद्वानाने आधी बाळाची जन्मतिथी, वेळ, प्रहर वगैरे पाहून त्याची पत्रिका तयार करायची आणि त्यातली राहू, केतू, शनि, मंगळ वगैरेंची स्थाने पाहून त्याच्या कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा हे जरा अवघड असेल.
नुकतेच जन्माला आलेले बाळ फारच नाजुक असते आणि त्याची आईसुध्दा अशक्त झालेली असते. त्यांच्याकडे सगळे लक्ष पुरवून त्यांना संपूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते, शिवाय त्या वेळेस जंतुसंसर्गाचा धोका जास्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते टाळणे गरजेचे असते. अशा कारणांमुळे घरात कुठल्याच प्रकारच्या समारंभाची धांदल असणे उचित नसते. पूर्वीच्या काळात घरात नवीन मूल जन्माला आल्यास सोयर पाळले जात असे. चार दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पाचवे दिवशी त्या बाळासाठी जिवतीमातेची पूजा केली जात असे. यावरूनच "अगदी सुरुवातीपासून असलेली गोष्ट" या अर्थाने 'पाचवीला पूजलेली' हा वाक्प्रचार पडला. त्यानंतर आणखी आठवडाभराने बारशाचा समारंभ केला जात असे. तोपर्यंत बहुतेक बाळे आणि बाळंतिणींच्या तब्येती सुरळीत झालेल्या असत. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकणारे डॉक्टर त्या काळात नसायचे. बहुतेत लोकांच्या  अनुभवावरून बाराव्या दिवशी बारसे करण्याची प्रथा पडली. बारा हा आकडा अशा प्रकारे जन्मापासूनच आपल्या जीवनात येतो.

पुढे त्या बाळाचा दर महिन्याला वाढदिवस होत राहतो. असे बारा महिने झाल्यावर मासिक वाढदिवस थांबतात आणि वार्षिक सुरू होतात. आकाशातल्या सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणामधून वर्ष आणि महिने यांच्या द्वारे कालगणना करणे सुरू झाले. त्यामुळे एका वर्षात बारा महिने असणे हे सूर्यचंद्रांनी ठरवले. बहुधा त्यावरून प्रेरणा घेऊन आकाशामधील तारकापुंजांचे बारा गट करून आकाशगोलाची बारा राशींमध्ये विभागणी करण्यात आली. दिवस आणि रात्र यांचेही बारा बारा भाग करून दिवसाची विभागणी चोवीस तासांमध्ये केली गेली. एकपासून चोवीसपर्यंतचे इतके सगळे आकडे पटकन समजणे आणि लक्षात ठेवणे थोडे कठीण असल्यामुळे घड्याळांच्या डायलची रचना करतांना त्यात फक्त बाराच तास दाखवले गेले. दिवस आणि रात्र यांच्यातला फरक उघड असल्यामुळे घड्याळात पाहून अकरा किंवा चार वाजलेले दिसले तर त्या वेळी ते दिवसाचे की रात्रीचे हे सांगण्याची सहसा गरज नसते. आपले जीवन आजकाल घड्याळाशी बांधले गेले आहे आणि त्यातला बाराचा आकडा सारखा आपल्या नजरेसमोर येत राहतो.

माझ्या लहानपणी प्राथमिक शालेय शिक्षण हे अक्षरे आणि अंक यांच्या ओळखीपासून सुरू होऊन त्यातच बराच काळ रेंगाळत असे. आधी अक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेंमधून भाषा साधारणपणे समजायला लागल्यानंतर त्या भाषेतून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यासारखे विषय शिकवावेत असा विचार त्यात होता आणि माझ्या मते तो बरोबर होता. अक्षरओळखीमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः हे बारा स्वर आणि कखगघङ पासून षसहळक्षज्ञ पर्यंत सगळी व्यंजने शिकून झाल्यावर ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः ही बाराखडी आणि त्यानंतर किंवा तिच्या सोबतीने ख ग घ वगैरे इतर व्यंजनांच्या बाराखड्या गिरवल्या जात. निदान दोन वर्षे तरी मी स्लेटच्या पाटीवर सगळ्या बाराखड्या गिरवल्या आहेत. या बाराखड्या गिरवून गिरवून त्यातील प्रत्येक अक्षराचा आकार डोळ्यात बसला की कोठलाही शब्द पटकन वाचता किंवा लिहिता येतो. त्यानंतर अर्थ समजो वा न समजो, कुठलेही वाक्य, उतारा किंवा पान वाचायला अडचण येत नाही. बाराखड्यांच्या गिरवण्यामधून बारा हा शब्द आणि अंक मनावर खोलवर खोदला गेला.  


इंग्रज लोकांना बारा हा आकडा फारच आवडत असावा. आता त्यांनीही दशमान पध्दत अंगिकारली असली तरी त्यांच्या पूर्वीच्या चलनात १२ पेन्स म्हणजे एक शिलिंग असायचा. त्यावरूनच त्यांनी भारतात सुरू केलेल्या चलनात सुध्दा बारा पै म्हणजे एक आणा असायचा. पै या नाण्याचा उपयोग माझ्या आजोबांच्या काळात होत असे. आता पै हे फक्त एक आडनाव राहिले आहे. लांबीरुंदी मोजण्यासाठी असलेल्या परिमाणात बारा इंचांचा एक फूट असतो. आता इग्रजांनी मेट्रिक पध्दत स्वीकारली असली तरी अमेरिकन लोक अजून फूटपट्ट्या वापरतात. अजूनही सगळीकडे बारा नगांना एक डझन म्हणतात. होमिओपाथी या चिकित्सापध्दतीत बारा मुख्य क्षार असतात.

आपल्या पूर्वजांनाही बारा आकडा आवडत असे. देशभरात शंकराची लक्षावधी देवळे असतील, पण त्यातली बारा ज्योतीर्लिंगे प्रसिध्द आहेत आणि सर्वाधिक पवित्र व जागृत देवस्थाने मानली जातात. सूर्याच्या बारा नावांनी त्याला बारा सूर्यनमस्कार घालतात. गणपतीच्या बारा नावांची दोन स्तोत्रे आहेत. अनेक गावांची नावे बारा या शब्दापासून तयार झालेली आहेत, जसे महाराष्ट्रात बारामती, उत्तर भारतात बाराबंकी आणि काश्मीरात बारामुल्ला. आणखीही असतील, पण ही तीम गावे बातम्यांमध्ये येत असतात.

