Sunday, September 28, 2008

निघालो अमेरिकेला

चीन आणि चिनी लोक यांच्याबद्दल लहानपणी मला खूप कुतूहल वाटायचे, तरुणपणी त्यांच्याबद्दल चीड,
संताप आणि द्वेष वाटायला लागला. त्या नकारात्मक भावना सौम्य होऊन आता थोडे कौतुक वाटू लागले आहे असे मी या अनुदिनीमध्या मागच्या महिन्यात लिहिले होते. यू.एस.ए. किंवा बोलीभाषेत अमेरिका या देशाबद्दल लहानपणापासूनच जास्तच गुंतागुंतीच्या संमिश्र भावना मनात उमटत होत्या आणि आजही थोड्या फार फरकाने त्या तशाच जटिल आहेत.

अमेरिकेच्या इतिहासाबद्दल माझे ज्ञान कोलंबसाच्या सफरीपासूनच सुरू होते. पृथ्वी गोल आहे याची खात्री
पटल्यानंतर पश्चिमेच्या दिशेने गेल्यास पूर्व दिशेला असलेल्या हिंदुस्थानला जाणारा जवळचा मार्ग मिळेल अशा आशेने तो उलट्या दिशेने निघाला. अमेरिकेच्या किना-याजवळची कांही बेटे पाहून त्याला हिंदुस्थानच सापडल्याचा भास झाला. त्याचे दमलेले सहकारी आणखी पुढे जायला तयार नव्हते आणि आपण लावलेला हिंदुस्थानचा शोध कधी एकदा आपल्या राजाला सांगतो असे कोलंबसला झाले होते. त्यामुळे अधिक खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता तो तिथूनच परतला. पुढे अमेरिगो व्हेस्पुसी वगैरे लोकांनी कोलंबसाने शोधलेला भूभाग वेगळाच असल्याचे दाखवून दिल्यानंतर त्या खंडाचे नांव अमेरिका असे ठेवण्यात आले आणि कोलंबसाला सापडलेल्या बेटांना वेस्ट इंडीज म्हणायला सुरुवात झाली. अमेरिकेतले मूळचे प्रवासी मात्र 'इंडियन'च राहिले. भारतीयांपासून त्यांचा वेगळेपणा दाखवण्याकरता त्याला कधी कधी 'रेड' हे विशेषण जोडण्यात येते. त्यानंतर युरोपियन लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे गेल्या आणि त्यांनी तिथे नंदनवन फुलवले.

अमेरिका ही जगातील सर्वात धनाढ्य व बलाढ्य अशी महासत्ता अशीच मला या गोष्टी समजायला लागल्यापासून या देशाची ओळख आहे. खेड्यातल्या श्रीमंत सावकाराबद्दल गरीब शेतक-याच्या मुलाला जे कांही वाटत असेल किंवा गल्लीतला पोर अमिताभ बच्चनसंबंधी कसा विचार करेल तशीच माझी अमेरिकेबद्दल भावना असायची. दबदबा, आदर, वचक, असूया, कौतुक वगैरे सगळ्या परस्परविरोधी भावना त्यात आल्या. अमेरिकेसंबंधी माहिती तर सतत कानावर पडतच असायची. तिकडे घरातल्या माणसागणिक उठायबसायच्या आणि झोपायच्या वेगळ्या खोल्या आणि फिरायला वेगळ्या मोटारी असतात वगैरे ऐकून अचंभा वाटायचा, तसेच हे पहायला आणि उपभोगायला तिकडे जाण्याची इच्छा निर्माण व्हायची.

अमेरिकेत आधी गेलेल्या युरोपियन लोकांनी स्थानिक लोकांची निर्घृण कत्तल केली तसेच आफ्रिकेतून पकडून आणलेल्या निग्रो लोकांना पशूसारखे वागवून त्यांच्याकडून ढोरमेहनत करून घेतली वगैरेंच्या कहाण्या अंगावर शहारे आणतात. त्यांच्या आजच्या समृध्दीचा पाया त्यांच्या पूर्वजांच्या अशा अमानुष वागणुकीवर रचलेला आहे हे विसरता येत नाही. पण आज अमेरिकेत असलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे गोडवे गाइले जातात, तसेच तिथे व्यक्तीविकासाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे म्हणतात. गेल्या शतकात कृषी, खाणकाम, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अमेरिकेने जी घोडदौड केली आहे ती फक्त कौतुकास्पद नव्हे तर विस्मित करणारी आहे.

