Thursday, July 28, 2011

स्मृती ठेउनी जाती - २ - नीलिमा करंदीकर

पंधरावीस वर्षांपूर्वी एका कसल्याशा समारंभाला किंवा कार्यक्रमाला गेलो असतांना तिथे त्या मला पहिल्यांदा भेटल्या, म्हणजे अलकानेच त्यांची माझ्याशी ओळख करून दिली. "ही माझी मैत्रिण, नीलिमा करंदीकर !"


"नमस्कार, कशा आहात? किंवा कुठून आलात?" वगैरे औपचारिक प्रश्न विचारून मी संभाषणाची सूत्रे त्या दोघींच्याकडे सुपूर्त केली. कुणाच्या तरी घरी झालेली गायनाची बैठक किंवा एकादा महिला समाज अशा ठिकाणी या दोघी भेटल्या होत्या आणि तशा प्रकारच्या निमित्याने वारंवार भेटत राहिल्यामुळे परिचयाचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत होऊन ती वृध्दिंगत होत गेली. नीलिमा करंदीकर या नावावरून एका सुखवस्तू, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय गृहिणीची जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहील तिच्याशी मिळते जुळते असेच त्यांचे वागणे, बोलणे आणि दिसणे होते. त्यामुळे एका भेटीतून कदाचित ते लक्षात राहिलेही नसते. पण त्यानंतरही आमची गाठ पडत गेली आणि ओळख निर्माण झाली.

चेंबूर भागात होणा-या गायनाच्या बैठकी, उत्सव, महोत्सव वगैरे ठिकाणी आम्हाला त्या हमखास भेटायच्या आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा मध्यंतरात आमचा थोडा वार्तालाप व्हायचा. नीलिमाताई स्वभावाने बोलक्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यांचे स्वतःचे रडगाणे किंवा आत्मप्रौढी त्यांच्या बोलण्यात येत नव्हती. यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधला जात असे. आजूबाजूच्या परिस्थितीचे आणि घटनांचे उत्तम आकलन, वाचनातून आलेली प्रगल्भता, मनमिळाऊ व खिलाडू वृत्ती आणि संवादाला नर्म विनोदाची झालर यामुळे त्यांच्याबरोबर बोलतांना मजा येत असे. पण काही काळानंतर अशा कार्यक्रमात त्या येईनाशा झाल्या. त्यांना आर्थराइटचा त्रास सुरू होऊन जिन्याच्या पाय-या चढणे, जमीनीवर खाली बसणे वगैरे करणे कठीण होऊ लागले होते असे समजले. अधून मधून अलकाचा त्यांच्याशी फोनवर संपर्क होत असे. त्या रहात असलेल्या बाजूला गेल्यास ती त्यांना भेटून येत असे. त्यातून त्यांची खुशाली कळत असे.

एके दिवशी आम्हाला असे कळले की नीलिमाताईंना कोणी धन्वंतरी भेटला आहे आणि त्या आता खडखडीत ब-या होण्याच्या मार्गावर आहेत. ते ऐकून खूप आनंद झाला, पण थोडे आश्चर्यही वाटले. आर्थराइटिस हा बरा न होणारा दुर्धर विकार असतो, तो फार फार तर लांबवता किंवा रोखता येतो, अशी माझी समजूत होती आणि हा विकार झालेला कोणी रुग्ण बरा झाल्याचे उदाहरण मी ऐकले नव्हते. पण नीलिमाताईंना प्रत्यक्ष अनुभव आल्याचे त्याच सांगत असल्यामुळे त्याबद्दल शंका वाटण्याचे कारण नव्हते. माझ्या एका मित्राला आर्थराइटिसची लक्षणे दिसू लागली असल्यामुळे त्यालाही याचा लाभ मिळवून द्यावा हा हेतू मनात धरून आम्ही नीलिमाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो.

त्यांनी आमचे मनापासून स्वागत आणि आदरातिथ्य केले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपल्याला आलेला चांगला अनुभव सांगितला. त्यांच्या प्रकृतीमध्ये पडलेला चांगला फरक दिसतही होता. त्यांना भेटलेल्या वैद्याचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर वगैरे आम्ही घेऊन आलो आणि की माहिती माझ्या मित्राला दिली. तो एक वैज्ञानिक संशोधक आहे आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सक वृत्तीने खात्री करून घेण्याची त्याला सवय आहे. आर्थराइटिस हा विकार कशामुळे होतो हे त्याने समजून घेतलेले होतेच, तो बरा व्हायचा झाल्यास कशा रीतीने बरा होऊ शकतो हे समजून घेणे त्याला आवश्यक वाटले. त्याने नेमके काय संशोधन केले कोण जाणे पण त्यातून असा निष्कर्ष काढला की हे वैद्यबुवा आयुर्वेदिक आणि होमिओपाथिक औषधांसोबत उत्साहवर्धक स्टेरॉइड्स देत असावेत. त्यामुळे अंगात अधिक ऊर्जा खेळू लागते आणि बरे वाटत असल्याचा तात्पुरता आभास निर्माण होतो.

नीलिमाताईंना हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना सुरुवातीला वाटत असलेला त्यांच्या प्रकृतीमधला फरक पुढे वाटेनासा झाला आणि त्या कायमच्या अंथरुणाला खिळल्या. आमच्या मुलाच्या लग्नाचे बोलावणे करायला आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा त्या अंथरुणातच होत्या, दुस-याच्या आधाराने उठून बसल्या आणि आमच्याशी उर्धा पाऊण तास बोलल्या. जुन्या आठवणी, ताज्या बातम्या आणि भविष्यातल्या योजना असे त्रिकाळात आम्ही फिरून आलो. त्यांची स्थिती उघडपणे दयनीय वाटत असली तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती, त्यांनी तिचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला होता. कोणीही त्यांची कीव करावी हे त्यांना पसंत नव्हते. बोलतांना शक्यतोवर तो विषय टाळूनच त्या पुढे जात होत्या. आम्हा दोघांचा आपापल्या क्षेत्रामधील प्रगतीचा आलेख त्या काळात वर वर चढत होता. त्याबद्दल त्या आपुलकीने विचारपूस करून आमचे अभिनंदन आणि कोतुक करत होत्या. त्यांचे आयुष्य एका अर्थाने तिथेच थांबले होते असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. कोठल्याही क्षेत्रात मिळवलेले स्थान ताब्यात ठेवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. संगीताच्या क्षेत्रात तर ते अत्यंत आवश्यक असते. नियमित रियाज चालू ठेवला तरच तालासुरावरची पकड कायम राहते. अशा अवस्थेत नीलिमाताईंना ते कितपत जमणार होते याची शाश्वती नव्हती.