ही सगळी बारा या अंकाचे महत्व दर्शवणारी उदाहरणे आहेत. पण बारा याच संख्येचा उपयोग निगेटिव्ह अर्थानेही केला जातो. एकाद्याचे वाटोळे होण्याला त्याचे बारा वाजले म्हणतात. व्यापार व्यवसायात एकाद्याला खूप मोठा तोटा झाला तर त्याने लाखाचे बारा हजार केले असे म्हणतात. एकाद्याची किंमत कमी झाली की तो बाराच्या भावात गेला. हा वाक्प्रचार कदाचित 'चीपर बाय डझन Cheaper by dozen' वरून आला असेल. 'केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य येतसे फार' असे सुभाषित आहे. पण या चातुर्याचा उपयोग कोणी इरसाल बनण्यात किंवा लबाडीमध्ये करत असेल तर तो (किंवा ती) बारा गावचे पाणी पिऊन आला (आली) आहे असे बोलले जाते.
या ना त्या कारणाने आणि अर्थाने बाराचा आकडा नेहमी आपल्या आसपास कुठे तरी फिरत असतो.

Monday, December 10, 2012

आता वाजणार की हो बारा बारा बारा ............

वीसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणा-या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणा-या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांचे बंकांमधले खाते बंद पडेल आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. सर्वात भयानक बातमी अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त  कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण बाहेर निघून ते भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना वायटूकेफ्रेंडली किंवा कंप्लायंट बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही. पण त्याबरोबर आयटीवाल्या कंपन्यांच्या हातातल्या सोन्याची अंडी देणा-या कोंबड्या मात्र नाहीशा झाल्या आणि त्यांच्याकडल्या सगळ्या कोंबड्यांचे भाव धडाधडा कोसळू लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले ते बराच काळ राहिले. 

त्यानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटांनी ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, त्याला फारसे महत्व मिळाले नाही. त्यानंतर दर वर्षी ०२:०२..., ०३:०३... वगैरे विशेष वेळा येत राहिल्या. त्या सगळ्या रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातच माणसाने बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८... ०९:०९... वगैरे क्षण येऊन गेले. मागील वर्षी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. आता आणखी दोन दिवसांनी १२-१२-१२ हा दिवस उजाडणार असून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ वाजणार आहेत. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ही या शतकातली शेवटची संधी आहे. इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल.

गेली अकरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठून तरी वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या अकरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र समजणा-यांनी याची नोंद घ्यावी.

आता या वर्षी या शतकातले १२:१२:१२:१२:१२:१२ असे सहावार बारा वाजणार आहेत. तेंव्हासुध्दा त्यामुळे काही विशेष घडण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही. पहायला गेल्यास बारा वाजणे या वाक्प्रचाराला मराठी भाषेत (आणि कदाचित हिंदीतसुध्दा) वेगळा खास अर्थ आहे. दोन हजार बारा या वर्षात त्या अर्थाने अनेकजणांचे बारा वाजून गेले. भारतीय क्रिकेट टीम त्या बाबतीत आघाडीवर दिसते. इंडियन ऑलिंपिक समिती, बॉक्सिंग फेडरेशन वगैरेंचेही असेच हाल झाले आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली म्हणून संबंधित लोकांचे बारा वाजले म्हणावे तर त्यासाठी सुरू झालेल्या लढ्यातच फाटाफूट पडून त्याचेही बारा वाजल्यागत झाले आहे. हे वर्ष संपेपर्यंत उरलेल्या तीन आठवड्यात आणखी कोणाकोणाचे काय काय होणार हे पहायचे आहे. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच आता बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत आहेत. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, आता हे दैवी सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले इंकांचे तथाकथित भविष्यही काही दिवसांनी टाईमबार्ड होईल.

ते काही का असो, परवा येणा-या बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटे आणि बारा सेकंद हा फक्त त्यातल्या संख्येच्या दृष्टीने विलक्षण असा क्षण तुम्ही आपल्या घड्याळात पाहून टिपू शकता आणि मनातल्या मनात त्यातला काल्पनिक थरार अनुभवू शकता. या क्षणी जन्माला आलेला एकादा महाभाग त्यामुळे अचाट सामर्थ्यवान झाला आणि तो सगळ्या जगाचे बारा वाजवणार आहे असे भविष्य कदाचित उद्या कोणी सांगेल आणि भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतील. पण त्याचा पराक्रम किंवा ते भविष्य खोटे ठरलेले पहायला खूप वर्षे वाट पहावी लागेल.

Sunday, December 09, 2012

पं.जितेंद्र अभिषेकी यांची नाट्यगीते



माझे बीएआरसीतले एक सहकारी श्री.रमेश रावेतकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड होती किंवा षौक होता असे म्हणण्यापेक्षा त्याचा ध्यास होता असे म्हणता येईल. प्रयोगशाळेतले काम आणि घर संसार सांभाळून ते चेंबूर येथील स्व.पं.दिनकर जाधव यांचेकडे जाऊन जयपूर घराण्याचे शास्त्रीय गायन शिकत तसेच घरी नियमितपणे रियाज करत. त्या काळातले जाधवबुवांचे शिष्य दर दीड दोन महिन्यात एकदा एकाद्या सुटीच्या दिवशी आळीपाळीने एकमेकांच्या घरी जमून गाण्याची मैफल जमवीत होते. अशा काही बैठका आमच्या घरीसुध्दा झाल्या. रावेतकर हे त्यातले एक स्टार परफॉर्मर असायचे. रिटायर झाल्यानंतर ते पुण्याला स्थाईक झाले आणि आमचा थेट संपर्क राहिला नाही, पण काही समाईक मित्रांकडून त्यांच्या प्रगतीची माहिती मिळत राहिली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण वेळ शास्त्रीय संगीताच्या साधनेला वाहून घेतले होते आणि त्या क्षेत्रात चांगला जम बसवला होता. त्या क्षेत्रातल्या जाणकार लोकांनी त्यांना पंडित ही उपाधी दिली होती.

