Thursday, September 20, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ३ - सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

कुंभमेळा, पंढरपूरची यात्रा, इतर अनेक ठिकाणच्या जत्रा, उरूस वगैरे धार्मिक स्वरूपाचे मेळावे कित्येक शतकांपासून चालत आले आहेत. विशिष्ट तिथीला विशिष्ट दैवतांचे दर्शन घेण्याने महान पुण्य मिळते, पापाचा क्षय होतो, या जन्मात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा अंत होतो, तसेच मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, मनुष्य योनीमध्ये पुनर्जन्म मिळतो किंवा जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते वगैरे आमिषे त्यात काही भाविकांना दिसतात. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा त्यात खंड न पाडता चालवत राहून पुढील पिढीकडे सोपवणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि काहीही करून ते पार पाडणे अत्यावश्यक आहे अशा निष्ठेने काही लोक या यात्रांना जातात. त्याशिवाय एक वेगळा अनुभव, गंमत, हौस म्हणून जाणा-यांची संख्यासुध्दा मोठी असते. या निमित्याने इतकी माणसे एकत्र येतात, त्यांची सेवा करण्याची संधी, किंवा त्यांच्याकडून काही ना काही अर्थप्राप्ती करून घेण्याचा मोह, अशा विविध कारणांमुळे अनेक लोक या यात्रांमध्ये सामील होतात. हे सगळे कित्येक शतकांपासून आजतागायत चालत आले आहे आणि जसजशा वाहतुकीच्या सोयी वाढत गेल्या तशी त्या यात्रेकरूंची संख्या कैकपटीने वाढत आहे.



हे बहुतेक उत्सव एकाद्या पुरातन आणि जागृत समजल्या जाणा-या देवस्थानाच्या ठिकाणी साजरे होत असतात. त्या यात्रांमध्ये काळ आणि स्थानमहात्म्याला फार मोठे महत्व असते. एकाद्या परमभक्ताला यात्रेच्या काळात त्या ठिकाणी जाऊन पोहोचणे काही कारणामुळे शक्य झाले नव्हते, तेंव्हा देवाने प्रत्यक्ष किंवा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले अशी हकीकत अनेक देवस्थानांच्या बाबतीत सांगितली जाते. त्यातून नव्या श्रध्दास्थानाचा उगम होतो, नवी सुरस कथा बनते आणि नवी परंपरा सुरू होते. अशा प्रकारे त्यात भर पडत जाते.

लोकमान्य टिळकांच्या मनात देवभक्तीपेक्षा देशभक्तीची भावना जास्त प्रखर होती. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या मनात देशप्रेम आणि देशाभिमान रुजवावे, त्यांना देशकार्यासाठी उद्युक्त करावे हा लोकमान्य टिळकांचा अंतस्थ हेतू होता, पण देशभक्तीवर केलेली भाषणे लोकांना रुक्ष वाटली असती आणि मुळात ती ऐकण्यासाठी फारसे लोक जमलेच नसते. शिवाय तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर लगेच अंकुश लावला असता. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगळी युक्ती योजणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांच्या निमित्याने खूप माणसे एकत्र जमतात हे लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि त्यातून आपल्याला हवी असलेली जनजागृती करता येईल हे त्यांनी ओळखले, पण त्यांचे अनुयायी बनण्यासाठी लोकांनी त्यांना महंत, स्वामी, बाबा अशा प्रकारचा धर्मगुरू म्हणून मखरात बसवावे हा त्यांचा उद्देश नव्हता. स्वतः एकाद्या देवाचे लाडके परमभक्त असल्याचे न भासवता पण ईशभक्तीचे निमित्य पुढे करून लोकांना कसे आकर्षित करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यावर एक नामी उपाय त्यांनी शोधून काढला आणि अंमलात आणला.