पण एक खिडकी बंद झाली तर दुसरी उघडते असे म्हणतात. त्यांना वाचनाची आवड होतीच, तिकडे अधिक लक्ष वळवले आणि लिहायला सुरू केले. त्यांच्यातली सुप्त कवयित्री जागृत झाली. अंथरुणात पडल्या पडल्या त्या कविता रचू लागल्या. पुढे पुढे बोटात पेन धरून हवे तसे लिहिणेसुध्दा त्यांना कठीण झाल्यावर त्या रचलेले शब्द सांगत आणि घरातली मंडळी ते शब्द लिहून घेत असत. त्यांच्या निवडक रचनांचे मी या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात आले.

सह्याद्री वाहिनीवर 'हॅल्लो सखी' या नावाचा एक कार्यक्रम सादर होत असतो. हा कार्यक्रम मुख्यत्वे 'सखींनी सखींसाठी' प्रस्तुत केला असतो अशी समजूत झाल्यामुळे मी नियमितपणे पहात नाही. पण रिमोटशी चाळा करतांना एकादी गाण्याची लकेर, रोगावरील उपचाराची माहिती किंवा निसर्गरम्य सुंदर ठिकाणाचे दृष्य त्यावर दिसले तर तो चॅनेल बदलत नाही. अशा प्रकारे अचानकपणे जेंव्हा जेंव्हा मी हा कार्यक्रम पाहिला तेंव्हा योगायोगाने असे ऐकू आले, "आता चेंबूरहून नीलिमा करंदीकर यांचा फोन आला आहे." त्यानंतर नीलिमाताईंच्या परिचित आवाजातला प्रश्न ऐकायला येत असे. अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार आणि नेमका मुद्द्याला हात घालणारा असा त्यांचा प्रश्न हा अशा कार्यक्रमात प्रश्न कसे विचारावेत याचाच वस्तुपाठ असे. अनेक वेळा प्रश्न विचारणारे गोंधळून जातांना दिसतात. तसे नीलिमाताईंच्या बाबतीत होतांना दिसले नाही. त्यांचा प्रश्न फक्त त्यांना पडलेला नसून सर्व श्रोत्यांना उपयुक्त माहिती मिळवून देणारा असे.

आठवडाभरापूर्वी एकदा अचानक हॅल्सो सखी हा कार्यक्रम पडद्यावर दिसला. त्यातला मध्यवर्ती विषय माझ्या दृष्टीने जिव्हाळ्याचा नव्हता, तरीसुध्दा नीलिमाताई यावर काय विचारणार आहेत ते पहावे म्हणून मी तो कार्यक्रम पहात राहिलो, पण अखेरपर्यंत त्यांचा आवाज कानावर पडलाच नाही. त्य़ामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. त्याच संध्याकाळी अलकाला तिच्या एका मैत्रिणीने फोन करून नीलिमाताईंच्या निधनाची बॅड न्यूज सांगितली. त्यांच्या तब्येतीमधले चढउतार समजत राहण्याएवढे त्यांच्या कुटुंबियांशी आमचे घनिष्ठ संबंध राहिले नव्हते हे खरे असले तरी आम्हाला थोडी कल्पना मिळाली असती तर नक्कीच त्यांना जाऊन भेटून आलो असतो. पण आता हळहळ वाटण्यापलीकडे काही आमच्या हातात राहिले नव्हते.

नीलिमाताईंच्या लेखणीमधून उतरलेल्या त्यांच्या कवितेतून त्यांची विचारसरणी कशी स्पष्ट होते पाहू.

मी - एकाक्षरी, लहान शब्द
सा-या सृष्टीला वेढणारा, नाते सांगणारा
आत्मविश्वास, स्वाभिमान, अहं दाखवणारा ।।

मी - एक ताकदवान शब्द,
सारे जग इकडचे तिकडे करणारा
भल्याभल्यांना पाणी पाजणारा ।।

मी - एक बाणेदार शब्द,
संकटांशी झुंजत, विजेसारखा तळपणारा
आकाशाला गवसणी घालू पहाणारा ।।

मी - एक शांत आश्वासक शब्द,
धैर्य, शांती देणारा
परमात्म्याशी नाते जोडणारा ।।

मी - एक संबंधसूचक शब्द,
हा असेल तर जग असते
हाच नसेल तर जग शून्य ।।







Monday, July 18, 2011

पंढरपूरचा विठोबा - १,२,३,४

पंढरपूरचा विठोबा

माझे आईवडील त्यांच्या पिढीमधील इतर लोकांप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच भाविक प्रवृत्तीचे होते. माझ्या वडिलांच्या मनात पंढरीच्या विठोबाबद्दल अपार श्रद्धा होती. गळ्यात तुळशीची माळ धारण करून ते अधिकृत वारकरी झाले नव्हते, पण दरवर्षी न चुकता ते पंढरीची वारी करायचे. त्या सुमारास येणारे रेल्वेमधील अमाप गर्दीचे लोंढे आणि पंढरपुरामध्ये राहण्याखाण्याच्या सुव्यवस्थेचा अभाव यामुळे होणारे अतोनात हाल सोसण्याची शारीरिक क्षमता आणि मानसिक बळ त्यांच्यापाशी होते. घरातील इतरांना मात्र ते जमणार नाही या विचाराने ते एकटेच पंढरपूरला जाऊन येत असत. पंढरपूर आणि तिथला विठोबा यांचा उल्लेख नेहमी कानावर पडत राहिल्यामुळे माझ्या मनात त्यांच्यासाठी एक विशिष्ट जागा तयार झाली होती.

पंढरपूरच्या वारीसंबंधात पूर्वी मी एक लेखमालिका लिहिली होती. निरनिराळ्या संतांनी लिहिलेल्या अभंगवाणीचा त्यात प्रामुख्याने उल्लेख केला होता. पारंपरिक अभंगांच्या सहाय्यानेच मी या अजब सोहळ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिक काळातील गीतकारांच्या रचनांमधून या विषयावर या लेखात लिहिले  आहे.

संतांच्या जीवनावर काढलेल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभंगांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न होत असतोच. शिवाय त्यांना आधुनिक काळातील गीतकारांनी केलेल्या गीतांची जोड दिली जाते. चित्रपटातल्या वातावरणाशी जुळेल अशा भाषेचा उपयोग करून लिहिलेली ही गाणी कित्येक वेळा तीन चारशे वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. दिवसाची सुरुवात मंगल प्रभातसमयी गायिलेल्या भूपाळीने होत असे. त्या परंपरेला धरून श्रीविठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदीमांनी लिहिलेली ही मधुर भूपाळी पहा.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।

दारी तव नामाचा चालला गजरू।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू।
दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।। आता जाग बा विठ्ठला ।

दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।। आता जाग बा विठ्ठला ।

विठ्ठलाला जागे करून झाल्यानंतर त्याची मनोभावे पूजाअर्चा करायची, त्याचे गुण गायचे. हे सगळे करतांना मनात कुठेतरी कसले तरी मागणे खदखदत असतेच. सामान्य लोक लगेच ते मागून मोकळे होतात. संत सज्जन त्यांच्या मनावर ताबा ठेवतात. पण कधी हताशपणा आला तर मात्र निरुपायाने त्यांनाही विठ्ठलाचाच धावा करावा असे वाटते. कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांच्याच लेखणीतून उतरलेला हा धावा. भगवंताने पूर्वी कुणाकुणा भक्ताला कशी मदत केली होती यांची उदाहरणे देऊन आपल्या सहाय्यासाठी धावून येण्याची गळ त्यात त्याला घातली आहे.

धाव-पाव सावळे विठाई का मनी धरिली अढी ।
अनाथ मी अपराधी देवा, उतरा पैलथडी ।।

एकनाथा घरी पाणी वाहिले गंगेच्या कावडी ।
कबीराचे ते शेले विणुनी त्याची घालिसी घडी ।।
जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेच्या थडी ।
गजेंद्राचा धावा ऐकोनि वेगे घालिसि उडी ।।

विठ्ठलाचे गुणगान करतांना त्याच्याशी आपले जवळचे नाते जोडण्याचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केला होता. वैकुंठात राहणारा विष्णू किंवा कैलासातल्या शंकरासारखा विठ्ठल दूरस्थ देव नाही. तो आपल्या कुटुंबातलाच आहे. विठोबाच आपले मायबाप, बंधूभगिनी, गुरू वगैरे सर्व काही असल्याचे सांगणारे अनेक प्रसिदध अभंग आहेत. याच आशयावर जगदीश खेबूडकर यांनी असे लिहिले आहे.

विठुमाऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा ।
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला मायबापा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

लेकरांची सेवा केलीस तू आई ।
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला पांडुरंगा ।
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची, माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।

क्षेत्र पंढरपूर आणि तेथील विठ्ठलरखुमाई ही दैवते यांच्याबद्दलचा भक्तीभाव मधुकर जोशी यांच्या या गीतात दिसतोच, शिवाय आपला हा आवडता देव कसा भावाचा भुकेला आहे आणि भक्तांचिया काजासाठी, त्यांच्या प्रेमासाठी धाव घेऊन जातो हेसुध्दा या गीतात सांगितले आहे.

पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई ।
जय जय विठ्ठल रखुमाई ।।

क्षेत्र असे हे परमार्थाचे ।
पावन जीवन हो पतितांचे ।
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी ।।१।।

द्वारावतिचे देवकिनंदन ।
गोरोबास्तव भरती रांजण ।
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी ।।२।।

आसक्तीविण येथे भक्ती ।
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती ।
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई ।।३।।
. . . . . . . . . . . . . . .

ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळापासून ते आजपर्यंत विठ्ठलाचे भक्त त्याचे गुणगान आणि प्रार्थना भजने आणि पदे या काव्यमाध्यमातून करत आले आहेत. अलीकडच्या काळातल्या कवींनी रचलेल्या काही रचना पाहू. माझ्या लहानपणी मी ऐकलेले माणिक वर्मा यांचे हे गाणे किती गोड आहे ? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी किंवा रूप पाहता लोचनी यासारख्या संतांच्या अभंगातला भाव यात आहेच. हे सांगणारी स्त्री असल्यामुळे जरा जास्त भावुक होऊन त्याच्या स्मरणाने मोहरून गेली आहे.

विठ्ठला रे, तुझ्या नामी रंगले मी, रंगले मी ।
रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।

तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।

तुझी सावळी ही कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।

तुझ्या भजनी रंगता, हृदय काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सख्या कांता, मोहरते मी रोमरोमी ।।

कवी सुधांशु यांनी लिहिलेल्या, दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजाने ऩटलेल्या खालील गीताची गोडी अवीट आहे. विठ्ठलाच्या साजि-या गोजि-या रूपाबरोबरच पंढरपूरला जमलेल्या भक्तांच्या मेळाव्याचे वर्णनही या गाण्यात आले आहे. विठोबा हा भक्तांचा जवळचा सखा त्यांच्या सहवासात रंगतो, त्यांच्याबरोबर डोलतो, नाचतो, बागडतो वगैरे त्याची वैशिष्ट्ये यात आली आहेत.

देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा ।।

विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले, भक्तीचा मळा ।।

साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर ।
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा ।।

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ।
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा ।।

कवीवर्य बा.भ.बोरकर यांनी पांडुरंगाचे गुणगान एका वेगळ्या आध्यात्मिक पातळीवर केले आहे. भक्ती, श्रद्धा यांनी ओथंबलेल्या त्यांच्या मनाला विठ्ठल हा एकाच ओळीत चंदनासारखा शीतल आणि इंधनासारखा ऊर्जस्वी व प्रकाशमान भासतो. अखेरच्या ओळीत ते स्वतःचे अस्तित्वच पांडुरंगात विलीन होऊन त्याच्याशी एकरूप झाल्याचे सांगतात.

पांडुरंग त्राता पांडुरंग दाता । अंतीचा नियंता पांडुरंग ॥१॥
दयेचा सागर मायेचे आगर । आनंदाचे घर पांडुरंग ॥२॥
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा । श्रद्धेचा विसावा पांडुरंग ॥३॥
तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन । प्रकाश वर्धन पांडुरंग ॥४॥
अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग । देहीचा साष्टांग पांडुरंग ॥५॥

दशरथ पुजारी यांचे संगीत आणि सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातले कवयित्री शांताबाई जोशी यांच्या गीतात विठोबाचे गुणगान वेगळ्या त-हेने केले आहे. इतक्या सुरेख आणि सर्वांना प्रिय असणा-या विठ्ठलाची रखुमाई झाल्याबद्दल त्यात तिचे कौतुक केले आहे. सर्वसाधारण मनोवृत्ती असलेल्या बाईला असा क्षणात इकडे क्षणात तिकडे जाणारा नवरा मिळाला तर कदाचित वेगळे काही वाटेल, पण ती रखुमाई आहे आणि भक्तांसाठी इकडे तिकडे जात असला तरी तो विठ्ठल तिच्या बाजूला अठ्ठावीस युगे एका विटेवर उभा आहे.

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।

मेघासम जो हसरा श्यामल, चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता, रूप दिसे ठायी ठायी ।।

भक्तांचा जो असे आसरा, ह्या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे, हाकेला ग धाव घेई ।।
. . . . . . . . .


पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या गीतकार संगीतकार जोडीने मराठी रसिकांना अप्रतिम गाण्यांचा जो ठेवा देऊन ठेवला आहे त्याला जोड नाही. भावनांनी ओथंबलेली त्यांची अजरामर गाणी आहेतच, विठ्ठल या मराठी माणसाच्या अत्यंत प्रिय देवाची आळवणी करणारी गीतेसुद्धा त्यांनी दिली आहेत. लता मंगेशकरांचे खाली दिलेले अजरामर गीत संत जनाबाई विठ्ठलाला म्हणते आहे की मीराबाई तिच्या गिरधर गोपालाला असा संभ्रम आधी पडतो आणि तिची ही आर्तता मुक्तीसाठी आहे हे शेवटच्या ओळीत वाचल्यावर आपल्याला प्रेमभावनेतून थेट अध्यात्माकडे नेते.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।
नेत्रकमल तव नित फुललेले, प्रेममरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी, मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती, प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीति, अमृतमंथन करिते ।।२।।
जनी लाडकी नामयाची, गुंफुन माला प्राणफुलांची ।
अर्पून कंठी मुक्तीसाठी, अविरत दासी झुरते ।।३।।

आशाताईंनी गायिलेल्या खालील लोकप्रिय गीतात पांडुरंगाचे वर्णन विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे तर त्या गाण्यात जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे हे सत्यकथन केले आहे.

धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धिउघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

वरील गीताच्या शेवटल्या ओळीत बंधुत्वाचा पुरस्कार केला आहे. पी.सावळाराम यांच्या मनातल्या सामाजिक बांधिलकीला खालील गाण्यात बहर आला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला आलेले बाजारू रूप पाहून रखुमाई इतकी व्यथित झाली आहे की तिला क्षणभरही तिथे रहावेसे वाटत नाही. ख-या भक्तमंडळींना बाजूला सारून भोंदू लोकांनी देवाचा संपूर्ण ताबा घेतला हे तिला असह्य झाले आहे. आपण आता इथून निघूया, तुम्हाला नसेल यायचे तर मला तरी निरोप द्या असे ती विठोबाला काकुळतीने म्हणते.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला ।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा ।
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।

खालील गाण्यात पी.सावळाराम यांनी पंढरीतील परिस्थितीवर एका वेगळ्या प्रकारे भाष्य केले आहे. देव चराचरात भरलेला असतो, तो सगळीकडेच असतो असे आपण समजतो, तरीही त्याच्या दर्शनासाठी देवळात जातो. पण या गाण्यातली स्त्री असे सांगते की मी असे काही केले नाही, फक्त स्वतः चांगली वागले आणि काय चमत्कार पहा, तोच मला भेटायला माझ्याकडे आला. पुंडलीकाची मातापितासेवा पाहून तर तो स्वर्गातून त्याला भेटायला पंढरपूरला आला होता. त्याचप्रमाणे सद्वर्तनाची कदर करून तोच भक्ताकडे जातो असे या गाण्यात सुचवले आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।
तुळसी-माळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ ।
पंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ ।
देव्हाऱ्यात माझे देव त्यांनी केला प्रतिपाळ ।
चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती ।
शिकवण जन्माची ती बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला ।।२।।

देवळात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापेक्षा मानवतेचे वर्तन हे अधिक धार्मिकतेचे लक्षण असते या विचाराचा पी.सावळाराम यांनी पुरस्कार केला आहेच. आईबाप हे सर्वात मोठे दैवत माझ्याजवळ असतांना त्यांना सोडून पंढरपुराला जायची मुळी मला गरजच नाही. असे खालील गाण्यातली नायिका ठामपणे सांगते.

विठ्ठल रखुमाई परी ।
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी ।
कशाला जाऊ मी पंढरपुरी ?
कैलासाहुनी थोर मन हे माझ्या बाबांचे ।
शंकराला विष न पचले प्रपंच दु:खाचे ।
पचवुन देती अमृत मजला संत वचनांचे ।
पुंडलिकापरी हात जोडुनी सदैव सामोरी ।।१।।
सात समिंदर भरूनी उरली माया आईची ।
प्रेमळतेला उपमा नाही वाणी ज्ञानेशाची ।
मंगल शोभा जिच्या ललाटी कोटी चंद्राची ।
वत्सलमूर्ति माय माउली मानस - देव्हारी ।।२।।
विटेवरचे जगजेठी हे आले माझ्यासाठी ।
संसाराचा थाट मांडुनी केली मजला मोठी ।
करपुष्पांची माला घालुन तुमच्या मी कंठी ।
चरणांचे हे तीर्थ घेत्ये चंद्रभागेपरी ।।३।।

-----------------------------------------------------------

आपापल्या काळात तुफान लोकप्रियता पावलेली आणि मलाही आवडलेली निरनिराळ्या प्रकारची चार गाणी या समारोपाच्या भागात देणार आहे. दत्ता पाटील यांनी लिहिलेल्या आणि विठ्ठल शिंदे यांनी पारंपारिक अभंगाच्या धाटणीवर गायिलेल्या पाउले चालती या गाण्यात भक्ताच्या मनःस्थितीचे वर्णन केले आहे. रोजच्या आयुष्यात दारिद्र्याने गांजलेल्या भक्ताची पावले वारीची वेळ आली की आपोआप पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करू लागतात आणि देवदर्शनाचा प्रसाद घेतल्यानंतर त्याला नवचैतन्य प्राप्त होते, त्याचे उद्विग्न मन शांत होते आणि संसार गोड वाटायला लागतो. असे हे सरळ सोपे भक्तीगीत आहे.

पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडुनिया गाठ ।।
   गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने, पडता रिकामे भाकरीचे ताट ।
   आप्त‍इष्ट सारे सगेसोयरे ते, पाहुनिया सारे फिरविती पाठ ।।
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट ।
मन शांत होता पुन्हा लागे ओढ, तैसा आणि गोड संसाराचा थाट ।।

विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याने ज्या अनेकांना वेड लावले आहे त्यांच्यात माझासुद्धा समावेश होतो. हे गाणे मी पहिल्यांदा ऐकल्यापासून आजतागायत या गाण्याचा नंबर माझ्या टॉप टेनमध्ये लागत आला आहे. सुधीर फडके यांनी लावलेली चाल आणि दिलेल्या स्वराने ते अजरामर झाले आहेच, पण ग दि माडगूळकरांच्या शब्दरचनेला तोड नाही. जसजसे माझे अनुभवविश्व समृद्ध होत गेले तसतसे मला त्यात जास्त सखोल अर्थ सापडत गेले. याचा शब्दशः अर्थ घेतल्यास विठ्ठल नावाच्या अलौकिक कुंभाराला उद्देशून हे गाणे म्हंटले आहे, त्यात आधी त्याची तोंडभर स्तुती करून अखेर त्याच्या वागण्यामधील विसंगतीचा जाब त्याला विचारला आहे असा अर्थ निघतो. पण हे गाणे रूपकात्मक आहे हे उघड आहे. विठ्ठल म्हणजे तो जगाचा नियंता आणि त्याने तयार केलेली मडकी म्हणजे यातले सारे जीव, विशेषतः माणसे असा त्यातला छुपा अर्थ आहे. जगाचा जेवढा अनुभव येत जाईल त्याप्रमाणे त्या माणसांमधली तसेच त्यांच्या नशीबांमधली विविधता याची उदाहरणे मिळत जातात आणि त्या शब्दांमध्ये दडलेल्या अर्थाच्या अधिकाधिक छटा दिसतात. जास्त विचार केल्यानंतर मला वाटले की हा कुंभार कोणत्याही सृजनशील (क्रिएटिव्ह) कलाकाराचे प्रतीक असू शकतो. गदिमांसारखा कवी किंवा एकादा चित्रकार किंवा नटश्रेष्ठ आणि त्यांच्या रचना यांच्या संदर्भात या गाण्यातल्या ओळींचा वेगळा अर्थ काढता येतो. अखेर अंतर्मुख होऊन विचार केला तर विठ्ठल हा आपला अंतरात्मा आहे आणि आपल्याला तो निरनिराळ्या प्रकारे घडवत आला आहे असेही वाटते. गदिमांना हे सर्व अर्थ किंवा एवढेच अर्थ अपेक्षित होते असे माझे म्हणणे नाही. आणखी कोणी यापेक्षा वेगळे इंटरप्रिटेशन करू शकेल. ही या गाण्याची खुबी आहे आणि त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य त्यात दिसते.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।
माती, पाणी, उजेड, वारा, तूच मिसळसी सर्व पसारा ।
आभाळच मग ये आकारा.
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे,
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
न कळे यातुन काय जोडीसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।

झेंडा या मागील वर्षी येऊन गेलेल्या सिनेमातले अरविंद जगताप यांनी लिहिलेले शीर्षकगीत चांगले गाजले होते. टीव्हीवरील मराठी सारेगमप या मालिकेमुळे जगापुढे आलेल्या ज्ञानेश्वर मेश्राम या आळंदीच्या भजनगायकाला त्या स्पर्धेचे परीक्षक अवधूत गुप्ते यांनी पार्श्वगायनाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले. खरे तर हे गाणे म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आहे. इथल्या अनुभवाने गोंधळलेला माणूस अखेर आपले गा-हाणे विठ्ठलापुढे मांडून त्यालाच मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. त्यामुळे विठ्ठला अशी त्याला घातलेली साद एवढाच या गाण्याचा विठ्ठलाशी संबंध आहे.

जगन्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं ... आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भिती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता उगा माथेफोडी, दगडात माझा जीव होता,
उजळावा दिवा म्हणुनीया किती मुक्या बिचाऱ्या जळति वाती,
वैरी कोण आहे इथे कोण साथी,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

बुजगावण्या गत व्यर्थ हे जगनं, उभ्या उभ्या संपून जाई,
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं, कुंपन हिथं शेत खाई,
भक्ताच्या कपाळी सारखीच माती तरी, झेंडे येगळे येगळ्या जाती,
सत्येचीच भक्ती सत्येचीच प्रिती,
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती ?

देवकीनंदन गोपाळा या संत गाडगे महाराजांच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटातले विठ्ठलाच्या पायी थरारली वीट हे गाणे सर्वच दृष्टीने मनाला भिडणारे आहे. गदिमांनी केलेली उत्कट शब्दरचना, राम कदम यांचे संगीत आणि भारतरत्न पं.भीमसेनजींनी त्यावर केलेली सुरांची बरसात यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे. भैरवी रागातील या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली तर त्याचे आर्त स्वर खूप वेळ मनात घुमत राहतात. या गाण्यात विठ्ठलाचे नामस्मरण नाही की त्याची प्रार्थना नाही की त्याला केलेली विनंती किंवा मागणेही नाही. संत गाडगेबाबांच्या महानिर्वाणाने सर्व संत व्याकुळ झाले आणि प्रत्यक्ष विठ्ठलावर त्याचा एवढा आघात झाला की त्याच्या पायाखालील विटेपर्यंत त्याची कंपने गेली अशी कल्पना गदिमांनी या गीतामध्ये मांडली आहे.

विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, राउळीची घाट, निनादली ॥१॥
     ज्ञानोबांचे दारी शहारे पिंपळ, इंद्रायणी-जळ, खळाळले ॥२॥
उठला हुंदका देहूच्या वाऱ्यात, तुका समाधीत, चाळवला ॥३॥
     सज्जनगडात टिटवी बोलली, समाधी हालली, समर्थांची ॥४॥
एका ब्राम्हणाच्या पैठणपुरीत, भिजे मध्यरात्र, आसवांनी ॥५॥
     अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव, निघाला वैष्णव, वैकुंठासी ॥६॥
संत-माळेतील मणी शेवटला, आज ओघळला, एकएकी ॥७॥


. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)


Friday, July 08, 2011

अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७

ग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्स



वीज आणि ऊष्णता या ऊर्जेच्या दोन रूपांमध्ये काहीसा एकतर्फी संबंध असतो. आपल्या घरातले दिवे, टोस्टर, गीजर किंवा कारखान्यातल्या विजेच्या भट्ट्या, वेल्डिंग मशीन्स वगैरे असंख्य उपकरणांमध्ये विजेचे रूपांतर ऊष्णतेमध्ये सहजपणे होते. त्यासाठी या उपकरणातून विजेचा प्रवाह फक्त वहात जातो आणि त्याच्या वहनाला होत असलेल्या अडथळ्यामुळे ऊष्णता बाहेर पडते. पण याच्या उलट ऊष्णतेच्या इकडून तिकडे जाण्यामधून मात्र वीज तयार होत नाही. थर्मोकपलमध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ऊष्णतेपासून वीज मिळते आणि त्यावरून ऊष्ण वस्तूचे तपमान मोजता येते. कृत्रिम उपग्रहांमधील थर्मोपाइल्समध्ये अशा प्रकारे अल्पशी वीज तयार करून काही इन्स्ट्रुमेंट्स चालवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. ऊष्णतेपासून मोठ्या प्रमाणावर थेट वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आजमितीला उपलब्ध नाही. ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ बनवायची आणि त्यावर इंजिन किंवा टर्बाइन चालवून त्याला विजेचा जनरेटर जोडायचा हाच राजमार्ग पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध होता आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.

अणू ऊर्जेचा शोध लागल्यानंतर तिचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. शिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये अणूऊर्जेची निर्मिती झाली. पण या प्रयोगाची माहिती या कानाची त्या कानालासुद्धा कळणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली होती. अमेरिकेत हा यशस्वी प्रयोग झाला असला तरी रशिया, इंग्लंड, जर्मनी आदि इतर प्रगत देशातसुद्धा यावर गुप्तपणे संशोधन चालले होतेच. अणूशक्तीच्या क्षेत्रामधील त्यांची स्पर्धा पडद्या आड चालली होती. तो काळ महायुद्धाचा होता आणि संशोधकांचे लक्ष विनाशकारी अस्त्रांच्या निर्मितीवर एकवटले होते. तरीसुद्धा त्याबरोबर विजेच्या निर्मितीसाठीही संशोधन होत होते आणि युद्ध संपल्यानंतर त्याला वेग आला.

शिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये युरेनियम हे इंधन आणि ग्राफाइट हे मॉडरेटर होते. प्रयोगासाठी रचना आणि पुनर्रचना करायला हे सोयीचे होते. या विषयावर अत्यंत गुप्तता बाळगण्याच्या त्या काळात अमेरिकेखेरीज इतर प्रगत राष्ट्रांनीसुद्धा अशा प्रकारचे प्रायोगिक रिअॅक्टर बनवले असणारच. त्यापासून वीजनिर्मितीसाठी करण्याचे प्रयत्नही सगळ्यांनी गुपचुपपणे निरनिराळ्या मार्गांनी केले. त्यांना यश येऊन त्यापासून तयार झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाऊ लागल्यानंतर त्याविषयीची माहिती हळूहळू बाहेर आली. ग्राफाइट मॉडरेटेड रिअॅक्टर आणि साधा बॉयलर यांचा संयोग करून सोव्ह्एट युनियनने आरबीएमके नावाचे रिअॅक्टर्स उभारले. रशियन भाषेत (reaktor bolshoy moshchnosti kanalniy म्हणजे High Power Channel-type Reactor). या रिअॅक्टरमध्ये बसवलेल्या नलिकांमधून पाणी आत सोडले जाते आणि ते उकळून तयार झालेली वाफ बाहेरील ड्रममध्ये जमा होते. अशा प्रकारचे रिअॅक्टर्स फक्त कम्युनिस्ट जगातच होते. इतर कोणी त्यांची उभारणी केली नव्हती. १९८६ साली झालेल्या चेर्नोबिल येथील अॅक्सिडेंटनंतर अशा प्रकारचे नवे रिअॅक्टर्स उभारणे बंद झाले. सोव्हिएट युनियनची शकले झाल्यानंतर युक्रेन आणि लिथुआनियामधले चालत असलेले सारे आरबीएमके रिअॅक्टर बंद केले गेले. रशियामध्ये मात्र असे काही रिअॅक्टर्स मूळच्या डिझाइनमध्ये सुधारणा करून अजूनही कार्यरत आहेत. आरबीएमके रिअॅक्टर्समध्ये प्रत्यक्षात किंचित समृद्ध (स्लाइटली एन्रिच्ड) युरेनियम हे इंधन वापरले जाते. पण नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांचा उपयोग करून रिअॅक्टर्स उभे करणे अशा प्रकारात तात्विक दृष्ट्या (थिअरॉटिकली) शक्य आहे. यामुळे त्यातल्या तांत्रिक अडचणींवर मात करता आली आणि त्याच्या सुरक्षिततेची संपूर्णपणे विश्वासार्ह अशी भक्कम प्रकारची व्यवस्था करता आली तर भविष्यकाळात या प्रकाराचे पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र याचे महत्व संपुष्टात आले आहे.

अमेरिकेतील विद्युत निर्मितीचे काम पूर्णपणे खाजगी क्षेत्रात चालते. त्यामुळे यातील नफातोट्याचा विचार करून त्यात भांडवल गुंतवले जाते. त्या देशात पीडब्ल्यूआर आणि बीडब्ल्यूआर हे दोनच प्रकार मुख्यत्वाने पुढे आले, इतकेच नव्हे तर अशा प्रकारचे रिअॅक्टर्स अमेरिकन कंपन्यांनी जगभर अनेक देशांना विकले. महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात तत्कालीन राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून ब्रिटिश सरकारने ग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्सना भरघोस पाठिंबा दिला. मॅग्नॉक्स या नावाने प्रसिद्ध झालेले हे रिअॅक्टर्स यूकेमधील अनेक जागी स्थापले गेले. अणूशक्तीचा अभ्यास आणि विकास यासाठी रिअॅक्टर हवेत आणि त्यातून निघालेली ऊष्णता बाहेर काढून त्यांना थंड करणेही आवश्यकच असते. या ऊष्णतेचा उपयोग करून घेऊन जमेल तेवढी वीजनिर्मिती करून घ्यावी असा सूज्ञ विचार करून पन्नास साठ ते दीड दोनशे मेगावॉट क्षमतेचे वीस पंचवीस रिअॅक्टर त्यांनी बनवले आणि त्यांचा प्राथमिक उद्देश सफळ झाल्यानंतर ते मोडीतही काढले. त्यातला सर्वात मोठा सुमारे पाचशे मेगावॉट क्षमतेचा प्लँटही आता चाळीस वर्षे चालवल्यानंतर लवकरच निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. हे सारे रिअॅक्टर्स एका प्रकारे प्रायोगिक अवस्थेतले असल्यामुळे त्यांचे आकार आणि अंतर्गत रचना यात फरक आहेत. या सर्वांमध्ये नैसर्गिक युरेनियम हे इंधन, ग्राफाइट हे मॉडरेटर आणि कर्बद्विप्राणील ( कार्बन डायॉक्साइड) वायू हे कूलंट असतात. यातील युरेनियम फ्यूएल रॉड्सवर मॅग्नेशियम अॅलॉय (मिश्रधातू) चा मुलामा दिलेला असतो म्हणून याचे नाव मॅग्नॉक्स असे पडले. रिअॅक्टरमधील ऊष्णता घेऊन तप्त झालेला हा वायू एका हीट एक्स्चेंजर किंवा स्टीम जनरेटरमध्ये जातो. त्यातल्या सेकंडरी साइडमध्ये पाण्याची वाफ तयार होते. उरलेले सगळे इतर रिअॅक्टर्स सारखेच असते.

मॅग्नॉक्स या पहिल्या पिढीतल्या प्रायोगिक रिअॅक्टर्सच्या अनुभवाच्या आधारावर अॅडव्हान्स्ड गॅस कूल्ड रिअॅक्टर्स (एजीआर) हे अकराबाराशे मेगावॉट्स क्षमतेचे रिअॅक्टर्स व्यावसायिक पायावर उभारले गेले. जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी वाफेचे तपमान जास्त हवे, त्यासाठी कार्बन डायॉक्साइड कूलंटला जास्त तापवायला पाहिजे आणि ते सहन करण्याची क्षमता मॅग्नॉक्समध्ये नसल्यामुळे त्याऐवजी स्टेनलेस स्टीलचे अवगुंठन इंधनावर दिले गेले. त्यामुळे नैसर्गिक युरेनियम वापरता येत नाही म्हणून समृद्ध (एन्रिच्ड) युरेनियम आले. हा रिअॅक्टर चालत असतांनाच त्यात नवे फ्यूएल घालावयाची मूळ योजना होती, पण हे ऑन पॉवर फ्यूएलिंग बिनभरवशाचे ठरले आणि त्यासाठी रिअॅक्टर बंद (शट ढाउन) करण्याची आवश्यकता पडू लागली. असे करता करता अखेर हे रिअॅक्टर्स चालवणे मूळ अपेक्षेच्या तुलनेत महागात पडू लागले आणि अशा प्रकारचे रिअॅक्टर्स नव्याने उभे करणे बंद झाले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी उभे केलेले सात आठ रिअॅक्टर्स मात्र व्यवस्थित रीत्या चालवले जात आहेत आणि त्यांचे जीवनमान संपल्यावर यथावकाश त्यांना निवृत्त केले जाण्याची योजना आहे. वाफ आणि कूलंटचे दाब (प्रेशर), तपमान (टेंपरेचर) आणि त्यांचे प्रवाह या सगळ्याच बाबतीतल्या संख्या मॅग्नॉक्सच्या मानाने एजीआरमध्ये मोठ्या असतात. यातील स्टीम जनरेटर्ससुद्धा रिअक्टरच्या कोठडीत (व्हॉल्ट) बंदिस्त असल्यामुळे प्रायमरी कूलंट त्याच्या बाहेर जात नाही. हा एक महत्वाचा फरक आहे.

भारतामध्ये यातल्या कोणत्याही प्रकारचा रिअॅक्टर उभारलाच नाही आणि तशी योजनाही नाही. त्यामुळे त्यांच्यासंबंधीची माहिती फक्त उत्सुकतेपोटी गोळा केली जाते. त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची गरज पडत नाही.


Friday, July 01, 2011

स्मृती ठेउनी जाती - १- करुणाताई देव




आपल्याला रोजच्या जीवनात अनेक माणसे भेटतात, त्यातली काही माणसे काही काळ लक्षात राहतात, बाकीची लगेच विस्मरणात जातात. आपल्याला नेहमी भेटणारी माणसे अर्थातच चांगली लक्षात असतात. पण बराच काळ न भेटल्यास लक्षात राहिलेल्या लोकांच्या आठवणींवर धुळीची पुटे जमू लागतात आणि त्यासुद्धा हळूहळू पुसट होतच असतात. ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटली किंवा कुठे तरी तिचा संदर्भ निघाला तर तिची आठवण पुन्हा ताजी होते, तिच्यावर बसलेली धूळ झटकली जाऊन तिचे चित्र थोडे स्पष्ट होते. आपण एकाद्याला भेटतो म्हणजे आपले त्याच्याशी काही संभाषण होते, निदान 'शब्देविण संवादू' तरी साधला जातो. तो आपला किंवा आपण त्याचा आदर, कौतुक, तक्रार, निषेध असे काही तरी करतो, आपण हसतो, सुखावतो, रडतो, रुसतो, रागावतो असे काही तरी करतो. प्रेम, आस्था, जिव्हाळा किंवा द्वेष, वैताग, संताप अशा कोणत्या तरी भावना आपल्या मनात उठतात. एकाच शब्दात सांगायचे झाले तर त्या व्यक्तीचा 'प्रभाव' जर या भेटीमधून आपल्यावर पडला तर ती व्यक्ती आपल्या स्मरणात घर करून राहते. काँप्यूटरच्या भाषेत सांगायचे तर आपल्या मनात तिची 'फाइल' उघडली जाते आणि ती फाइल हळूहळू इतर फाइलींच्या ढिगा-यात लपून जाते, पण जुन्या आठवणी काही निमित्याने कधी कधी जाग्या होतात तेंव्हा ती फाइल पुन्हा उघडते.

जुने फोटो पाहतांना त्यातले काही चेहेरे पाहताच त्यांच्या ब-याचशा आठवणी निघतात. मनाच्या स्मृतीपटलावर कोरली गेलेली त्यांची चित्रे शब्दांमधून मांडून आपल्या परीने ती रंगवावीत असे मनाला वाटते. ''मनात आले ते लिहिले'' हेच या ब्लॉगचे ब्रीद वाक्य असल्यामुळे ही व्यक्तीचित्रे काढायला मी सुरुवात केली. ज्यांची आठवण येताच त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना उचंबळून येते अशा व्यक्तींबद्दल मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहीत आहे. पण सगळेच जण या श्रेणीत बसत नाहीत. कदाचित त्यांच्या अंगी असलेले दिव्यत्व पाहण्याची संधी मला मिळाली नसेल किंवा मला ते ओळखता आले नसेल. तरीसुद्धा अशा काही व्यक्तींचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्या माझ्या स्मरणात कायमच्या राहिल्या. ठरवून त्यांची भेट घेण्यासाठी सबळ असे कारण माझ्याकडे नसायचे, पण अचानकपणे त्या पुन्हा भेटल्या तर फार आनंद होत असे. अशा एकाद्या व्यक्तीला योगायोगाने का होईना पण पुन्हा कुठे तरी भेटण्याची इच्छा मनात असली आणि अचानकपणे ती आपल्यातून कायमची निघून गेल्याचे समजले तर खूप यातना होतात. पहायला गेलो तर आपल्या रोजच्या जीवनात तिला स्थान नसते, तिची उणीव आपल्याला कुठेही जाणवत नसते, पण तरीही आता ती कधीच भेटणार नाही हा विचार मनाला व्याकुळ करतो.

अशा काही व्यक्तींची शब्दचित्रे 'स्मृती ठेउनी जाती' या नव्या मालिकेत काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझा परिवार आणि माझे कार्यालय यातील माणसांचा माझ्याबरोबर फारच जवळचा संबंध असल्यामुळे त्यांच्यावर काय आणि किती लिहावे हे ठरवणे कठीण आहे. शिवाय त्यांच्याकडे मी वस्तुनिष्ठपणे पाहू शकणार नाही. त्यामुळे त्यामधील कोणाचा या मालिकेत सध्या तरी समावेश केलेला नाही. 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत कोणावरही लिहितांना त्या व्यक्तीचे जीवनचरित्र, त्याची कामगिरी, त्याला मिळालेले बहुमान वगैरे तपशीलांना विशेष महत्व न देता आणि त्याची फारशी व्यक्तीगत माहिती न देता माझा त्या व्यक्तीशी कुठे, किती आणि कसा संबंध आला आणि त्या बद्दल मला काय वाटते यावर मी लिहिले होते. 'स्मृती ठेउनी जाती' या नव्या मालिकेतसुद्धा मी हेच धोरण ठेवणार आहे.