मागच्या महिन्यात मी पुण्याला गेलेलो असतांना वर्तमानपत्रात एक छोटीशी जाहिरात पाहिली. पं.जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर झालेली नाट्यगीते, कित्येत वर्षांच्या कालावधी न भेटलेल्या  रावेतकरांची भेट आणि त्यांचे प्रभावशाली गायन ऐकणे असा त्रिवेणी संगम साधायचे ठरवले आणि उद्यान सभागृह कुठे आहे याची चौकशी करून ते गाठले. आम्ही तिथे पोचेपर्यंत कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतात होता. "आज पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे शिष्य पं.रावेतकर त्यांची नाट्यगीते सादर करणार आहेत." या निवेदिकेने केलेल्या प्रस्तावनेमधला 'शिष्य' हा शब्द ऐकताच मी थोडासा दचकलो. रावेतकरांच्याबद्दलची इतकी महत्वाची बातमी यापूर्वी माझ्या कानावर आली नव्हती. पुढे कलाकारांची सविस्तर ओळख करून देतांना तिने सांगितले की त्यांनी एकलव्याप्रमाणे पं.अभिषेकी यांच्या गाण्याचे शिक्षण घेतले. बुध्दीमत्ता आणि कष्टाळू वृत्ती हे संशोधनासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्याकडे होतेच, शास्त्रीय संगीताचे ज्ञानही त्यांनी संपादन केले होते. पं.अभिषेकी यांच्या नाट्यगीतांचे व्यवस्थित विश्लेषण करून त्यातली विशिष्ट सौंदर्यस्थळे, बुवांच्या गायनातली खासियत वगैरे मधले सूक्ष्म बारकावे त्यांनी समजून घेऊन ते प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते हे त्यांच्या गाण्यातून जाणवत राहिले. वयोमानानुसार त्यांच्या गायनाला पडलेल्या मर्यादा सांभाळून त्यांनी ते गायन उत्कृष्ट रीत्या सादर केले. मी पुणेकर नसल्यामुळे "तुम्ही या गुरूंना कोणती गुरुदक्षिणा दिलीत?" असे विचारले नाही. पण आता ते पुणेकर झालेले असल्यामुळे "आम्ही चालवतो आहोत पुढे वारसा." असे चपखल उत्तर त्यांनी लगेच दिले असते. 

रावेतकरांनी आपल्या गायनाची सुरुवात एका रागमालेने केली. "हिंडोल रागमधुर" पासून सुरू होणा-या या रागमालेत पुढे भूप, छायानट, अलहैया बिलावल, शंकरा, हंसध्वनी, देस, तिलककामोद, बसंत, श्री, मारवा, सोहनी, भैरव, गुणकली, मालकंस, भैरवी, जौनपुरी, मधमास सारंग, बिभास वगैरे राग एकेका ओळीत एकापाठोपाठ एक करून येतात. त्या त्या रागाची ठळक ओळख एका ओळीत त्याच्या नावाबरोबर केली जाते. अशा प्रकारे भराभर राग बदलत त्या रागांचे वेगळे सूर अचूकपणे पकडणे अतीशय कठीण असते आणि भरपूर सराव केल्यानेच ते जमू शकते. स्व.पं.जितेंद्र अभिषेकी ही रागमाला त्यांच्या कार्यक्रमात गात असले तरी ती मुळात दुस-या एका पंडिताने रचली असल्याचे रावेतकरांनी सांगितले. स्व.शिवानंद पाटीलसुध्दा त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ही रागमाला अनेक वेळा छान गात असत आणि प्रत्येक वेळी त्यांना त्यावर टाळ्या मिळत. ही रागमाला एकाद्या मराठी नाटकात असेल असे मला वाटत नाही.

शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाची सुरुवात बहुतेक विद्यार्थी भूप रागाने करतात आणि त्यात थोडे प्राविण्य मिळवल्यानंतर सुरुवातीच्या काळातच यमन हा त्याचा मोठा भाऊ शिकतात असे म्हणतात. रावेतकरांनी यमन रागातलेच पहिले नाट्यगीत घेतले, "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम". १९६४ साली रंगमंचावर आलेल्या मत्स्यगंधा या नाटकानेच अभिषेकी यांची कारकीर्द सुरू झाली होती. रामदास कामत यांनी गायिलेले त्या नाटकातले हे पहिलेच गाणे. वृंदावनी सारंग रागातले "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वतांची" आणि खमाज रागातले "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाठी" ही मत्स्यगंधा नाटकातली रामदास कामतांची आणखी काही गाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात रावेतकरानी गायिली. मुलतानी रागातले "नको विसरू संकेत मीलनाचा" हे त्यातले एकच गाणे गायचे राहिले. बीएआरसीत काम करत असतांना रावेतकरांनी एका हौशी नाटकसंस्थेने बसवलेल्या मत्स्यगंधा या नाटकात पराशर ऋषींची भूमिका वठवली होती. तेंव्हापासून त्यांनी ही नाट्यगीते तयार करून ठेवली होती.