हे काम वाटते तेवढे सोपे नव्हतेच. ते यशस्वी करण्यासाठी लोकमान्यांना भरपूर परिश्रम करावे लागले, अनेकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. एरवी साधा वाडा असलेल्या वास्तूमध्ये काही दिवसांसाठी गणपतीची तात्पुरती प्रतिष्ठापना करणे आणि उत्सव संपल्यानंतर त्याची बोळवण करून त्या जागेत पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण करणे हे भाविक लोकांना पटणे कठीण होते. गणपती या देवाची पूजा अर्चा ही व्यक्तीगत बाब आहे, ती विधीवत (सोवळे वगैरे नेसून) प्रकारे करायला हवी, त्यातले विशिष्ट पूजाविधी, मंत्रोच्चार वगैरेमध्ये कसलीही उणीव येता कामा नये असे समजणारे आणि सांगणारे लोक शंभरावर वर्षे उलटून गेली तरी आजही आपल्याला भेटतात. लोकमान्य टिळकांच्या काळामधल्या कर्मठ लोकांनी तर यात कसलीही हयगय होणे मान्य केलेच नसते. देवघरातल्या देवाला सार्वजनिक जागी आणून ठेवले आणि कोणीही उठून त्याची पूजा करू लागला. यामुळे पावित्र्याचा भंग झाल्याने गणपतीमहाराज रुष्ट झाले आणि त्या पातकाचे शासन म्हणून त्यांनी प्लेगाच्या साथीला पाठवून दिले असे अकलेचे तारेसुध्दा काही मंडळींनी त्या काळात तोडले होते.

हा विरोध इतर काही वेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. यात पूजेच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते,तर दुस-या बाजूला हा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा टिळकांचा एक कुटील डाव आहे असा दुष्ट आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले. लोकमान्यांनी या गोष्टी कशा प्रकारे लोकांच्या गळी उतरवल्या, त्यासाठी कोणकोणते युक्तीवाद केले हे त्या काळामधील लोकच जाणोत.

अठराव्या शतकातल्या पेशवाईच्या काळातच गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे इतर सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. पुण्यामध्येच कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात सन १७६५ साली हा उत्सव सुरू झाला आणि गेली २४८ वर्षे तो चालत आला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू करण्यापूर्वीपासूनच अशा प्रकारे कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. पण तो मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता किंवा तो साजरा करणा-या श्रीमंत मंडळींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन त्य़ात केले जात असे. लोकमान्यांनी त्याला लोकाभिमुख आणि मनोरंजक तसेच उद्बोधक असे वेगळे रूप दिले, त्याला देशभक्तीची जोड दिली आणि तो इतका लोकप्रिय केला की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व एकमताने त्यांना दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. या वेळी टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखात या गणेशोत्सवाचे समग्र वर्णन केले आहेच, त्याला विरोध किंवा त्याची टिंगल करणा-या लोकांवर चांगले आसूड ओढले आहेत. त्यातील कांही मुद्द्यांचा सारांश खाली दिला आहे.

सर्व पुणे शहर गणपतीच्या भजनाने गजबजून गेले होते. निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांनी घेतलेली मेहनत केवळ अपूर्व आहे.

अनेक ठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती प्रेक्षणीय होत्याच, मेळ्यांचा सरंजाम पाहून मती गुंग झाली. त्यात अश्रुतपूर्व असा चमत्कार दृष्टीस पडला.

यंदा नवीन गोष्ट झाली ती म्हणजे गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात झाली. सर्व जातीच्या लोकांनी जातीमत्सर सोडला आणि एका दिलाने आणि धर्माभिमानाने ते मिसळले.

मेळ्यात भाग घेणा-या सुमारे तीन हजार माणसांनी रात्री पाच पाच तास मेहनत घेऊन गाणी बसवली व हजारो स्त्रीपुरुषांनी ती ऐकली.


सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्याने निदान कांही दिवस तरी ते घडतांना दिसले याचे त्यांना समाधान वाटले. सर्व लोकांनी आपापल्या कामात भरभराट केल्यावर हिंदुस्थानची कीर्तीसुध्दा जगभरात पसरेल. इंग्लंड व हिंदुस्थान हे दोन्ही देश प्रलयकाळापर्यंत जगाचे पुढारीपण करतील अशी आशा लोकमान्यांनी या लेखात व्यक्त करून त्यासाठी सर्वांना बुध्दी देण्याची प्रार्थना केली आहे. हा अग्रलेख १८९३ सालचा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी तोंवर केलेली नव्हती. सनदशीर मार्गाने देशाची प्रगती करणे हे त्या काळात त्यांचे ध्येय होते.


 . . . .  .. . . . . . . . . . . .  . . . . .  (क्रमशः)
------------------------------------------------------

No comments: