Tuesday, March 30, 2010

गुरुशिष्यसंवाद (उत्तरार्ध) -१

गुरू : वत्सा, आता आपण विज्ञानाचा पहिला धडा सुरू करू. विज्ञानाबद्दल तुझ्या मनात कोणती संकल्पना आहे? विज्ञान हा शब्द उच्चारताच तुझ्या डोळ्यासमोर पटकन कोणत्या गोष्टी येतात?
शिष्य : कोणी जटाधारी आणि अस्ताव्यस्त दाढी वाढवलेले शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत रात्रंदिवस कसलेसे संशोधन करून शोध लावतात. तेच ना?
गुरू : हा सुध्दा विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असला तरी आपल्या रोजच्या जीवनात आपण विज्ञानाचा उपयोग कशा प्रकारे करत असतो?
शिष्य : छे! छे! मी कधी नवे प्रयोग बियोग करून पहात नाही बाबा! सगळं नीट चाललं असतांना उगाच कशाला प्रयोग करायचे?
गुरू : बरंय्. मग तू रोज दिवसभर काय करत असतोस?
शिष्य : प्रभातकाली उठून अभ्यंगस्नान करतो, देवपूजा करून स्तोत्रपठण करतो, कार्यालयात जाऊन तिथले काम करतो. आता सगळी दिनचर्या सांगत बसू का?
गुरू : नको. पण जेवण तरी करतोस की नाही?
शिष्य : म्हणजे काय? दिवसातून तीन वेळा आहार घ्यायलाच पाहिजे असे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे. तुम्ही घेत नाही?
गुरू : मी पण जेवण करतो, पण ते आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून करत नाही. मला भूक लागते यासाठी मी आपली क्षुधाशांती करतो. पण तुला दिवसातून तीन वेळा आहार कां घ्यायला हवा?
शिष्य : आयुर्वेदात सांगितलेच आहे तसे.
गुरू : पण तुमचे ऋषीमुनी अन्नप्राशन न करता वर्षानुवर्षे रहात होते म्हणे.
शिष्य ते तसे रहातच होते. यात काही संशय आहे का?
गुरू : म्हणजे आयुर्वेदात काय लिहिले आहे हे त्यांना माहीत नव्हते का?
शिष्य : ते तर सर्वज्ञानी होते. त्यांच्याबद्दल आपण अज्ञ लोक कसली चर्चा करणार?
गुरू : मला एवढेच सांगायचे आहे की अन्न खाण्यासाठी तू दिलेले कारण पुरेसे नाही. समज, तुला एक दिवसभर कांही ही खायला मिळाले नाही तर काय होईल?
शिष्य : भुकेने माझा जीव तळमळेल. आणखी काय होणार?
गुरू : म्हणजेच तसे होऊ नये म्हणून तू दिवसातून दोन तीन वेळा अन्नग्रहण करतो. बरोबर?
शिष्य : असेल कदाचित.
गुरू : पण मला सांग, रोज त्यासाठी इतका वेळ वाया घालवण्यापेक्षा तू एकदम आठवड्याभराचे जेवण का करून घेत नाहीस?
शिष्य : ते करायला मी काय उंट आहे?
गुरू : तू उंट नाहीस हे मला मान्य आहे. ज्या पध्दतीने तू हा प्रश्न विचारलास त्यावरून तू स्वतःला उंटाहून श्रेष्ठ समजत असणार. पण तुच्छ उंटाला जे जमते ते तू कां करू शकत नाहीस?
शिष्य : साधी गोष्ट आहे. कारण मी उंट नाही, तो उंट आहे. तो माझ्यासारखे बोलू शकतो का?
गुरू : ठीक आहे. तू रोजच्या जेवणात काय काय खातोस?
शिष्य : हेच आपले वरण, भात. पोळी, भाजी, उसळ, चटणी, कोशिंबीर वगैरे
गुरू : आणि गवत, चारा, झाडाची पाने ...
शिष्य : असले खायला मी काय बैल आहे की शेळी आहे? तुम्ही मला काय समजलात? मघापासून विज्ञान सोडून कसले भलते सलते प्रश्न विचारत सुटला आहात?
गुरू : वत्सा शांत हो. थोडा धीर धरलास आणि लक्षपूर्वक विचार केलास तर या सगळ्या संभाषणाचा विज्ञानाशी काय संबंध आहे ते लवकरच तुला जाणवेल. पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेव. कोणतीही विद्या आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सहनशक्ती, एकाग्रता आणि सारासार विवेकबुध्दी यांची आवश्यकता असते. निरुत्साह न होता एकाग्रचित्त होऊन चिकाटीने व नेटाने प्रयत्न करत रहाण्याची क्षमता अंगात असल्याखेरीज कोणताही माणूस विज्ञानाचे अध्ययन करू शकणार नाही. आतापर्यंतच्या तुझ्या बोलण्यातून तू यासाठी किती अपात्र आहेस हेच दाखवत आला आहेस. तुझ्यासमोर मी आता दोन पर्याय ठेवतो. एकतर तू मनातून इच्छा नसतांना विद्यार्थ्याचे केवळ सोंग आणले आहेस हे मान्य कर आणि हे नाटक इथेच थांबव. अथवा मी सांगितलेले गुण जागृत कर आणि विज्ञानासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा निदान एक प्रामाणिक प्रयत्न कर.
शिष्य : तुमच्याकडून कांही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे आता मलाही पटायला लागले आहे. त्यामुळे मी मनावर संयम आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करेन.
गुरू : छान! आता सांग, गायबैल वगैरे पशु चारा खातात, शेळ्यामेंढ्या झाडांचा पाला खातात, असे ते का करतात?
शिष्य : कारण ती जनावरे आहेत.
गुरू : वाघसिंह ही सुध्दा जनावरेच आहेत, पण ती गवत कां खात नाहीत?
शिष्य : कारण ती हिंस्र जनावरे आहेत.
गुरू : आपली कुत्रीमांजरे तर एवढी हिंस्र नसतात, पण ती सुध्दा चारा खात नाहीत.
शिष्य : कारण प्रत्येक प्राण्याचा आहार वेगळा असतो.
गुरू : हे मात्र तू अगदी १०० टक्के बरोबर सांगितलेस. आता सांग, कोणते अन्न कोणी खायचे हे कोण ठरवत असेल?
शिष्य : अर्थातच ही सगळी त्या परमेश्वराची अगाध लीला आहे. ज्याने प्राणीमात्र निर्माण केले त्यानेच त्यांचे अन्नसुध्दा निर्माण केले.
गुरू : हे सुध्दा अचूक उत्तर आहे. कोणी त्याला परमेश्वर म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल. ही ज्याची त्याची श्रध्दा जशी असेल तसे होईल. पण प्रत्येक प्राणीमात्राचे अन्न निसर्गात तयार होत असते. तो स्वतः ते उत्पन्न करत नाही, एवढे खरे आहे. आता सांग तू जे अन्न रोज खातोस ते कोण बनवते?
शिष्य : अर्थातच माझी आई.
गुरू : आणि सकाळी कोणती भाजी करायची किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी कोणती डाळ शिजवायची हे कोण ठरवतो?
शिष्य : तेही बहुतेक वेळा माझी आईच ठरवते, कधीकधी बाबा सांगतात किंवा आम्ही मागणी करतो.
गुरू : म्हणजे कोणते अन्न खायचे आणि ते कशा प्रकाराने तयार करायचे यातले कांही निर्णय माणसे घेतात.
शिष्य : कांही नव्हे, ते सारे निर्णय आम्हीच घेतो.
गुरू : अगदी असेच म्हणता येणार नाही, कारण तृणधान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या वगैरे आपले मुख्य अन्नपदार्थ आपल्याला निसर्गाकडून घ्यावे लागतात. पण आपण त्यांची लागवड करतो, त्यांच्या रोपांची मशागत करतो, आलेल्या पिकांची कापणी करतो अशा प्रकारे माणसांचा सहभाग त्यात असतो. त्यानंतर भाजणे, शिजवणे, तळणे वगैरे प्रक्रिया करून आपण त्यांचेपासून रुचकर पदार्थ बनवतो तसेच त्यांच्या पचनाला मदत करतो. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते तयार होण्यातले कांही निर्णय देवाचे किंवा निसर्गाचे असतात तर कांही माणसांचे असतात. यातला जो भाग निसर्गाचा आहे त्याचा पध्दतशीर अभ्यास करणे हा विज्ञानाचा विषय आहे. जे निर्णय माणूस घेतो त्यांचा अभ्यास पाकशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृतीचा अभ्यास वगैरे नांवाखाली केला जातो. विज्ञानाशी त्याचा निगडित संबंध असू शकतो. पण एकंदरीतच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हेच विज्ञानाचे मुख्य ध्येय असते.

. . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, March 25, 2010

गुरुशिष्यसंवाद (पूर्वार्ध)

शिष्य : गुरुवर्य, आपल्याकडून अंमळ मार्गदर्शन घ्यावे हा हेतू मनात बाळगून मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहे, माझ्यावर अनुग्रहाची कृपा करावी.
गुरू : वत्सा, तुझ्या अंगावरील वस्त्रे, भाळावरील टिळा वगैरे पाहता तू कोणत्या मठातून आला आहेस हे मला स्पष्ट दिसते आहे. त्याला सोडून ....
शिष्य : छे! छे! तसा विचार स्वप्नातसुध्दा माझ्या मनाला शिवणार नाही. आपल्या मठात राहूनच फावल्या वेळात इतरत्र जाऊन ज्ञानाचे कांही जास्तीचे कण गोळा करावेत अशी माझी मनीषा आहे. विज्ञान या विषयाची ओळख करून घेण्यासाठी मी आपले नांव ऐकून आपल्याकडे आलो आहे.
गुरू : माझ्या नांवाची ख्याती तुझ्या मठापर्यंत पोचली हे ऐकून मला परमसंतोष होत आहे. त्यामुळे मी तुला अवश्य मदत करेन, पण माझ्या मनात एक शंका येते. विश्वातील सर्व ज्ञानसंभार तुझ्या मठाधिपतींच्या स्वाधीन केला गेला होता असे नेहमी सांगण्यात येते.
शिष्य : ते खरेच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या चार मुखांतून चार वेदांचे ज्ञान आमच्या महर्षींना सांगितले होते. त्यानंतर त्याखेरीज ज्ञानाचा कणमात्र कधीही आणि कोठेही निर्माण झाला नाही अशी आमची गाढ श्रध्दा आहे. ज्ञानाचा हा ओघ पुढे युगानुयुगातील कोट्यावधी वर्षे गुरूशिष्यपरंपरेतून आपल्या देशात वहात राहिला होता. कलीयुग आल्यानंतर दु्ष्ट म्लेंच्छांनी आक्रमण करून विध्वंस केल्यामुळे त्यातले बरेचसे नष्ट झाले. एकट्या नालंदा विश्वविद्यालयातली ग्रंथसंपदा सतत दहा की वीस वर्षे जळत राहिली होती आणि त्याचा धूर दहावीस कोसांवरून दिसत होता अशा नोंदी आहेत ..... गुरुवर्य, गुरुवर्य, तुमचे लक्ष कुठे आहे?
गुरू : तुझे चालू दे, मी आंतर्जालावर मला आलेले विरोप तोंपर्यंत वाचून घेत आहे.
शिष्य : तर मी कुठे होतो?
गुरू : तू जिथे असशील तिथे ठीकच होतास, पण आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस?
शिष्य : त्याचे निवेदन मी आधीच केले होते ते आपल्या स्मरणात असेलच.
गुरू : अरे, एक प्रकट निवेदन आणि दुसराच अंतःस्थ उद्देश अशी दुहेरी नीती बाळगणे हे तर तुझ्या मठाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुला पाहून मला कचदेवयानी आख्यानाची आठवण झाली. पण कांही हरकत नाही. मला देवयानीसारखी हट्टी कन्यका नाही आणि मी फारसे वारुणीप्राशन करत नाही, कधीतरी एकादा चषक ओठांना लावलाच तरी त्यात राख मिसळलेली मला कळणार नाही इतक्या मद्यधुंद अवस्थेपर्यंच मी कधी पोचत नाही. त्यामुळे शुक्राचार्यांसारखी माझी अवस्था होण्याचा धोका मला वाटत नाही. शिवाय षट्कर्णी होताच विफल होईल अशी कोणतीही विद्या मी शिकलेलो नाही. माझ्या मते अशी कोणतीही विद्या अस्तित्वातच नाही. ज्या विद्येचे थोडेसे अध्ययन मी केलेले आहे ती देण्यामुळे कमी होत नाही, उलट ती वाढते. त्यामुळे ती शतकर्णी, सहस्रकर्णी झाल्यास त्यातून माझा लाभच होणार आहे. ती प्राप्त करण्यासाठी जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधी नकार देत नाही. तुलाही मी नाही म्हणणार नाही. पण दुसरी एक शंका माझ्या मनात येते.
शिष्य : कोणती?
गुरू : विज्ञानाची खरोखर उपासना करणारे लोक आयुष्यभर स्वतःला त्या मार्गाचे वाटसरू समजतात. आपण अंतिम मुक्कामावर पोचल्याचा दंभ ते भरत नाहीत. आपण जसजसे पुढे जाऊ तसतसा पुढील भाग नजरेसमोर येत जातो, कोणीही क्षितिजापर्यंत कधी पोहचू शकत नाही, हे त्यांना चांगले ठाऊक असते. पण आपल्याला विज्ञानातले सारे कांही समजलेले आहे असा आविर्भाव आणून त्यावर प्रवचने झोडणारे आणि ग्रंथलेखन करणारे महाभाग तुझ्या मठात आहेत.
शिष्य : म्हणजे काय? असे महान लोक आमच्याकडे आहेतच मुळी! आमच्या महंत सुरेशजींनी प्राचीन भारतातील विज्ञान या विषयांवर एक महान ग्रंथ लिहिला आहे. आम्ही सारे भक्तगण नेहमी त्याची पारायणे करत असतो. हिंदी भाषेत लिहिलेल्या या ग्रंथातले अल्पसे ज्ञानामृत मराठीभाषिक लोकांसाठी मराठी भाषेत उपलब्ध करून देऊन त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा उपक्रम मी सध्या सुरू केला आहे. पाश्चिमात्य पंडितांनी हल्लीच्या काळात विज्ञानात कांही नवे दिवे लावले आहेत असे ते म्हणतात. त्यांचाही उल्लेख करून माझ्या लेखांची आकर्षकता किंचित वाढवण्याच्या हेतूने मी आता विज्ञानाचे प्राथमिक पाठ घेण्याचे ठरवले आहे.