नटवर्य बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ यांनी गाजवलेला मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ माझ्या जन्माच्याही आधीच होऊन गेला होता. मी जेवढी संगीत नाटके पाहिली आहेत त्यात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे कट्यार काळजात घुसली हे नाटक निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट होते असे मला वाटते. हे नाटकच संगीत या विषयावर आधारलेले आहे. भिन्न शैलींमध्ये शास्त्रीय संगीत गाणारे दोन गायक आणि त्यांना एकत्र आणू पाहणारी एक गायिका ही यातली मुख्य पात्रे आहेत. या तीघांनी निरनिराळ्या शैलींमध्ये गायन सादर करावे अशा रीतीची स्वररचना पं.जितेंद्र अभिषेकी यांनी यातील गीतांसाठी केली होती. उदाहरणार्थ त्यातले "घेई छंद मकरंद" हे एकच पद दोन गायक दोन निरनिराळ्या पध्दतीने गाऊन त्यामधला फरक स्पष्ट करून दाखवतात. स्व.वसंतराव देशपांडे या चतुरस्र गायकाने त्यातली आक्रमक प्रकारे गाणा-या ज्येष्ठ गायकाची मुख्य भूमिका लाजवाब वठवली होती. मुद्दाम पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.वसंतराव देशपांडे यांच्यासाठीच हे खास नाटक लिहिले असावे असे वाटते. नाट्यसंगीताच्या कुठल्याही कार्यक्रमात कटार काळजात घुसली मधले कमीत कमी एक गाणे तरी यायलाच हवे. दिन गेले भजनाविण सारे, या भवनातिल गीत पुराणे, मुरलीधर श्याम, सुरत पियाकी न छिन बिसुराये, लागी कलेजवाँ कटार यासारखी एकाहून एक सरस अशी मराठी किंवा हिंदी गीते या नाटकात आहेत. रावेतकरांनी त्यातले "तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज" हे उगवत्या सूर्याची प्रार्थना असलेले अप्रतिम गाणे सादर केले.

पं. वसंतराव देशपांडे यांनीच अजरामर करून ठेवलेले भीमपलासी रागातले "काटा रुते कुणाला" हे गाणे एक नाट्यगीत आहे हे ही कदाचित सर्वांना ठाऊक नसेल. हे बंध रेशमाचे या रणजीत देसाई यांनी लिहिलेल्या नाटकातले हे गीत मात्र कवयित्री शांता शेळके यांचे आहे. या गीताची कल्पना एका उर्दू गजलेवरून घेतली आहे असे मी एकदा वाचले होते. शांताबाईंनीच लिहिलेले "तुझा गे नितनूतन सहवास" हे यमन रागातले नाट्यगीत वासवदत्ता या नाटकात होते. हे नाटक आणि हे गीत फारसे गाजले नाही. त्या मानाने वसंत कानेटकरांच्या मीरा मधुरा या नाटकातले "स्वप्‍नात पाहिले जे ते राहू देत स्वप्‍नी" हे रामदास कामत यांनी गायिलेले गौडमल्हार रागातले पद जास्त लोकप्रिय झाले होते. पण ते भावगीतासारखे वाटते. धाडिला राम तिने का वनी या द.ग.गोडसे यांच्या नाटकातले पण राजा बढे यांनी लिहिलेले "कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला" हे पद पुरुष पात्राचे आहे, पण मी ते आशा खाडीलकर यांच्या कार्यक्रमात ऐकल्याचे मला आठवते. हे नाटक पहायला न मिळाल्यामुळे ते गाणे नक्की कोणाच्या तोंडी आहे ते मला माहीत नाही. हे गीत सूर्यवंश नावाच्या (मी न ऐकलेल्या रागात) असल्याचे रावेतकरांनी सांगितले. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वररचना केलेल्या या वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्यगीतांची निवड रावेतकरांनी आपल्या कार्यक्रमात केली होती.

गोरा कुंभार या जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या नाटकातली अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली गीते त्यातले शब्द आणि त्यावर चढवलेला स्वरसाज या दोन्ही दृष्टीने अप्रतिम आहेत. इतिहासकाळात होऊन गेलेल्या गोरा कुंभारासाठी अशोकजींनी लिहिलेली "पाहू द्या रे मज विठोबाचे मुख, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, केशवाचे भेटी लागलेसे पिसे वगैरे गीते जुन्या संतकवींच्या अभंगांसारखी वाटतात. त्या नाटकातले जौनपुरी रागातले "अवघे गर्जे पंढरपूर" हे नाट्यगीत रावेतकरांनी या कार्यक्रमात घेतले होते.

मत्स्यगंधा या अभिषेकी यांच्या पहिल्या नाटकानंतर दोन वर्षांतच आलेले ययाती आणि देवयानी हे पौराणिक नाटकसुध्दा खूप गाजले होते. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात साहित्यिक स्व.वि.वा.शिरवाडकर यांनी लिहिलेल्या या नाट्यकृतीमधली "तम निशेचा सरला अरुण कमल प्राचीवर फुलले, प्रेम वरदान स्मर सदा, मी मानापमाना नच मानतो, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा, हे सुरांनो चंद्र व्हा" आदि सगळी गाणी तुफान गाजली होती, अजूनही ती अनेक वेळा आपल्या कानावर पडतात. कुसुमाग्रजांची अलौकिक साहित्यिक प्रतिभा आणि अभिषेकीबुवांची अप्रतिम स्वररचना या दोन्हींचा संयोग झाल्यामुळे त्या गाण्यांमध्ये सोनेपर सुहागा असे झाले आहे. त्यातले "सर्वात्मका सर्वेश्वरा" हे गीत भैरवी रागात आहे असे मी समजत होतो, पण त्याच नाटकात पुन्हा "तम निशेचा फुलला" ही दुसरी भैरवी कशासाठी घातली आहे असे मला वाटत असे. सर्वात्मका हे नाट्यगीत सादर करतांना रावेतकरांनी असे सांगितले की जौनपुरी आणि बिलासखानी तोडीमधल्या सुरात हे गाणे गुंफून त्यांच्या विशिष्ट पध्दतीने केलेल्या मांडणीतून भैरवीचा भास त्यात उत्पन्न केला आहे. मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसल्यामुळे त्यावर काही बोलायचा मला अधिकार नाही. या कार्यक्रमाची सांगता रावेतकरांनी "दुर्दैवे आपण दुरावलो या देही" ही ओळ भैरवी रागात आळवून केली. मत्स्यगंधा नाटकातल्या "गुंतता हृदय हे" या गीतातली ही ओळ नाटकाच्या अखेरीस गाऊन प्रेक्षकांचा निरोप घेतला जातो अशी माहिती त्यांनी सांगितली.