अमेरिकेच्या गोटात सामील होणे स्वतंत्र भारताने नेहमीच नाकारले यामुळे राजकीय क्षेत्रात या दोन देशात मतभेद राहिले. कधी कधी ते विकोपालाही गेले होते पण आता पूर्वीपेक्षा त्यांच्यातले संबंध चांगले झाले आहेत. पण अमेरिकन सरकारची धोरणे बहुतेक सुशिक्षित भारतीयांना पसंत पडत नव्हती. एका बाजूला अमेरिकन सरकारवर टीका करायची पण तिथे जायची संधी मिळाली तर ती मात्र सोडायची
नाही असेच चित्र बहुतेक मध्यमवर्गीय सुशिक्षित भारतीयांच्या घरी मला दिसत आले आहे.

अशा संमिश्र भावना घेऊन मीही आज अमेरिकेच्या वारीला निघालो आहे. मला तिथे अर्थार्जन करायचे नाही आणि ते करण्याची मुभाही नाही. तिथल्या सुबत्तेचा माफक उपभोग घेत राहणे, हिंडणे, फिरणे, हिंडता
फिरता निरीक्षण करणे आणि 'लाइफ एन्जॉय करणे' एवढाच माफक उद्देश आहे. तिथे गेल्यावर शक्य तितक्या लवकर ब्लॉगवर येण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. तेंव्हा आता पुढचा भाग अमेरिकेतून लिहीन.

देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने -३


राधाबाई बनारसे (१९१०-१९८३) -

लंडनच्या आजी या नांवाने लोकप्रिय व्यक्ती . यांची जीवनकथा ही एक अलीकडच्या काळातील एक अद्भुत गोष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका आडगांवी जन्मलेल्या या अशिक्षित बाई स्वतःच्या कर्तृत्वाने कोट्याधीश बनल्या आणि ते सुध्दा भारतात नव्हे तर चक्क इंग्रजांच्या देशांत, युनायटेड किंग्डममध्ये.
श्री.तुळशीराम देहेणकर यांचेबरोबर बालवयातच त्यांचे पहिले लग्न झाले व त्यांच्यापासून त्यांना पांच कन्यारत्ने झाल्या पण पुत्ररत्न कांही झाले नाही. पहिल्या नव-याच्या निधनानंतर वयाच्या पस्तीस वर्षाच्या असतांना त्यांना लंडनहून परतलेल्या त्यांच्याहून वीस वर्षांनी मोठ्या सीतारामपंत बनारसे यांच्याबरोबर दुसरे लग्न लावणे भाग पडले. मुलींच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी हे पाऊल उचलले खरे, पण हा दुसरा नवरा मुलींना मायदेशीच सोडून देऊन फक्त एकट्या राधाबाईंनाच आपल्याबरोबर लंडनला घेऊन गेला. बनारसे कुटुंबाचा तेथे प्रवासीनिवास व खाणावळीचा किफायतशीर व्यवसाय होता. त्यात काबाडकष्ट करणा-या एखाद्या मोलकरणीची भूमिकाच त्यांच्या वाट्याला आली. या काळांत त्यांनी त्या व्यवसायाचे सारे बारकावे शिकून घेतले व आपल्या प्रेमळ वागणुकीने तिथेच त्यांना आजी हे नांव पडले. त्यातच वृध्द पतीचे निधन झाल्यानंतर तर त्यांच्या सावत्र मुलांनी त्यांना भारतात परत पाठवून द्यायचीच व्यवस्था केली. परंतु त्या प्रस्तावाला ठामपणे नकार देऊन त्या आपले किडूकमिडूक घेऊन घराबाहेर पडल्या व जिथली बोलीभाषासुध्दा धड बोलता येत नव्हती अशा परदेशांत जवळ कसलेही भांडवल नसतांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहायची धडपड सुरू केली. सर्वप्रथम १९५३ साली त्यांनी एका इस्टेट एजंटकडून एक घर उधारीवर भाड्याने घेतले. तोपर्यंत तिच्या दोन मुलींना लंडनला आणण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यांना घेऊन त्या २५, हूप लेन इथे राहू लागल्या व त्यांनी खाणावळ सुरू केली. लवकरच त्यांच्या हातच्या चवदार अन्नाची ख्याती पसरली व त्याच्या अपार काबाडकष्टांना नशीबाने साथ दिल्याने त्यांच्या ग्राहकांची गर्दी वाढतच गेली. पुढील तीन वर्षात त्यांनी लंडनच्या वुडस्टॉक रोड आणि डॉलिस रोड या ठिकाणी दोन घरे विकत घेतली. आणखी कांही वर्षात त्याच्याकडे १२ इमारती व मोटारगाड्यांचा ताफा इतकी संपत्ती जमा झाली आणि लंडनमधील सुपरटॅक्स भरणा-या कोट्याधीशांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. लंडनला गेलेल्या अनेक नामवंत भारतीयांनी त्यांची आवर्जून भेट घेतली व त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. आजच्या संगणकयुगांत अनेक आप्रवासी भारतीय स्त्रीपुरुष परदेशात मोठमोठी सन्माननीय पदे भूषवीत आहेत. तरीसुध्दा पन्नास वर्षापूर्वी एका अशिक्षित खेडवळ मराठमोळा महिलेने परदेशात जाऊन केलेला हा पराक्रम थक्क करणारा आहे.


इंदिरा गांधी (१९१७ - १९८४)

भारताच्या या पहिल्या पंतप्रधानांचे जीवन बरेच वादग्रस्त ठरले होते. त्यातील निर्विवादपणे उल्लेखनीय अशा मोजक्या चांगल्या गोष्टी इथे देत आहे. "श्रीमती गांधी या भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधासाठी एकाग्र दृष्टीने व कुशलतेने अविरत झटणारे एक सशक्त व्यक्तिमत्व होऊन गेल्या" असे त्यांचे वर्णन अमेरिकेचे तत्कालिन सुरक्षाविषयक सल्लागार हेन्री किसिंजर यांनी केले आहे. लोकसभेत मोरारजी देसाई यांचा ३५५ विरुध्द १६९ असा दणदणीत पराभव करून त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय अणुशक्ती संशोधन कार्यक्रमाला चालना देऊन त्याचा वेग वाढवला आणि १९७४ साली राजस्थानाच्या निर्जन वाळवंटातील पोखरण या ठिकाणी स्मितहास्य करणारा बुध्द या सांकेतिक नांवाने पहिला भूगर्भीय नाभिकीय प्रयोग यशस्वी रीत्या घडवून आणला. त्यांच्या ताठर भूमिकेपुढे नमून पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी भारताच्या अटीवर द्विपक्षी तहावर सह्या केल्या. त्या करतांना शेवटची कांही कलमे त्यांना स्वहस्ताक्षरामध्ये लिहावी लागली असे म्हणतात. सन १९६० मध्ये त्यांनी कांही नाविण्यपूर्ण कृषीविषयक कार्यक्रम सुरू करून त्यांना भरभक्कम शासकीय पाठबळ दिले व त्या योगे भारतातील दीर्घकालीन जुने अन्नाचे दुर्भिक्ष्य संपून तो स्वयंपूर्ण बनला इतकेच नव्हे तर गहू, तांदूळ, कापूस आणि दूध आदिमध्ये इथे गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले, अन्नधान्याची निर्यात सुरू झाली व व्यावसायिक पिके निघू लागली. हा बदल हरित क्रांती या नांवाने सुप्रसिध्द आहे. २६ जून १९७५ रोजी त्यांनी कुप्रसिध्द राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली व दोन अडीच वर्षांनी लोकाग्रहाच्या दडपणाखाली ती उठवली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव होऊनसुध्दा पुढील निवडणुकीत विजय मिळवून त्या पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पण दुर्दैवाने ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांच्याच सुरक्षादलातील शिपायाच्या गोळीला बळी पडून त्याची प्राणज्योत मालवली.