गुरू : म्हणजे शिळ्यापाक्या खिचडीवर खिसलेले ताजे खोबरे पसरून ते सुग्रास अन्न या नांवाने खपवण्याचा तुझा बेत आहे तर!
शिष्य : कांही तरीच काय? साक्षात् ब्रह्मदेवाने दिलेले ज्ञान कधी शिळे होणे शक्यच नाही. शिवाय आपली अब्जावधी वर्षे म्हणजे त्याचा फक्त एक निमिषमात्र असतो. त्यामुळे तसेही हे सारे ताजेतवानेच आहे. म्लेंच्छांनी केलेल्या .......... आणि त्यानंतर आलेल्या लबाड गौरवर्णीयांनी तर उरलीसुरली ग्रंथसंपदा इथून चोरून नेली आणि त्यातले एकेक पान ते आपल्या नांवाने खपवत गेले. परकीय अंमलाखाली आपल्या लोकांनाही ते ऐकून घ्यावे लागले असेल, पण स्वातंत्र्यप्राप्तीला साठ वर्षे होऊन गेली असली तरी आपल्या लोकांची मानसिक गुलामगिरी कांही गेलेली नाही. आपले मूर्ख विद्वान अजूनही त्यालाच खरे मानून पाश्चात्य संशोधकांचीच वाहवा करत असतात. आपल्या महान पूर्वजांच्या कार्याची कोणाला कदरच नाही. त्यांच्या हक्काचे पण उपटसुंभ लोकांनी काबीज केलेले श्रेय ते हिरावून घेणा-यांकडून परत हिसकावून घेऊन आपल्या पूर्वजांना ते अर्पण करण्याचा विचार इतर कोणी करत नसला तरी आमचा मठ त्यासाठी कटीबध्द आहे ...... अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, मी काय सांगतो आहे?
गुरू : तुझे चालत राहू दे. असला मठ्ठपणा ऐकण्याची मलाच नव्हे तर या भिंतींनाही आता संवय झाली आहे. त्याचा प्रतिवाद करण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही. तुझ्या मस्तकातली ध्वनीफीत संपल्यावर आपण मुद्यावर येऊन चर्चा करू. तोंपर्यंत मी माझे काम करतो, तू तुझे भाषण चालू ठेव.
शिष्य : तर मी कुठे होतो?
गुरू : तू जिथे असशील तिथे ठीकच होतास, पण आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस असे मात्र मी आता विचारणार नाही कारण तुझ्या मनातला सुप्त हेतू आता पूर्णपणे प्रकट झाला आहे. त्या कामात माझी मदत होणे शक्य नसल्यामुळे तू तुझे भाषण संपल्यानंतर आपल्या मठात परत जाऊ शकतोस.
शिष्य : पण तुम्ही तर मला मार्गदर्शन करायला तयार झाला होता.
गुरू : बरोबर आहे, पण उन्नतीच्या वाटेवर जायचा रस्ता दाखवणे याला मार्गदर्शन असे आमच्याकडे म्हणतात. तू निवडलेला रस्ताच वेगळा आहे. तो दाखवणारे गुरूही तुला लाभलेले आहेत.
शिष्य : आपल्याकडे आलेल्या कोणालाही विज्ञानाचे धडे द्यायला आपण नकार देत नाही असेही तुम्ही म्हणाला होतात.
गुरू : त्यासाठी मी आजही उत्सुक आहे. तू विद्यार्थी व्हायला तयार असशील तर मी मास्तर बनेन, पण मग मी सांगतो ते तुला लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. तुझ्या मस्तकात सतत फिरत असलेली ही तुझ्या पंथाची ध्वनिमुद्रिका कांही वेळासाठी बंद करून ठेवावी लागेल. एवढे एक पथ्य तुला पाळावे लागेल. हे तुला मान्य असेल तर मी लगेच तुला विज्ञानाचा पहिला धडा शिकवेन.


..... (क्रमशः)

Saturday, March 20, 2010

नव्या वर्षाची नवी सुरुवात


१ जानेवारीला तारखेनुसार नव्या वर्षाची सुरुवात झाली त्या वेळेसच मी अनपेक्षितपणे एका कामात मग्न झालो होतो, त्यामुळे ब्लॉगकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. ते काम हातावेगळे करून झाल्यानंतर ब्लॉगसाठी पुन्हा संवड मिळू लागली लागली होती. त्यात पंपपुराण सांगणे सुरू केले. मराठी पंचांगानुसार नवीन वर्ष कसे जाणार याची थोडी चुणुक मिळाली होती, पण स्पष्ट कल्पना नव्हती. गुढी पाडव्याला नववर्षाचे स्वागत ब्लॉगवर कसे करावे याबद्दल विचार चालला असतांनाच सल्लामसलतीसाठी आणखी एक नवे आमंत्रण घरबसल्या चालून आले आणि ते स्वीकारायचे ठरवले. पाठोपाठ मुलाचा फोन आला आणि त्याने तांतडीने पुण्याला बोलावून घेतले. ध्यानीमनी नसतांना तिकडे चालले गेलो. त्यामुळे ब्लॉग आणि आंतर्जालाकडे पहायला फुरसत मिळाली नाहीच.

मुलाने विकत घेतलेल्या नव्या घराची कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करायची होती. आर्थिक वर्षाची अखेर होण्यापूर्वी हा व्यवहार करणे आवश्यक असल्यामुळे हे काम अतितुरत झाले होते. सरकारी कामासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढून आणले. गृहनिर्माणसंस्थेच्या कार्यालयाला गुढी पाडव्याची सुटी दिली नव्हती. या मुहूर्तावर मिळेल तेवढा व्यवसाय करून नफा मिळवण्याची संधी कोण सोडेल? गुढी पाडव्याच्या आधी चार पाच दिवसातील वर्तमानपत्रे गृहसंकुलांच्या जाहिरातींनी भरल्या होत्या. कांही वृत्तपत्रांनी तर खास रंगीत पुरवम्या काढल्या होत्या. आमच्या बिल्डरने तर रस्त्यात मोठे फलक उभारले होते. ते पहात आम्ही ऑफीसात गेलो. प्राथमिक बोलणी, घरकुलाची निवड, जागेच्या भावाची घासाघीस, आगाऊ रक्कम देणे वगैरे झालेलेच होते. त्यानंतर सर्व ग्राहकांच्या नांवाने व्यवस्थित फोल्डर तयार करून ठेवलेले होते. मुलाच्या नांवाचा फोल्डर काढला. त्यात प्रत्येकी पन्नास तरी पाने असलेला करारनामा केलेला होता आणि त्यातील प्रत्येक पानाच्या चार चार प्रती होत्या. एक बिल्डरसाठी, एक ग्राहकासाठी, एक बँकेसाठी आणि एक सरकारजमा करण्यासाठी. या करारनाम्यावर जवळजवळ प्रत्येक पानावर सही करायची होती. यातला सर्व मजकूर मी वाचला आहे आणि मला तो समजला आहे असेसुध्दा एका पानावर लिहिलेले दिसले. प्रत्यक्षात मात्र कोणीही हे करत नव्हते, किंवा तशी अपेक्षाच नव्हती. प्लँटचा नंबर, क्षेत्रफळ, किंमत आणि आपले नाव, पत्ता एवढ्या गोष्टी तपासून बाकीच्या कागदांवर धडाधड सह्या ठोकल्या, तरीसुध्दा ते आटपायला दोन तास लागले.

कागदोपत्री करारनामा झाला असला तरी अजून थोडे बांधकाम व्हायचे शिल्लक असल्यामुळे लगेच गृहप्रवेश करणे शक्य नव्हते. शहराबाहेर असलेल्या त्या नव्या वसाहतीच्या कांही भागात अनेक कुटुंबे रहायला आलेली होती आणि उरलेल्या भागात नवी घरे बांधली जात होती, त्यात आमचा फ्लॅट होता. ऑफिसातले काम संपल्यावर तो पहायला गेलो. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एक लहानशी पूजा केली. त्यासाठी देवांच्या तसबिरी, हळदकुंकू, फुले, नैवेद्य वगैरे सगळे बरोबर नेले होतेच. नळाला पाणी मिळाले. तेही नसते तर पिण्यासाठी नेलेल्या बिसलरीच्या बाटलीमधून घेतले असते. घटकाभर बसण्यासाठी सतरंजा नेल्या होत्या, पण पंखे लावले गेले नसल्यामुळे उकाडा असह्यच वाटत होता, शिवाय पोटपूजा करण्यासाठी तिथे कांही सोय नव्हती. त्यामुळे घराचे निरीक्षण आणि वेगवेगळ्या खिडक्या आणि बाल्कन्यांमधून दिसणा-या व्ह्यूजचे कौतुक करून झाल्यावर झटपट पूजा आरती करून परत आलो. नवे काम अंगावर घेतले असल्यामुळे मला पुण्याला थांबता आले नाही. खरे तर त्याच दिवशी बडोद्याला जायचे तिकीटही हातात आले होते, पण मी ते रद्द करायला लावले. तरी मुक्कामाला मुंबईला परतणे भाग होते.

दुसरे दिवशी सकाळी, म्हणजे भल्या पहाटे उठून विमानाने बडोदा गांठले. पुढले तीन दिवस ऑफीसात बसून ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स पाहणे, कारखान्यांना भेटी देऊन तिथे असलेली यंत्रसामुग्री पाहणे, त्यावर चर्चा आणि वादविवाद करणे यात गेले. ठरलेले काम संपवून परत आलो. आठवडाभरच्या गैरहजेरीत पोस्टाच्या डब्यात अनेक बिले येऊन पडली होती आणि ईमेलचे डबे संदेशांनी भरले होते. ते पाहून त्यांची सोय किंवा विल्हेवाट करण्यात एक दिवस चालला गेला.

मराठी नववर्षाची सुरुवातही अशी धामधुमीत गेली. संकेतस्थळांवर भ्रमण करतांना "या वर्षी तुम्ही काही वेगळे काम करून संपत्ती मिळवाल" असा होरा कोणीतरी दिलेला वाचला आणि थक्क झालो. छापलेले भविष्य इतके खरे झालेले मी पहिल्यांदाच पहात होतो.

Friday, March 12, 2010

पंपपुराण भाग ११


वेगवेगळ्या आकारांच्या इंपेलरांचा उपयोग करून पंपाची क्षमता तसेच कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवली जाते हे आपण पाहिले. इंपेलरप्रमाणेच व्हॉल्यूट केसिंगच्या आकारात फेरफार करून पंपाच्या कामात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सेंट्रिफ्यूगल पंपाचा इंपेलर वेगाने फिरून पाण्याला त्याच वेगाने परीघाकडे ढकलत असतो, पण पंपातून बाहेर पडलेल्या पाण्याचा पाइपातून वाहण्याचा वेग इतका जास्त नसतो. त्यामुळे इंपेलरने वेगाने ढकललेले पाणी परीघाजवळून सावकाशपणे पुढे जाणा-या पाण्यावर आदळत राहते. या आदळआपटीतून कंपने निर्माण होतात आणि ती पार पंपाच्या फाउंडेशनपर्यंत जाऊन धडकतात. या धकाधकीमुळे जागोजागी असलेले खिळे मोळे सैल होतात, गास्केटांमधून पाणी बाहेर झिरपायला लागते आणि एकंदरीत पंपाचे आयुष्य कमी करायला त्याची मदत होते. असा कोणताही प्रॉब्लेम दिसला की इंजिनियर्स त्यावर तोडगा शोधून काढणारच. ते कशा प्रकारचे असतात हे वर दिलेल्या चित्रांमध्ये दाखवले आहेत.

पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पंपाचा इंपेलर आणि व्हॉल्यूट केसिंग यांच्या दरम्यान अनेक डिफ्यूजरांची एक माळ बसवली जाते. या डिफ्यूजरला सुध्दा इंपेलरसारखीच अनेक वक्राकार पाती असतात, पण ती फिरत नाहीत. केसिंगला चिकटून ती एका जागी स्थिर राहतात, यामुळे गोल फिरणा-या इंपेलरचे चक्र आणि शंखाकृती केसिंग यांच्या दरम्यान पाण्याला वाहण्यासाठी अनेक समांतर मार्ग तयार होतात. इंपेलरमधून निघालेले पाणी एकदम केसिंगवर जाऊन आदळत नाही किंवा इंपेलरच्या वेगवेगळ्या पात्यांनी ढकललेले पाणी एकमेकांवर न आपटता डिफ्यूजरमधील पात्यांच्या वक्राकार आकारानुसार वळत वळत पुढे जाते आणि सावकाशपणे एकमेकात मिसळते. जास्त प्रवाह देणा-या अॅक्शियल इंपेलरमध्ये डिफ्यूजरची गरज आणि उपयुक्तता अधिक असते.

इंपेलरमधून वेगाने बाहेर पडणारे पाणी व्हॉल्यूटमधून फिरत असतांना त्यातून जो दाब निर्माण होतो, त्यामुळे इंपेलरवर परिणाम होतो. हा कमी अधिक असल्यास त्यात असंतुलन होऊन त्याचा भार बेअरिंगवर पडतो. लहान पंपात याचा जोर विशेष नसला तरी पंपाचा आकार मोठा असला आणि त्यातल्या पाण्याचा दाब जास्त असला तर तो वाढत जातो. त्यातून पंप जेंव्हा त्याच्या क्षमतेहून खूप खालच्या स्तरावर काम करत असेल, म्हणजे त्यातून होणारा पाण्याचा प्रवाह पूर्ण क्षमतेच्या अर्धा किंवा त्याहून कमी असेल तर हे असंतुलन घातक ठरू शकते. हे होऊ नये यासाठी दुहेरी व्हॉल्यूटचा उपयोग करतात. अशा प्रकारच्या पंपात चित्रातील दुस-या आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्हॉल्यूटच्या अर्ध्या भागात एक पार्टीशन घालून दोन वाटा तयार केल्या असतात. इंपेलरच्या अर्ध्या भागाने फेकलेले पाणी त्यातील एका भागातून आणि दुस-या अर्ध्या भागाने ढकललेले पाणी वेगळ्या मार्गातून फिरत जोते. पंपाच्या मुखापाशी हे दोन्ही प्रवाह पुन्हा एकत्र येतात. यामुळे इंपेलरवर पाण्याच्या दाबामुळे पडणा-या जोराचे संतुलन होते. अशा प्रकारचा दुहेरी व्हॉल्यूट चेंबर जास्त प्रेशर निर्माण करणा-या पंपात मुख्यत्वे वापरला जातो.

या दोन्ही सुधारणा करण्यासाठी केसिंगच्या आंत मोकळ्या जागेची आवश्यकता असते. त्यामुळे त्या सुधारणा मोठ्या आकाराच्या पंपांमध्येच केल्या जातात. लहान आकाराच्या पंपांना त्यांची फारशी गरज नसते.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, March 09, 2010

पंपपुराण भाग १०


वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या परीघाला जोडणा-या सरळरेषेला इंग्रजीत रेडियस असे म्हणतात आणि त्या रेषेने दर्शवलेल्या दिशेला रेडियल डायरेक्शन असे संबोधित केले जाते. उदाहरणार्थ, सूर्यापासून निघालेले सूर्यकिरण रेडियली सर्व बाजूंना जात असतात. सेंट्रिफ्यूगल पंपाच्या इंपेलरच्या केंद्रापाशी असलेले पाणी असेच रेडियल दिशेने त्याच्या परीघाच्या पलीकडे ढकलले जात असते, असे आतापर्यंत दिलेल्या उदाहरणांवरून पाहिले. कांही पंपांची रचना थोडी वेगळी असते.

आपल्या घरातला सीलिंग फॅन छताला आणि जमीनीला समांतर अशा आडव्या प्लेनमध्ये फिरत असतो, पण त्याने निर्माण केलेला वारा मात्र त्याच्या काटकोनात वरून खाली येतो. मोटर लाँच आणि आगबोटीला जोडलेले प्रोपेलर गोल फिरता फिरता पाण्याला दूर ढकलतात आणि त्याच्या प्रतिक्रियेमुळे ती नौका पुढे सरकते. याच तत्वाचा उपयोग पाणी पुरवण्यासाठी कांही पंपांमध्ये केला जातो.

नेहमीच्या साध्या सेंट्रिफ्यूगल पंपात येणारे पाणी जलाशयामधून निघून एका नलिकेद्वारे इंपेलरच्या केंद्राजवळ पोचते. त्या वेळी त्याचा प्रवाह पंपाच्या अक्षाशी समांतर म्हणजे अॅक्शियल असतो. इपेलरमध्ये तो रेडियल बनून केसिंगमध्ये जातो आणि तिथून टँजन्शियल दिशेने तो पंपाच्या बाहेर पडतो. अशा रीतीने तो सतत आपला मार्ग बदलत असतो. अॅक्शियल फ्लो या प्रकारच्या पंपात तो न बदलता अॅक्सियलच राहतो. या पंपातील इपेलरची रुंद आकाराची पाती इंपेलरच्या रिंगला तिरकस करून जोडलेली असतात. इंपेलर फिरू लागला की ही पाती त्यांच्या मागे असलेले पाणी पुढे ढकलतात. अर्थातच ते पाणी पात्यांसोबत गोल फिरतच पुढे जाते, पण केसिंगचा आकार असा दिलेला असते की परीघाकडे जाण्यापेक्षा पुढे जाण्याकडेच त्या पाण्याचा ओढा जास्त असतो.

जेंव्हा पाण्याला विवक्षित उंची गाठायची नसेल आणि त्याच्या प्रवाहात अडथळे नसतील तर तो प्रवाह निर्माण करण्यासाठी जास्त दाबाची गरज पडत नाही. अशा प्रकारे कमी दाब आणि मोठा प्रवाह पाहिजे असेल तर त्यासाठी अॅक्शियल इंपेलरचा उपयोग केला जातो. मिक्स्ड फ्लो इंपेलरचा उपयोग करून अॅक्शियल आणि रेडियल या दोन्ही प्रकारांचा थोडा थोडा लाभ उठवला जातो. यातली पाती रुंदीला थोडी कमी असतात आणि त्यांचा तिरकसपणाचा कोनही वेगळा असतो.


. . . . . . . . . . . (क्रमशः)

Monday, March 08, 2010

जागतिक महिला दिन


आज पुन्हा जागतिक महिला दिन आहे. म्हणजे नक्की काय हे मागच्या वर्षीसुध्दा समजले नव्हतेच. त्याबद्दल मी तीन भागात लिहिले होते. त्याच्या लिंक खाली दिल्या आहेत

1

2


3


या वर्षी ब्लॉगर्सनी काय काय लिहिले आहे हे थोडे चाळून पाहिले. त्याचा गोषवारा खाली दिला आहे. त्यातला पहिला एकमेव ब्लॉग एका महिलेने लिहिला आहे आणि उरलेले पुरुषांनी. याचा अर्थ त्यांनाच या दिवसाचे थोडे महत्व वाटते की काय?
----------------------------------------------------------



निशिगंध
आज जागतिक महिला दिन त्यामुळे महिलांवर बोलणे क्रमप्राप्त आले.
आज म.टा.वाचताना एक बातमी वाचली मशीनवुमन नावाची.ज्यात संपूर्ण भारतात रेल्वे मशीन हाताळणारी एकमेव स्त्री शिवानीकुमार बद्दल लिहिले होते.कौतुक वाटले तिचे.
Posted by: asmita pawar
Kathryn Bigelow ,Director of The Hurt Locker got oscar 1st woman to get Best director oscar...

asmitacp
Asmita Pawar Mendhe
----------------------------------------------------


सूर्यकांती

सोमवार ८ मार्च २०१०
***** आजची वात्रटिका *****

ट्रॉफी ते सोनोग्राफी

महिला दिनाच्या निमित्ताने तिच्या हाती ट्रॉफी असते.
मुलगी नको, मुलगा हवा यासाठीच तर सोनोग्राफी असते.

एकीकडे कौतुक, दुसरीकडे स्त्रीत्त्व हा शाप आहे !
अबलीकरणाचे सबलीकरण ही निव्वळ तोंडाची वाफ आहे !!

रविवार ७ मार्च २०१०
महिला दिनाचे संकल्प
***** आजची वात्रटिका *****

महिला दिनाचे संकल्प

आयांनी संकल्प करावा पून्हा खून करणार नाही.
कुणाच्या सांगण्यावरून गर्भातल्या लेकी मारणार नाही.

बायकांनी ठरविले पाहिजे नवर्‍याला छळणार नाही.
सासवांनीही ठरविले पाहिजे सूनांना जाळणार नाही.

हक्कांपेक्षा जबाबदारी जोपर्यंत कळणार नाही !
महिला दिनाचे औचित्य तोपर्यंत कळणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे
-----------------------------------------------------
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

Monday, March 8, 2010
जागतिक महिला दिनानिमित्त सकाळ मधील एक सुंदर लेख
सकाळ मधे सकाळीच एक सुंदर लेख वाचला तोच तुमच्या साठी सादर करीत आहे ......
हा लेख खालील लिंक वर देखिल मिळू शकेल
http://epaper.esakal.com/esakal/20100307/5133767082025601382.htm
सकाळ च्या सौजन्याने


।। मॉं तुझे सलाम ।।
डॉ. श्री बालाजी तांबे

स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीरभेद नाही। स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावान आहे; तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष मात्र भौतिकतेकडे; जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते...

भारतीय तत्त्वज्ञानानुसार, अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्‍चर) व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्‍ती देणारी व संरक्षण करणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञानसंकल्पना देणारी महासरस्वती असते। अशा प्रकारे या तीन शक्‍तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुषदैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्याच्या शक्‍तीची, त्याच्या असलेल्या स्त्रीशक्‍तीची, हेही आपल्याला लक्षात ठेवावे लागेल.

"मातृदेवो भव'... स्त्रीला माता म्हणून संबोधित करताना तिला स्वतःचेच अपत्य असणे अभिप्रेत नसावे। स्त्रीची सर्जनशीलता, संस्कार, प्रेरणा देण्याची क्षमता, सर्वांकडे हृदयभावाने पाहून दिलेले प्रेम व कर्तृत्व यामुळे ती जननी वा जगज्जननी म्हणून ओळखली जाते.
.
.
.
जगात जर काही सौंदर्य, कला, नीती, चारित्र्य, समृद्धी, उत्क्रांती वाढावी असे वाटत असेल तर स्त्रीकडे लक्ष ठेवून तिच्या आवश्‍यकतांची पूर्ती करणे आवश्‍यक आहे. अशी पूर्ती करताना तिच्यावर आपण उपकार करतो आहोत, अशी भावना न ठेवता तिची योग्यता आहे म्हणून, तिचा अधिकार आहे म्हणून तिला सन्मान व प्रतिष्ठा देणे आवश्‍यक आहे. म्हणून "माँ तुझे सलाम'!
Posted by विनोद शिरसाठ
--------------------------------------------------------

मुख्यमंत्री कार्यकर्ता

८ मार्च, जागतिक महिला दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा,


इतिहासातील पहिले स्त्री व्यक्तिमत्व जिने स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्वराज्यचे स्वप्न पहिले, या देशातील पहिली सहकारी बँक ज्यांनी काढली त्या जिजाऊ माँ साहेबांच्या लेकीना , या देशातील साक्षात सरस्वती, शिक्षणाची गंगा जिने भारतीय स्त्रीच्या दारी पोचवली आशा त्या सावित्रीच्या लेकींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

------------------------------------------------------------------

विचारमंथन

महिला दीन – ‘करिअर ब्रेक’ साठी ‘करिअर पाथ’

मार्च 8, 2010 by Pranav

महिलांनी आपले हक्क मिळविण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे स्मरण करण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. महिलांची व्यावसायीक आणि सामाजीक उन्नती ही निश्तितच अभिनंदनीय आहे. पण नवीन संधी नवीन समस्या घेवून आल्या आहेत आणि अशी एक समस्या आज माझ्या मनात घोळते आहे.
.
.
.
हे उपक्रम स्तुत्य असून अश्या सुविधा इतर कंपन्यामध्ये उपलब्ध व्हायला हव्यात. कर्मचाऱ्यांनी हा विषय लावून धरला तर पुढच्या महिला दिनाआधी अशी सुविधा आणखी कितीतरी कंपन्यांमध्ये उपलब्ध होवू शकतील. तान्ह्या मुलांना पुरेसा वेळ देवू न शकण्याची खंत बाळगणाऱ्या कितीतरी महिलांना ह्यामुळे मोठा आधार मिळेल.
----------------------------------------------------------
हेमंत आठल्ये
महिला आरक्षण
घरी येतांना अनेक ठिकाणी ‘महिला दिनाचे’ फ्लेक्स बघितले. चिंचवडमध्ये महिलांनी बनवलेल्या वस्तूंची ‘प्रदर्शन व विक्री’ सुरु आहे. हे राजकारणी ना कशाचा स्वतःसाठी कुठेही वापर करून घेतील. सगळीकडे ‘महिला दिनाच्या शुभेच्छा’च्या नावाखाली स्वतःचे हसमुख फोटो लावले आहेत.
.
.
.
मी तर म्हणतो बसप्रमाणे सगळ्याच ठिकाणी ५० टक्के आरक्षण असायला हवं. पण त्यांनीही पन्नास टक्के मध्येच राहायला हवं. ‘अग बाई अरेच्या’ सारखं नको.
.
.
नाही तरी आपण ज्या ‘देवी’ची पूजा करतो त्यांनाच आरक्षण मागायची पाळी आणायला लावतो हेच खर दुख: आहे.
----------------------------------------------------

प्राजक्त



ती

.........
.........
.........
पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात त्याला कारण तेथे काय लिहायचे हे सुचलेले नाही असं नाही तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे
.
.
.
आता आलं लक्षात मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... पाहिलंत असं होतं!
"तिला' लाख-लाख प्रणाम.
Posted by prajkta
----------------------------------------------------

Saturday, March 06, 2010

पंपपुराण भाग ९


पंपाची क्षमता तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाय योजले जातात. इंपेलरला वेगाने फिरवण्यामुळे पाण्याला गती मिळून त्याचा प्रवाह सुरू होत असल्यामुळे इंपेलर हा पंपामधील सर्वाधिक महत्वाचा पार्ट आहे. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे इंपंलरची रचना तीन प्रकारे केली जाते. फुलाच्या पाकळ्या जशा मुळाशी त्याच्या देठाला जोडलेल्या असतात, त्याप्रमाणे ओपन इंपेलरची पाती त्याच्या मध्यभागी असलेल्या रिंगला जोडलेल्या असतात. हा इंपेलर जेंव्हा फिरत असतो त्या वेळी परीघाच्या दिशेने फेकले जाणा-या पाण्यातला कांही भाग बाजूला ढकलला जातो आणि तिथल्या पोकळीतून केंद्राकडे परत येतो. यामुळे पंपाची एफिशियन्सी थोड्या प्रमाणात कमी होते. पूर्णपणे बंदिस्त असलेल्या इंपेलरची पाती त्यांच्या दोन्ही बाजूने जोडलेल्या वर्तुळाकार चकत्यांमध्ये बंद असतात. त्यामुळे इंपेलरने ढकललेले सारे पाणी परीघाकडेच जाते आणि पंपाची कार्यक्षमता वाढते. सेमीश्राउडेड इंपेलरची पाती एका बाजूला एका चकतीला जोडलेली असतात तर दुस-या बाजूला उघडी असतात. त्यामुळे पंपाची कार्यक्षमता इतर दोन प्रकारांच्या मध्ये असते.

हे तीन वेगळे प्रकार असण्याची गरज काय आहे असे वाटेल, पण तीन्ही प्रकारांचे कांही वेगवेगळे फायदेसुध्दा आहेत. फुल्ली श्राउडेड इंपेलरची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे तो बनवण्यात अडचणी असतात, त्यासाठी जास्त कच्चा माल लागतो आणि त्याला जास्त खर्च येतो. त्यामुळे पंपाची किंमत वाढते. ओपन इंपेलर बनवणे त्या मानाने सोपे असते आणि आणि स्वस्त पडते. पंपाची कार्यक्षमता इतरही अनेक कारणांमुळे बदलते. त्यावर प्रभाव पाडणा-या इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर कार्यक्षमता वाढवण्याच्या बाबतीत महागड्या इंपेलरचा फारसा उपयोग होणार नाही.

एफिशियन्सी वाढणे याचाच अर्थ ते मशीन चालवण्यासाठी कमी ऊर्जा लागणे असा होतो. हा पंप दिवसातून जास्त वेळ चालवला जात असेल तर तितक्या प्रमाणात कार्यक्षमतेचा जास्त फायदा मिळून विजेची बचत होईल. पण त्याचा उपयोग कमी होत असेल तर ती बचत जाणवणार नाही. कांही ठिकाणच्या ग्रामीण भागात विजेच्या वापराचे मोजमाप करणारे मीटरच नसते. विजेच्या वापरासाठी दर महिन्याला एक ठराविक रक्कम द्यायची असते. कांही जागी विजेचा पुरवठा अल्प दराने केला जातो तर कधीकधी विजेची बिले माफ केली जातात. अशा ग्राहकांना कार्यक्षमतेची पर्वा असायचे कारण नसते. विजेची खपत कमी
करण्यापेक्षा पंपाची किंमत कमी असणे त्यांच्या दृष्टीने अधिक आकर्षक असते.

मूळ किंमत कमी असल्यामुळे ओपन इंपेलरला पसंती दिली जाते, तर चालवण्याचा खर्च कमी पडत असल्यामुळे बंदिस्त इंपेलर परवडतो. याशिवाय आणखी एक कारण आहे. इंपेलरच्या पात्यांना जोडलेल्या चपट्या पट्टीमुळे त्याला बळकटी येते. एका बाजूला पट्टी लावलेला सेमीश्राउडेड इंपेलर वापरला तर तुलनेने कमी किंमत, कमी खर्च आणि अधिक आयुष्य असे मिश्रण तयार होते. याखेरीज आणखी कांही गोष्टींचा विचार केला जातो. पंपातून जे पाणी जाणार आहे ते कितपत स्वच्छ किंवा गढूळ आहे, त्यात कोणत्या प्रकारचा कचरा वाहून येण्याची शक्यता आहे, पंप बराच काळ वापरात नसला तर कसला गाळ त्यात साचू शकतो वगैरे बाबींमुळे पंपाच्या चालण्यात पडणारा फरक वेगवेगळ्या इंपेलरच्या बाबतीत कमी जास्त असतो. त्या सगळ्यांचा विचार करून त्यानुसार निवड करणे फायद्याचे असते.



. . . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, March 03, 2010

पंपपुराण भाग ८


पंपाचा विचार करतांना तो दर मिनिटाला अमूक इतके लीटर पाणी पुरवू शकतो एवढी माहिती पुरेशी नसते. तेवढे पाणी त्याने किती मीटर उंच उचलले जाऊ शकते हे सुध्दा महत्वाचे असते. या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून त्या पंपाच्या कार्यशक्तीची कल्पना येते. एकच विशिष्ट पंप जास्त उंचीवर कमी पाणी चढवू शकतो आणि कमी उंचीवर जास्त पाण्याचा पुरवठा करू शकतो, पण या दोन गोष्टी अगदी व्यस्त प्रमाणात नसतात. दर मिनिटाला दोनशे लीटर पाणी वीस मीटर उंचावर पोचवणारा पंप वीस लीटर पाणी दोनशे मीटर उंच उचलू शकत नाही. कदाचित पंचवीस तीस मीटरच्या वर पाण्याचा एक थेंबसुध्दा जाणार नाही. याचप्रमाणे पाण्याला खूप अधिक दाब देऊ शकणारा पंप कमी दाबावर फार मोठा प्रवाह उत्पन्न करू शकत नाही. पण कोणताही ठराविक पंप किती दाबाचा किती प्रवाह निर्माण करू शकतो हे समजून घेता येणे शक्य तसेच आवश्यक असते.

नवीन उत्पादन बाजारात आणतांना त्याचा एक नमूना तयार करून त्याचे टाइप टेस्टिंग करतात. यासाठी त्या पंपाला जोडलेल्या नळाला एक प्रेशर गेज, फ्लोमीटर आणि व्हॉल्व्ह जोडून ते पाणी त्यांच्यावाटे पुन्हा जलाशयात सोडले जाते. हा व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद केला की पाइपमधून पाणी वाहण्याचा मार्ग बंद होतो. त्यामुळे इंपेलरने केंद्रामधून बाहेरच्या बाजूला ढकललेले पाणी पंपाच्या बाहेर पडू शकत नाही, ते पंपाच्या आंतच बंदिस्त राहते आणि त्यामुळे पंपाच्या आतील पाण्याचा दाब वाढतो. त्यानंतर इंपेलरमुळे आंतले पाणी जागच्या जागीच घुसळले जाते. इतर प्रकारची बहुतेक यंत्रे अशा प्रकारचा अडथळा आल्यास बिघडतात, पण सेंट्रिफ्यूगल पंप निदान कांही काळ तरी सुरळीतपणे पाणी घुसळत राहतो. त्यामुळे पाणी तापते आणि तपमान वाढल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात, शिवाय त्यात ऊर्जेचा अपव्यय होतो, या कारणांमुळे मुद्दाम कोणी हा पंपही निष्कारण असा चालवू नये, पण चांचणी घेण्यासाठी तो तसा चालवला जातो आणि त्याने कांही नुकसान होत नाही. पंपामुळे निर्माण होणारा हा पाण्याचा अधिकतम दाब असतो, पण तो प्रत्यक्ष व्यवहारात कुठल्याही कामाचा नसतो. फक्त पंप आणि पाइप वगैरेंच्या डिझाईनच्या आंकडेमोडीसाठी हा आकडा विचारात घ्यावा लागतो.

त्यानंतर तो व्हॉल्व्ह थोडासा उघडला की त्यातून पाण्याचा प्रवाह सुरू होतो आणि पाण्याला वाहण्यासाठी वाट मिळाल्यामुळे त्याचा दाब कमी होतो. त्या प्रवाहाचे प्रमाण तसेच त्यावेळी असलेला पाण्याचा दाब हे दोन्ही वेगवेगळ्या उपकरणांमार्फत मोजून त्याची नोंद ठेवतात. जसजसा व्हॉल्व्ह अधिकाधिक उघडला जातो तसतसा पाण्याचा प्रवाह वाढत जातो आणि दाब कमी होत जातो. तो पूर्णपणे उघडल्यानंतर जेवढा प्रवाह त्यातून निघेल त्याहून जास्त मिळू शकत नाही. ही अधिकाधिक क्षमतासुध्दा क्वचितच उपयोगी पडते. पाण्याचा प्रवाह आणि दाब मोजत असतांनाच त्यासाठी किती वीज खर्च झाली याचीही मोजणी करून पंपाची कार्यक्षमता ठरवली जाते. जास्तीत जास्त कार्यक्षमता ज्यायोगे मिळेल अशा प्रकाराने पंपाचा उपयोग करणे शहाणपणाचे असते. ही सगळी मोजमापे आणि निष्कर्ष तक्त्यात मांडून ठेवली जातात आणि त्यांचा आलेख काढला जातो. याला पंप कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. पंपाची निवड करण्यापासून तो कशा प्रकारे चालवायचा हे ठरवण्यापर्यंत अनेक प्रसंगी त्याचा उपयोग होतो.

असा एक आलेख वरील चित्रात दाखवला आहे. एकाच प्रकारच्या तीन वेगवेगळ्या साइझच्या तीन वक्ररेषा यांत दिसतात. जसजसा साइझ वाढेल त्यानुसार त्या पंपातून अधिक दाब निर्माण होऊ शकतो. ज्या सर्किटमध्ये पाण्याचा प्रवाह जात असतो त्यात असलेल्या पाइपलाइनी, त्यातील चढ-उतार, वळणे, व्हॉल्व्ह, मीटर वगैरे सर्वांमुळे प्रवाहाला जो अडथळा होतो त्यामुळे जास्त प्रवाहासाठी जास्त दाबाची गरज पडते. प्रवाह आणि दाब यांच्यामधला परस्परसंबंध लाल रंगाच्या दोन सिस्टीम कर्व्हमधून दाखवला आहे. लाल आणि काळ्या रंगांमधल्या वक्ररेषा ज्या बिंदूशी एकमेकींना छेद देतात त्याला ऑपरेटिंग पॉइंट म्हणतात. त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये पंपातून पाण्याचा किती प्रवाह वाहेल आणि त्यासाठी पाण्याचा किती दाब निर्माण होईल या गोष्टी हा बिंदू दर्शवतो.



. . . . . . . . . . . (क्रमशः)