अभिषेकी यांनी स्वरबध्द केलेल्या पुरुषनटांच्या गीतांमधली निवडक गाणी रावेतकरांनी या प्रोग्रॅममध्ये गायिली होती. याखेरीज स्त्रीपात्रांच्या तोंडी असलेली खूप प्रसिध्द गाणी आहेत. मत्यगंधा नाटकातली "गर्द सभोती रान साजणी, तव भास अंतरा झाला आणि अर्थशून्य भासे मज हा" ही आशालता वाबगावकर यांची गाणी, धाडिला राम तिने का वनी नाटकातले आशा खाडिलकर यांचे "घाई नको बाई अशी आले रे बकुळ फुला" हे गीत, हे बंध रेशमाचे या नाटकातली "का धरिला परदेश आणि विकल मन आज झुरत असहाय" ही बकुळ पंडित यांची नाट्यगीते अशी अनेक उदाहरणे देता येतील. पं.अभिषेकी यांच्या स्वररचनेचे एक वैशिष्ट्य रावेतकरांनी असे सांगितले की त्यांची गाणी पूर्वीच्या काळातल्या गाण्यांसारखी खूप काळ आळवून आळवून गायची नव्हती. तानांची भेंडोळीच्या भेंडोळी त्यात टाकायची नसत. पण प्रत्येक ओळींमध्येच लहान लहान तानांचे सुंदर तुकडे असलेल्या गोड जागा असतात. सिनेमातल्या गाण्यांप्रमाणे त्यांची गाणी जशीच्या तशीच गायली तर चांगली वाटतात. एकाद्याला शास्त्रीय संगीतातली रागदारी चांगली येते म्हणून त्याने त्यात आणखी भर टाकून लांबण लावली तर त्यातले सौंदर्य शिल्लक रहात नाही. पण गायकाचा कस लागेल इतक्या जागा त्यांनीच गाण्याच्या चाली बांधतांना त्यात पेरून ठेवल्या आहेत.

यामुळेच पं.अभिषेकींच्या नंतर त्यांच्या जवळपास सुध्दा पोचू शकेल असा दुसरा संगीतकार मराठी नाट्यविश्वाला मिळाला नाही.

Wednesday, December 05, 2012

तेथे कर माझे जुळती - १२ - पं.जितेंद्र अभिषेकी

मी नोकरीसाठी मुंबईला आलो तेंव्हा मराठी संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन सुरू झाले होते. स्व.विद्याधर गोखले यांनी काही नवी संगीत नाटके लिहून ती रंगमंचावर आणली होती. त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. पण त्या काळात आलेल्या मत्स्यगंधा या संगीत नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या नाटकाबरोबरच जितेंद्र अभिषेकी हे एक नवे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले.

स्वयंवर आणि सौभद्र या आद्य नाटकांपासूनच संगीत नाटक हे पौराणिक काळामधल्या कथेवर असावे असा संकेत निर्माण झाला होता. याला काही सन्माननीय अपवाद होते. मध्ये खूप वर्षे निघून गेल्यानंतरसुध्दा स्व.विद्याधर गोखले यांनीही आपली नाटके पौराणिक किंवा निदान ऐतिहासिक काळातील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लिहिली होती. मत्स्यगंधा हे नाटकसुध्दा महाभारतातील कथेवर आधारलेले होते. अशा पौराणिक काळातले जटाधारी ऋषिमुनी नेहमी महाज्ञानी, पंडित आणि धीरगंभीर प्रकृतीचे दाखवले जातात. त्याहून वेगळ्या प्रवृत्तीच्या कळलाव्या नारदमुनींच्या तोंडी दिलेले 'लग्नाला जातो मी द्वारकापुरा' या गीताचा अपवाद सोडल्यास इतर कोणा ऋषीने ताना पलटे घेऊन गाणे रंगवले असल्याचे मला तरी माहीत नव्हते. पण मत्स्यगंधा या नाटकातले पराशर मुनी नाटकाच्या पहिल्या अंकातच "देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम" असे गात गात प्रवेश करतात, "नको विसरू संकेत मीलनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा" असे गात प्रेमयाचना करतात, "गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी" या गाण्यातून प्रेमाची पूर्तता करतात आणि त्यानंतर "साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची " असे गात अंतर्धान पावतात ते कायमचेच. सत्यवतीच्या जीवनातले नाट्य त्यानंतर सुरू होते आणि अखेरपर्यंत चालत राहते. पराशर मुनीचा त्यात पुन्हा कधी साधा उल्लेखदेखील होत नाही.

नाटकाच्या कथानकात पराशर हे पात्रच नसते तरी कदाचित चालले असते, पण हे नाटक इतके चालले ते मात्र प्रामुख्याने पराशरांच्या चार नाट्यगीतांमुळे आणि विशेषतः त्या गाण्यांना पं.जितेंद्र अभिषेकी या नवोदित संगीतकाराने दिलेल्या अप्रतिम चालींमुळे. रामदास कामत या गायक नटाने त्यात जीव ओतून त्यांना अजरामर केले हे सुध्दा खरे आहेच. पण त्यांचे शास्त्रीय गायनातले सामर्थ्य ओळखून आणि त्यांच्या दमदार आवाजात चांगली खुलेल अशी स्वररचना अभिषेकींनी या गाण्यांसाठी केली. सत्यवती ही या नाटकातली मध्यवर्ती भूमिका आशालता वाबगावकर या गुणी आणि कुशल अभिनेत्री वठवत असत. त्यांच्या गोड आवाजाचा पुरेपूर उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांना दिलेल्या गाण्यांना वेगळ्या प्रकारच्या मधुर चाली दिल्या होत्या. नाटकातले प्रसंग, गीतामधले भाव, नटनट्यांचे आवाज, त्यांची शास्त्रीय संगीतातली तयारी या सर्वांचा अभ्यास आणि विचार करून शिवाय ती गाणी लोकांना आवडावीत, त्यांना सहजपणे गुणगुणता यावीत अशा दृष्टीने त्यांना चाली लावण्याची अद्भुत किमया पं.अभिषेकी यांनी साध्य करून दाखवली होती. त्यानंतरही त्यांनी अनेक अजरामर ठरलेल्या नाट्यगीतांची संगीतरचना केली आणि मत्स्यगंधा हा एक योगायोग नव्हता हे दाखवून दिले.