शकुंतला देवी (जन्म १९३९)

अत्यंत गुंतागुंतीची किचकट गणिते कुठल्याही यांत्रिक उपकरणाचे सहाय्य न घेता मनातल्या मनात हिशोब करून सोडवण्याच्या त्यांच्या अद्वितीय कौशल्यामुळे शकुंतला देवी मानवी संगणक समजल्या जातात. त्यांच्या या अद्भुत सामर्थ्याची गिनेस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद केली गेली आहे. १९७७ साली त्यांनी एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ मनातल्या मनात आकडेमोड करून काढून दाखवले. १८ जून १९८० रोजी त्यांनी लंडन येथील इंपीरियल कॉलेजच्या कॉम्प्यूटर डिपार्टमेंटने काढलेल्या ७,६८६,३६९,७७४,८७० व २,४६५,०९९,७४५,७७९ अशा दोन प्रत्येकी १३ आंकड्यांच्या रँडम नंबर्सचा गुणाकार करून १८,९४७,६६८,१७७,९९५,४२६,४६२,७७३,७३० असे अगदी बरोबर उत्तर फक्त २८ सेकंदात दिले. या पराक्रमाचा उल्लेख १९९५ सालच्या गिनेस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये केला आहे. एक सुजाण गणिततज्ञ म्हणून त्या प्रसिध्द आहेतच, आपल्या या अद्भुत टॅलेंटचा सदुपयोग त्या अवघड गणिते सोडण्याव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातही करतात.

Saturday, September 27, 2008

देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने -२


सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७)

साता-याजवळच्या नायगांव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई थोर समाजसुधारक होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पति महात्मा ज्योतीराव फुले यांचेकडून प्रोत्साहन मिळाले. ब्रिटीश राजवटीमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी झटणारी ती पहिली स्त्री होती. पुणे येथे सुरू झालेल्या महिलांच्या पहिल्या विद्यालयामधील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्त्रियांचे शिक्षण व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होणा-या जाचापासून तिची मुक्तता करणे, विधवांचे विवाह आणि अस्पृष्यतानिवारण ही त्यांनी आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरवली. सन १८५२ मध्ये त्यांनी अस्पृष्य मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. १९६८ साली त्यांनी अस्पृष्यांना आपल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी आमंत्रित केले. १९७३ मध्ये एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासाठी एक उदाहरण घालून दिले. ज्या काळांत स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, त्या काळांत त्यांचे चौफेर कार्य इतर महिलांच्या तुलनेने ठळकपणे उठून दिसण्यासारखे होते. पुण्याच्या सनातनी लोकांनी त्यांच्या या तत्कालिन रूढीविरुध्द जाणा-या "अघोरी" कामगिरीवर जळजळीत टीकास्त्र सोडले व त्याला कडाडून विरोध केला. तरीही सत्यशोधक समाजाची सक्रिय सदस्य राहून त्या अस्पृष्य व महिलांच्या मुक्तीसाठी झटत राहिल्या.


श्री आनंदमयी माँ (१८९६-१९८२)

त्यांचा जन्म खेवरा येथील एका सनातनी ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. तत्कालीन रूढीनुसार त्यांच्या वयाच्या १३वे वर्षी रमणी चक्रवर्ती यांचेबरोबर त्यांचा विवाह झाला. लवकरच त्यांच्या पतीला आपल्या पत्नीच्या अद्भुत व्यक्तिमत्वाची व अध्यात्माच्या ओढीची जाणीव झाली. जसजशी त्याची आध्यात्मिक उन्नति होत गेली, तसतसे त्यांच्या पतीने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. कुठलेही शिक्षण घेतलेले नसतांना सुध्दा विविध प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे ऐकून ऐकणारे थक्क होऊन जात. त्या हठयोगाच्या आसनामध्ये प्रवीण होत्या. कुणाकडून न शिकता त्यांनी अनेक मंत्र निर्माण केले. त्या श्वास रोखून दीर्घ काळ समाधिस्थ रहात असे म्हणतात. त्यांनी जागोजागी आश्रम, सेवाभावी संस्था व इस्पितळे उभारली.


मदर तेरेसा (१९१०-१९९७)

युगोस्लाव्हियात रहाणा-या अल्बेनियन दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांचे नांव अग्नेस गोंझा बोयाझ्यू असे होते. (कठिण शब्दाच्या उच्चारातील चूकभूल माफ करावी.) कोलकात्याच्या सेंट मेरीज हायस्कूवमध्ये अध्यापन करण्यासाठी त्या १९२९ मध्ये भारतात आल्या. १९५० साली त्यांना गरीबातील गरीबांची काळजी घेण्याचा एक प्रकारचा दैवी आदेश मिळाला व त्यानुसार त्यांनी कोतकोत्यालाच मिशनरीज ऑफ चॅरिटीज या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा विस्तार होऊन ती आता जगभर पसरली आहे. समाजाने दुर्लक्षिलेल्या दुःखीकष्टी दरिद्री लोकांबद्दल त्यांनी दाखवलेली अनुकंपा व त्यांना दिलेले प्रेम यामुळे त्यांना विश्वभर अनन्य आदर प्राप्त झाला व त्या पूजनीय ठरल्या. १९७९ साली मिळालेल्या नोबेल पारितोषिकासह त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. १९८० साली त्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुनाम देण्यात आला. १९ ऑक्टोबर २००३ रोजी पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांचे बीटिफिकेशन केले. यामुळे कॅथॉलिक संतपद प्राप्त होण्याच्या दिशेने त्यांचे एक पाऊल पुढे पडले. आता त्यांना ब्लेस्ड मदर ऑफ कोलकाता म्हंटले जाते.

देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने - भाग १


मागील वर्षी नवरात्रानिमित्त कोणी नवदुर्गेची आराधना केली असेल तर कुणी नवचंडीची. कोणी नऊ दिवस व्रतस्थ राहिले असतील तर कोणी गर्बा दांडिया रास खेळून धमाल केली असेल. ब्लॉगर्सनी सुध्दा या निमित्ताने आपआपल्या ब्लॉगवर विविध गोष्टी लिहिल्या. त्यात मित्रा देसाई यांचे लिखाण मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले. त्यांनी आपल्या इंग्रजी लेखांत नऊ दैदिप्यमान भारतीय स्त्रीरत्नांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यांचा ऋणनिर्देश करून व अनुमति घेऊन मी ही मालिका मराठीमध्ये आणीत आहे. मित्राताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर ज्यांनी या ना त्या प्रकारे तत्कालीन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले, ज्या आपल्या तत्वासाठी सशक्तपणे व खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर ज्यांनी खूप दूरवर पल्ला गाठला असा अनेक थोर महिलांमधून त्यांनी नऊ चमकत्या तारका निवडल्या आहेत. या थोर महिलांच्या कांही विचारांबद्दल मतभेद असतील, त्यांच्या कांही कृती विवादास्पद ठरल्या असतील पण त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल मात्र सर्व लोक सहमत होतील असे मला वाटते. माझा लेख हे मूळ इंग्रजी लेखाचे शब्दशः भाषांतर असणार नाही पण त्यातील आशय या रूपांतरामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मूळ लेख वाचण्यासाठी इंटरनेटवरील लिंक खाली देत आहे.http://blog.360.yahoo.com/blog-P99yxro1frX8f43zKdyRwBi2