श्रेष्ठ गीतकार, संगीतकार आणि गायक यशवंत देव यांच्या बद्दल लिहीत असतांना करुणाताईंची आठवण आल्याशिवाय कशी राहील? देवांच्या छायाचित्रात त्यांच्यासोबत करुणाताई दिसत आहेतच. खरे तर त्यांच्यावर देखील 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहावे असा विचार मनात येत होता. त्यांना जास्त जवळून पहायला मला मिळाले असते तर बहुधा मी ते करू शकलो असतो. पण तसा योग आला नाही आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त नुकतेच आले. यशवंत देव यांच्याबरोबरच त्याच सुमारास करुणाताईंशीही माझी ओळख करून दिली गेली होती. त्यानंतर यशवंत देवांच्या जेवढ्या कार्यक्रमांना मी हजर राहिलो होतो त्यातील बहुतेक ठिकाणी करुणाताई आल्या होत्या आणि माझे त्यांच्याशी एक दोन शब्दांचे आदान प्रदान झाले होते. यातल्या काही कार्यक्रमांचे निवेदन करुणाताईंनी केले होते. इतर वेळी त्या सन्मान्य पाहुण्याच असायच्या, पण त्यांना यशवंत देवांची सावली म्हणता येणार नाही एवढा मान त्यांना स्वतंत्रपणे मिळतांना दिसत होता. .

मी पहिल्यांदा त्यांना पाहिले तेंव्हा त्या 'करुणा देव' झाल्या नव्हत्या. तेंव्हा त्या 'नीलम प्रभू' होत्या. दूरदर्शन येऊन त्याचे प्रक्षेपण दिवसभर सुरू होण्याच्या आधीच्या काळात रेडिओ खूपच लोकप्रिय होता. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीच्या कार्यक्रमांना सर्वाधिक पसंती असली तरी 'मुंबई ब' केंद्राच्या मराठी कार्यक्रमाचे चाहतेही होते. त्यात 'प्रपंच' नावाचा एक खुमासदार कार्यक्रम होता. यातल्या मीनावहिनी आणि टेकाडेभावजी यांच्या खुसखुशीत संवादातून निरनिराळ्या घटनांवर मार्मिक टिप्पणी केली जात असे. ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हींचा समतोल या श्रुतिकेत साधला जात असे. नीलम प्रभू या त्यातल्या 'मीनावहिनी' होत्या. आवाजातला गोडवा, बोलण्यातला सहजपणा, अस्खलित शब्दोच्चार, संवादाच्या गरजेनुसार त्यातील चढउतार वगैरे सगळे गुण त्यात असल्यामुळे त्या आपल्याच घरातल्या सदस्य आहेत असे शहरातल्या मराठी मध्यमवर्गीयांना वाटत असे. सोप्या आणि घरगुती बोलण्यातल्या भाषेत सादर केला जात असलेला हा मनोरंजक कार्यक्रम घरातल्या सर्वांना ऐकावाला वाटत असे. नीलम प्रभू यांचा गोड आवाज आकाशवाणीवरील इतर कार्यक्रमात किंवा जाहिरातीतसुद्धा कानावर पडताच ओळखता यावा इतका सर्वाच्या परिचयाचा झाला होता.

त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकात भूमिका केल्या असे ऐकले असले तरी मला त्यातली कोणती पाहिल्याचे आठवत नाही. आम्ही मुंबईच्या एका टोकाला रहात असल्यामुळे नाटक पहायला जाणे मला तसे कठीणच होते, त्यामुळे मी फारच कमी आणि अतीशय नावाजलेली नाटकेच पहात होतो. त्यामुळे असे झाले असेल. पु.ल.देशपांडे यांच्या 'वा-यावरची वरात' या बहुरंगी कार्यक्रमात 'रविवारची एक सकाळ' नावाची धमाल नाटुकली होती. त्यातली नीलम प्रभू यांची भूमिका खूप गाजली. 'बटाट्याची चाळ' हा एकपात्री प्रयोग तुफान यशस्वी झाल्यावर पुलंनी 'वा-यावरची वरात' आणली होती. तीसुद्धा 'सबकुछ पु.ल.' याच प्रकारची असली तरी त्यात इतर थोडी पात्रे होती. त्यांतल्या नीलमताईंनी स्वतःच्या सहज सुंदर अभिनयकौशल्याने त्या नाटिकेला बहार आणली होती.

टीव्हीच्या प्रसारानंतर रेडिओ ऐकणे संपले. घरातला रेडिओ दोन तीन वेळा दुरुस्ती झाल्यानंतर कायमचा अडगळीत गेला. वा-यावरची वरातचे प्रयोग बंद झाल्यावर तत्सम दुसरा कार्यक्रम आला नाही. त्यामुळे 'नीलम प्रभू' हे नाव नजरेआड गेले. त्यांचे पती बबन प्रभू कालवश झाले. त्यानंतर नीलमताईंनी यशवंत देव यांच्याशी विवाह केला. ही बातमी त्या काळात नक्कीच महत्वाची असणार. पण मी तेंव्हा मराठी वर्तमानपत्रे वाचत नव्हतो आणि टाइम्स ऑफ इंडियाने ती पहिल्या पानावर दिली नसावी. त्यामुळे मला ती माहीत नव्हती. अनेक वर्षानंतर ज्या वेळी मी त्यांना यशवंत देवांच्या बरोबर पाहिले तेंव्हाच त्यांना पूर्वी कुठे तरी मी पाहिले असल्यासारखे वाटले आणि त्यांचा आवाज ऐकून तो तर खूप ओळखीचा वाटला. "या बाई नीलम प्रभूंच्यासारखे बोलताहेत" असे मी शेजारच्या माणसाला सांगितल्यावर तो हसायला लागला. "अहो, करुणाताई म्हणजे नीलम प्रभूच आहेत." असा खुलासा त्याने केल्यावर माझे मलाच हसू आले.

कोणताही कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर जाऊन भेटल्यावेळी त्या खूप आपुलकीने वागायच्या. त्या आम्हाला नेहमी सांगायच्या, "तुम्ही दोघे एकदा घरी या ना, जरा निवांतपणे बोलता येईल." हे रेडिओवरल्या 'मीनावहिनी' बोलत नसून करुणाताई मनापासून सांगत आहेत असेच वाटावे इतका सच्चेपणा त्यात असायचा. पण ''एवढ्या मोठ्या आणि कार्यमग्न लोकांच्या घरी आपण असेच कसे जायचे'' याचा संकोचही वाटायचा. त्यामुळे त्यांचे आमंत्रण स्वीकारून ते प्रत्यक्षात आणायचा धीर कधीच झाला नाही. आम्ही एक तरी चान्स घ्यायला हवा होता असे आता वाटते. पण आता असे वाटून त्याचा काय उपयोग? आपल्या स्मृती तेवढ्या मागे ठेऊन करुणाताई तर निजधामाला निघून गेल्या आहेत.