देवल आणि किर्लोस्करांच्या काळात नाटक कंपनीतल्या सगळ्या लोकांचा मुक्काम एकत्र असायचा. नाटक मंडळींकडे एक गायनाचा मास्तर असायचा. संगीत नाटकातल्या पदांना चाली लावणे, नटांना ती पदे शिकवून त्यांच्या तालमी घेणे वगैरे कामे तो नित्यनियमाने करायचाच, शिवाय प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळीसुध्दा हजर राहून एकादे वाद्य वाजवत असे. त्या वेळी नाटकांना वेळेची मर्यादा नसल्यामुळे गायक नट ती पदे आळवून आळवून गात असत. शास्त्रीय संगीताचा गायक जसा एकेक राग असंख्य प्रकारच्या ताना घेऊन फुलवतो, त्याप्रमाणे हे गायक नटसुध्दा त्यांच्या कुवतीनुसार त्या पदांचा विस्तार एकाद्या बंदिशीप्रमाणे करीत असत. अभिषेकी ज्या काळात आले तेंव्हा अशा प्रकारच्या नाटककंपन्या राहिल्या नव्हत्या. नट, नट्या, वादक वगैरे मंडळी एकत्र रहात नसत. काळानुसार झालेल्या बदलामुळे आधी ठराविक वेळात तालीम करायची आणि एकदा नाटक बसले की त्याच्या प्रयोगांच्या वेळी भेटत रहायचे असा रिवाज पडला होता. नाटकाचा प्रयोग ठराविक वेळेत संपलाच पाहिजे हे आवश्यक झाले होते. या सर्व गोष्टींचे भान ठेऊन त्यानुसार संगीतरचना करणे हे काम अधिक कौशल्यपूर्ण झाले होते. ते केवळ दिग्दर्शन न राहता संगीताचे नियोजन झाले होते.

मी मुंबईला आलो तेंव्हा माझ्या मित्रांबरोबर दादरला शिवाजीमंदिराच्या जवळच रहात होतो. तिथे लावलेले आगामी नाटकांचे बोर्ड येता जाता पहायचे आणि आधीच तिकीटे काढून त्यातली बरी वाटणारी नाटके पहायची सवयच आम्हाला लागली होती. नाटकाच्या बोर्डावरले जितेंद्र अभिषेकी हे नाव वाचून ते नाटक आम्ही नक्की पहात होतो आणि आमची कधीच निराशा झाली नाही. त्या नाटकांमधली नाट्यगीते उत्तम असायचीच, ते नाटकसुध्दा दर्जेदार असायचे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अभिषेकी त्या नाटकाची निवड चोखंदळपणे करत असावेत.

त्या काळातल्या बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवात शास्त्रीय संगीताचा एकादा तरी कार्यक्रम हमखास असायचा. दादरमध्ये सुध्दा काही ठिकाणी रस्त्यावरच गोणपाट अंथरून प्रेक्षकांना बसायची व्यवस्था केली जायची. आजकाल त्या भागात काय परिस्थिती आहे हे मी पाहिलेले नाही, पण त्या काळातली मोटारगाड्यांची आणि माणसांची संख्या खूप कमी असल्यामुळे हे शक्य असायचे. काही ठिकाणी त्या भागातल्या एकाद्या शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाची सोय केली जात असे. रस्त्यावरला कार्यक्रम विनामूल्यच असायचा, सभागृहातल्या प्रोग्रॅमला नाममात्र तिकीट असायचे. आम्हाला ते सहज परवडत होते. मला आजसुध्दा शास्त्रीय संगीतातले काही कळते अशातला भाग नाही, त्या काळात तर त्यातले ओ की ठो समजत नव्हते. पण आमच्या एका रूममेटने शाळेत असतांना संगीताच्या एक दोन परीक्षा दिल्या होत्या एवढ्या भांडवलावर तो उस्तादगिरी करायचा. त्याच्या आग्रहाखातर त्याच्यासोबत आम्हीही अशा बैठकींना जाऊन बसत होतो. संगीताच्या क्षेत्रामधल्या बड्या बड्या प्रस्थांचे गायन अशा उत्सवांमध्ये जवळ बसून ऐकायला मिळाले. त्या काळात जितेंद्र अभिषेकी कदाचित एवढे जास्त प्रसिध्द झाले नसतील. दादर भागातल्या कुठल्या ना कुठल्या गणेशोत्सवात त्यांचे गायन हमखास असायचेच आणि आम्ही ते कधी चुकवले नाही.

आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गायनाच्या पहिल्याच कार्यक्रमाच्या वेळी योगायोगाने आम्हाला अगदी स्टेजच्या पुढ्यातच बसायला जागा मिळाली होती. अभिषेकींचा आवाज नैसर्गिक रीत्या पं.भीमसेन जोशी यांच्यासारखा बुलंद नव्हता किंवा स्व.सुधीर फडके यांच्यासारखा मुलायमही नव्हता. त्यांनी रियाजातून तो कमावला होता. गायनाच्या सुरुवातीला त्यांनी खर्जामध्ये व्हँ अशी सुरुवात केल्यावर आम्हाला हसू फुटले आणि विलंबित ऐकता ऐकता झोप यायला लागली. समोर बसलेलो असल्यामुळे एकमेकात बोलूही शकत नव्हतो. आमच्या आजूबाजूला बसलेल्या इतर नवख्या पोरांचीही अशीच अवस्था होती. असल्या मठ्ठ दगडांसमोर आपली अलौकिक कला सादर करतांना पंडितजींना किती यातना होत असतील याची कल्पना करता येणार नाही. पण  आमच्यासारख्या अज्ञानी लोकांकडे बिलकुल लक्ष न देता ते आपल्या गायनात तल्लीन होऊन गेले. त्यानंतर त्यांचे गायन पचनी पडत नसले तरी त्यांच्या मुखावरले भाव पहात राहिलो. दृत गतीत बंदिश सुरू झाल्यावर मात्र आपण काही तरी अपूर्व ऐकत असल्याचे जाणवले आणि नाट्यगीतांनी तर धमाल आणली. टाळ्यांच्या कडकडाटात सारा परिसर दुमदुमून गेला.