१. कोल्हापूरच्या राणी ताराबाई ( १६७५-१७६१)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मोगल बादशहा औरंगजेब सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रावर चालून आला. त्याने मोगल साम्राज्याच्या अफाट सैन्यसामर्थ्याच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आणि राजधानी रायगडासह महत्वाचे किल्ले काबीज केले आणि प्रत्यक्ष संभाजीराजांना पकडून त्याना देहांताची शिक्षा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचे धाकटे पुत्र राजाराममहाराज प्रतिकारासाठी पुढे सरसावले. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा विराट मोगल सेनेशी समोरासमोर टक्कर देणे मराठ्यांना त्या वेळेस शक्य नव्हते. पण खेड्यापाड्यातून आणि रानावनातून विखुरलेल्या मराठी शूर शिपायांनी गनिमी काव्याने लढाई सुरू ठेऊन व वारंवार अचानक छापे मारून मोगलांना जर्जर केले आणि ग्रामीण भागांत आपले वर्चस्व अबाधित ठेवले. कांही वर्षे मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळल्यानंतर सन १७०० च्या सुमारास राजाराममहाराज निधन पावले. त्याच सुमारास त्या वेळची सातारा ही त्याची राजधानीसुध्दा मोगलांनी आपल्या ताब्यात घेतली. यामुळे मराठी साम्राज्य आता निर्नायकी होऊन नष्ट होते की काय अशी भीती पडली होती. या खडतर प्रसंगी त्यांची पत्नी राणी ताराबाई खंबीरपणे नेतृत्वपदावर उभ्या राहिल्या. आपले लहानगे पुत्र द्वितीय संभाजी राजे यांना राज्यावर बसवून त्यांच्या नांवाने ताराराणी यांनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मोगलांचा प्रतिकार जोमाने चालू ठेऊन त्यांना जेरीस आणले. इतकेच नव्हे तर मोगलांच्या ताब्यातील माळव्यापर्यंत मराठ्यांनी धडक दिली. मराठ्यांमध्ये आपआपसांत कलह लावून देण्याच्या हेतूने मुत्सद्दी मोगलांनी संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज यांना पुढे आणले. तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपदाचे ज्येष्टपण त्यांना मिळाले व मराठ्यांच्या प्रमुख सेनानींनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. परंतु महत्प्रयासाने मिळवलेला आपला अधिकार असा सुखासुखी सोडायला ताराराणी तयार झाल्या नाहीत. मराठा साम्राज्याचा कांही भाग ताब्यात घेऊन त्यांनी १७१३ साली कोल्हापूरला वेगळी राजधानी व दुस-या मराठा राज्याची स्थापना केली व मुख्य मराठा महाराजाबरोबर सलोख्याचे संबंध ठेऊन शेवटपर्यंत तेथे उत्तम प्रकारे राज्य केले.
२. अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५)
माणकोजी शिंदे यांच्या धनगर कुटुंबामध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई यांनी इंदूर व आसपासच्या प्रदेशावर १७६७ ते १६९५ या काळांत राज्य केले. या काळात इंदूर हे माळवा भागातील एक समृध्द शहर बनले. त्यांच्या तीस वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांनी जी कार्ये साध्य करून दाखवली त्याबद्दल दुस-या कुठल्याही स्त्रीनेत्याला मिळाले नसेल इतके प्रेम व आदर त्यांना प्रजेकडून प्राप्त झाला. उत्तर भारतात तर त्या अहिल्यादेवी या नांवाने प्रसिध्द आहेत. त्यांचे श्वशुर मल्हारराव होळकर यांच्या तालिमीत तरबेज झालेल्या अहिल्यादेवींची अठराव्या शतकातील राजवट कल्याणकारी व परिणामकारक अशा राजसत्तेचा एक आदर्श मानला जातो. त्याशिवाय युध्दभूमीवर आपल्या सैनिकांचे योग्य प्रकारे नेतृत्व करण्याच्या कलेत सुध्दा ती पारंगत होती. ती स्वतः आघाडीवर राहून प्रत्यक्ष उदाहरणाने मार्गदर्शन करीत असे. त्या काळी प्रचलित असलेल्या गोषा पध्दतीला न जुमानता ती दररोज उघडपणे प्रजेसमोर येऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत असे. तिच्यासमोर आपले गा-हाणे मांडण्यास कोणालाही मज्जाव नव्हता. तिने विधवा स्त्रियांना त्यांच्या नव-यांच्या संपत्तीवर हक्क दिला, तसेच दत्तक पुत्र घेण्याचा अधिकारही. यामुळे त्यांचे जीवन अधिक सुसह्य व सुरळीत बनले. तिने कित्येक कुशल कारागीर व विद्वज्जनांना आश्रय दिला, अनेक लोकोपयोगी इमारती बांधल्या आणि काशी विश्वनाथ व गया येथील विष्णुपद मंदिर या सारख्या जुन्या हिंदू देवळांचा जीर्णोध्दार केला.
३. झांशीची राणी लक्ष्मीबाई (१८३४-१८५८)
महान भारतीय स्त्रियांचा गौरव झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या नांवाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही इतके हे नांव सुप्रसिध्द आहे. "रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी। ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली।।" आणि "बुंदेले हरबोलोंके मुँह हमने सुनी कहानी थी। खूब लडी मर्दानी वह तो झांशीवाली रानी थी।।" यासारखी अजरामर गीते लोकांच्या ओठावर आहेत. सामान्य ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईने झाशीच्या राजा गंगाधरराव यांचेबरोबर विवाह केला. लहानपणीच तिने घोडदौड, दांडपट्टा, तलवारबाजी अशासारख्या मर्दानी खेळांचे शिक्षण घेऊन त्यात विशेष प्राविण्य संपादन केले होते. या कौशल्याचा तिला प्रत्यक्ष जीवनात चांगलाच उपयोग झाला. तिला झालेला मुलगा दुर्दैवाने दगावल्यानंतर तिने व तिच्या पतीने दामोदरराव याला दत्तक घेऊन झाशीच्या गादीचा वारस बनवला होता. तरीही राजे गंगाधरराव यांच्या निधनानंतर तेंव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी या दत्तकविधानाची मंजूरी नाकारली व झांशीचे संस्थान अनौरस ठरवून ब्रिटिश राज्यात खालसा करायचा हुकूम दिला. पण ब्रिटीशांचा हा निर्णय न मानता "मेरी झाँसी नही दुँगी।" अशी घोषणा करून ती त्यासाठी लढायला सज्ज झाली. त्याच वेळी भारतात सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दाच्या ज्वाळा भडकल्या होत्या. राणी लक्ष्मीबाईने नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आदि इतर नेत्यांशी संपर्क साधून आपल्या सैन्यासह त्या युध्दाच्या धुमश्चक्रीमध्ये उडी घेतली व त्या महासंग्रामांत मोठी महत्वाची कामगिरी बजावली. या लढाईत तिने असीम शौर्य, धडाडी, नेतृत्व व कौशल्य यांचा प्रत्यय आणून दिला परंतु त्यांत झालेल्या जखमा जिव्हारी लागल्यामुळे त्यातच तिचे प्राणोत्क्रमण झाले. देशासाठी तिने आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