त्यानंतर मात्र माझ्या मनात त्यांच्या गायनाचे विलक्षण आकर्षण निर्माण झाले आणि दादरला असेपर्यंत मीही माझ्या मित्राबरोबर ते पहात आणि ऐकत राहिलो. अणुशक्तीनगरला रहायला गेल्यानंतर मराठी नाटके किंवा शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांची तिकीटे काढणे आणि दूरच्या नाट्यगृहात जाऊन ते पहाणे बरेच कठीण झाल्यामुळे ते कमी होत गेले. पण मध्ये अशी काही वर्षे निघून गेल्यानंतर आमची योगायोगाने स्व.शिवानंद पाटील आणि योजना यांच्याशी ओळख झाली आणि वाढत गेली. त्यांचे योजना प्रतिष्ठान अनेक सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत होते. त्या सर्व कार्यक्रमांना आमची उपस्थिती असायचीच, शिवाय इतर संस्थांतर्फे होणा-या शिवानंद पाटील यांच्या गायनालाही आम्ही शक्य तोवर जात होतो. शिवानंद पाटील हे पं.जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य होते आणि त्यांची नाट्यगीते, अभंग, भावगीते वगैरे त्यांच्या कार्यक्रमात जवळ जवळ तंतोतंत तशाच पध्दतीने गात असत. आम्ही ऐकलेल्या अभिषेकींच्या गाण्यांची यातून उजळणी होत राहिली. शिवाय टेलीव्हिजन आणि टेप रेकॉर्डरवर आम्ही ती ऐकत होतोच. एक दोन वेळा त्यांच्या कार्यक्रमालाही गेलो. काही काही वेळा योजना प्रतिष्ठानच्या कार्यक्रमालाही ते सन्माननीय आमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित असत. शिवानंद किंवा योजना यांच्यासोबत राहिल्यामुळे त्यांची भेट होऊन एकाद दुसरे वाक्य बोलणेही होत असे.

अशाच एका कार्यक्रमात मी त्यांना पाहिले तेंव्हा त्यांची प्रकृती काही ठीक दिसली नाही. त्यावेळी ते अजून पुण्याला रहायला गेले नव्हते की पुण्याहून त्या वेळी मुंबईला आले होते ते आता आठवत नाही. वजनाच्या प्रमाणात त्यांच्या अंगातली ताकत कमी झाली असल्यामुळे त्यांची हालचाल संथ झाली होती, त्यांना बोलतांना दम लागत होता. त्यानंतर ते पुन्हा धडधाकट झाले की नाही तेही समजले नाही. त्यांचे एक जवळचे आप्त श्री.गोडसे योजना प्रतिष्ठानच्या कामात भाग घेत होते आणि अधून मधून त्यांची भेट झाली तर त्यांचेकडून अभिषेकीबुवांची खुषाली कळत असे. पण नंतर आम्हाला त्या कार्यक्रमाला जाणेही शक्य होईनासे झाले. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल जेवढे छापून येत होते किंवा टीव्हीवर दिसत होते तेवढाच संबंध राहिला. त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकल्यानर मात्र मन सुन्न होऊन गेले.

Tuesday, December 04, 2012

सहा डिसेंबर - एक अनुभव

सहा डिसेंबर ही तारीख आता येण्यातच आहे. या तारखेची खूप वर्षांपूर्वीची एक आठवण जागी झाली. त्या वेळी तीन किंवा चार डिसेंबरच्या रात्रीच्या ट्रेनने माझा मुलगा विदर्भातल्या एका गावी गेला होता. दुसरे दिवशी सकाळी तिथे पोचल्यानंतर तिथले काम दिवसभरात आटोपून संध्याकाळच्या गाडीने तो मुंबईला परतणार होता. परतीचे कन्फर्म्ड रिझर्वेशन केलेले होते. संध्याकाळी त्याने मला फोन केला आणि सगळी कामे सुरळीतपणे झाली असून ठरल्याप्रमाणे तो परतीच्या प्रवासासाठी स्टेशनला जायला निघाला असल्याचे त्याने सांगितले. 

तासाभराने पुन्हा त्याचा फोन आला. यावेळी त्याचा आवाज घाबराघुबरा वाटत होता. तो एवढेच म्हणाला, "मी सांगतो तो फोन नंबर लिहून घ्या आणि तुम्ही त्या नंबरावर मला लगेच फोन करा." एवढे सांगून त्याने फोन ठेऊन दिला. तो असे कां सांगतो आहे हे त्याने सांगितले नाही आणि ते विचारण्यासाठी सुध्दा त्याला फोन लावण्यात काही अर्थ नव्हता. याबद्दल विचार करण्यात वेळ न घालवता मी त्याने दिलेला नंबर फिरवला. दोन तीन प्रयत्नानंतर तो लागला. तो कोणत्या तरी दुकानातला किंवा हॉटेलातला फोन असावा, पण माझ्या मुलानेच उचलला आणि सांगितले, "बाबा, माझा मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे म्हणून मी हा नंबर दिला आहे. आज मी गाडी पकडू शकलो नाही, आता माझ्याकडे फारसे पैसे शिल्लक नाहीत आणि मला बरे वाटत नाही आहे. मी काय करू तेच समजत नाही."
"पण तुझ्याकडं परतीचं रिझर्वेशन होतं आणि तू तर गाडी पकडायला वेळेवर निघाला होतास ना?"
"हो, पण सहा डिसेंबरसाठी मुंबईला जाणा-या लोकांनी प्लॅटफॉर्म अगदी गच्च भरला होता, शिवाय गाडी येतांनाच शिगोशीग भरून आली होती. कुठल्याही डब्यात पाय ठेवायला जागा नव्हती. रिझर्वेशनच्या डब्यात देखील हीच परिस्थिती होती. माझ्या डब्याचा तर दरवाजासुध्दा कोणी उघडला नाही. टीसी वगैरेंचा पत्ताच नव्हता. जे लोक दाराला धरून लोंबकळत जाऊ शकत होते तेवढेच कदाचित पुढे गेले असतील. बाकीचे सगळे लोक खालीच राहिले. आता मी काय करू? मला काहीच समजत नाही."
मी विचार केला की पुढल्या गाडीमध्येही अशीच परिस्थिती असणार आणि शिवाय त्यात रिझर्वेशन नाही म्हणजे जास्तच त्रास होणार. किंबहुना त्या गाडीत गुसणेसुध्दा अशक्यच असणार. आणखी किती तासांनंतर किंवा दिवसांनंतर मुंबईच्या दिशेने जाणारी गर्दी कमी होईल ते सांगता येणार नाही. त्याला तोपर्यंत हॉटेलात राहणेही परवडण्यारखे नव्हते, त्याच्याकडे त्यासाठी पैसे नव्हतेच, एटीएम कार्ड वगैरे काही नव्हते आणि जातांना बरोबर नेलेल्या जास्तीच्या पैशाची आता गरज पडणार नाही अशा विचाराने त्याने त्यातले बरेचसे खर्च करून टाकले होते. त्यातून त्याची तबेतही बिघडली होती. त्याला मदत करण्यासाठी जरी मी लगेच जायला निघालो तरी मी तिकडे कुठल्या वाहनाने जाणार? आणि मला इतक्या दूर जाऊन पोचायलाही खूप वेळ लागणार. तोपर्यंत तो काय करेल? त्याच्या प्रश्नाला लगेच देण्यासारखे काही उत्तर माझ्याकडे नव्हतेच. त्यासाठी मी अर्धा तास वेळ मागितला आणि तोपर्यंत बसची काही सोय होते का याची चौकशी करायला सांगितले, पण ती नसणार हे मला माहीत होते. 
मी लगेच मुंबईतल्या दोघा तीघा नातेवाईकांना फोन लावून नागपूरात रहाणा-या त्यांच्या आप्तांची चौकशी केली. त्यातले कोणी त्या दिवशी तिथे होते, कोणी परगावी गेले होते, कोणाच्या घरी आता त्यांचा मुलगाच तेवढा रहात होता. त्या सगळ्यांचे फोन नंबर मी लिहून घेतले. त्यातल्या दोघांना मी साधारणपणे ओळखत होतो. त्यांना फोन लावून मी त्यांच्याशी बोलून घेतले आणि माझ्या मुलाने दिलेला फोन नंबर पुन्हा फिरवला.
माझा फोन येण्याची तो वाटच पहात होता. त्या वेळी तिथून मुंबईला किंवा पुण्याला जाण्यासाठी बसची काही व्यवस्था नव्हतीच, मुंबईपर्यंत येण्यासाठी खाजगी वाहन मिळणेही दुरापास्त होते. त्या नवख्या गावात तो कोणालाही ओळखतही नव्हता. मी आधी त्याच्या तब्येतीची चौकशी केली. ती थोडीशी बिघडली असली तरी तो हिंडूफिरू शकत होता. जास्त गंभीर अवस्था असली तर नागपूरहून कोणाला तरी तिथे जायला विनवावे लागले असते. त्या दिवशीच्या अती गर्दीमुळे तो माणूसही रेल्वेने जाऊ शकला नसताच. त्याला कार किंवा जीपची व्यवस्था करावी लागली असती. सुदैवाने त्याची आवश्यकता नव्हती हे ऐकून थोडा धीर आला. मी मुलाला समजावून सांगितले, "आता मुंबईकडे येण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही आणि तिथे थांबून राहूनही काही उपयोग नाही. त्यापेक्षा तू उलट दिशेला जाणारी एकादी ट्रेन पकड आणि सरळ नागपूरला जा. त्या गाडीत बहुधा जास्त गर्दी असणार नाही आणि तुला तिच्यात जागा मिळेल. तिथे आपल्या ओळखीतले अमूक अमूक लोक राहतात, त्यांचे पत्ते आणि फोन नंबर लिहून घे आणि त्यांच्याकडे जाऊन धडक. मी त्यांना तसे सांगून ठेवले आहे. जे काही करायचे ते प्रकृतीला सांभाळून कर."
ती रात्र आम्ही अस्वस्थ अवस्थेतच कशीबशी काढली. त्यानंतर आम्हीही त्याला फोन करू शकत नव्हतो आणि त्यालाही ते शक्य झाले नाही. दुसरे दिवशी सकाळी त्याचा फोन आला. एका नातेवाईकाचा मुलगा त्याला उतरवून घेण्यासाठी नागपूरच्या स्टेशनावर आला होता. पण त्यांचेकडे काही अडचण असल्यामुळे तो त्याला दुस-या नातेवाईकांकडे घेऊन गेला. त्यांनी आपुलकीने त्याची सगळी काळजी घेतली आणि त्याला मुंबईला जाणा-या विमानात बसवून दिले. संध्याकाळपर्यंत तो सुखरूपपणे घरी येऊन पोचला. 

प्रत्यक्ष अनुभवातून तो काही धडे शिकला होता. प्रवासात केव्हा कसली अडचण येईल आणि त्यामधून पैशाची गरज पडेल ते सांगता येत नाही, त्यासाठी काही तरतूद किंवा पर्यायी उपाय नेहमी आपल्या खिशात बाळगायला हवेत आणि परत घरी येऊन पोचेपर्यंत ते सांभाळून ठेवायला हवेत. आजकाल क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम वगैरेंच्या सोयी खूप वाढल्या असल्याने हे काम थोडे सोपे झाले आहे. कोणता माणूस आपल्याला कधी आणि किती उपयोगी पडेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या चांगल्या व्यवहाराने शक्य तितकी माणसे जोडून ठेवणे आपल्या फायद्याचे असते. 

तेंव्हापासून आम्ही कानाला खडा लावला, काहीही कारण असले तरी पाच सहा डिसेंबरला मुंबईकडे येणा-या ट्रेनमधून प्रवास करायचा विचार मनात आणायचा नाही.