(क्रमशः)

Friday, September 26, 2008

घटस्थापना


यंदाच्या घटस्थापनेच्या दिवशी मी दूरच्या प्रवासात असणार आहे. मागल्या घटस्थापनेसाठी लिहिलेली पण या ब्लॉगवर न दिलेली ही देवीची स्तुती या कारणाने दोन दिवस आधीच देत आहे.

घटस्थापना व नवरात्राच्या शुभारंभानिमित्त नमन. जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले हे सुप्रसिद्ध स्तोत्र व मला त्याचा समजलेला अर्थ देत आहे. भक्ती, श्रद्धा वगैरे आपल्या जागी आहेतच, त्याशिवाय एक काव्य म्हणून पाहिले तरी त्यातील अनुप्रास, यमक, रूपक वगैरे अलंकार, छंदबद्ध तशीच भावोत्कट शब्दरचना मंत्रमुग्ध करणारी आहे असे मला वाटते.

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम

न मंत्रं नो यंत्रं तदपि च न जानी स्तुतिमहो।
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा।।
न जाने मुद्रीस्ते तदपि च न जाने विलपनं।

परं जाने मातस्तवदनुसरणं क्लेशहरणं।।१।।
हे माते, मी मंत्रही जाणत नाही आणि तंत्रही. मला स्तुती करणे येत नाही, आवाहन आणि ध्यान य़ांची माहिती नाही. स्तोत्र व कथा मला ठाऊक नाहीत, मला तुझ्या मुद्रा समजत नाहीत आणि व्याकुळ होऊन हंबरडाही फोडणे येत नाही. पण मला फक्त एक गोष्ट समजते ती म्हणजे तुझे अनुसरण करणे. तुला शरण येण्यामुळेच सर्व संकटांचा नाश होतो.
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया।
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्याच्युतिरभूत।।
तदेतत्क्षंतव्यं जननि सकलोध्दारिणिशिवे।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।२।।
हे सर्वांचा उध्दार करणारे माते, मला पूजाविधी माहीत नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, मी स्वभावानेच आळशी आहे आणि तुझी व्यवस्थित प्रकारे पूजा करणे मला शक्य नाही. या सगळ्या कारणांमुळे तुझ्या चरणी सेवा करण्यात ज्या तृटी येतील त्याबद्दल मला क्षमा कर, कारण वाईट मुलगा जन्माला येणे शक्य आहे पण आई कधीच वाईट होऊ शकत नाही.
पृथीव्यां पुत्रास्ते जननि वहवः सन्ति निरलाः।
परं तेषांमध्ये विरलतरलोSहं तव सुतः।।
मदीयोSयं त्यागः सनुचितमिदं नो तव।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।।३।।
माते, या पृथ्वीवर तुझे पुष्कळ साधेसुधे पुत्र आहेत पण मी त्या सर्वांमधील अत्यंत अवखळ बालक आहे. माझ्यासारखा चंचल मुलगा क्वचितच असेल. तरीही तू माझा त्याग करणे हे कधीही योग्य ठरणार नाही. कारण कुपुत्र होणे शक्य असले तरी कुमाता होणे शक्य नाही.
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता।
न वा दत्तं देवी द्रविणभपि भूयस्तव मया।।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे।
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती।।४।।
हे जगदंबे देवी माते, मी कधीही तुझ्या चरणांची सेवा केली नाही, तुला फारसे धन समर्पण केले नाही, तरीही तू माझ्यासारख्या अधम माणसावर अनुपम स्नेह करतेस कारण या जगात मुलगा वाईट होऊ शकतो पण आई कधीही वाईट बनू शकत नाही.
परित्यक्ता देवा विविधविधि सेवा कुलतया।
भया पंचाशीते रधिकमपनीते तु वयसि।।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भवता।
निरालंबोलंबोदरजननि कं यामि शरणं।।५।।
हे गणपतीला जन्म देणा-या पार्वतीमाते, इतर अनेक देवतांची विविध प्रकाराने सेवा करण्यात मी व्यग्र होतो. पंचाऐंशीचा झाल्यानंतर आता माझ्याच्याने ते होत नाही म्हणून मी त्या सर्व देवांना सोडून दिले आहे व त्यांच्या मदतीची आशा उरलेली नाही. या वेळी मला जर तुझी कृपा मिळाली नाही तर मी निराधार होऊन कुणाला शरण जाऊ?
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा।
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै।।
तवापर्णे कर्णे विशति मनवण्रे फलमिदं।
जनःको जानीते जननि जपनीयं जपविधौ।।६।।
हे अपर्णामाते, तुझ्या मंत्राचे एक अक्षर जरी कानावर पडले तरी मूर्ख माणूससुध्दा मधुपाकासारखे मधुर बोलणारा उत्तम वक्ता होतो, दरिद्री माणूस कोट्यावधी सुवर्णमुद्रा मिळून चिरकाल निर्भर होऊन विहार करतो. तुझ्या मंत्राचे एक अक्षर ऐकण्याचे एवढे मोठे फळ आहे तर जे लोक विधीवत् तुझा जप करतात त्यांना काय मिळत असेल हे कोण जाणेल?
चिताभस्मालेयो गरलमशनं दिक्पटधरो।
जटाधारीकण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः।।
कपाली भूतेशो भजति जगदीशै क पदवीम्।
भवानी त्वत्प्राणिग्रहण परिपाटी फलमिदम्।।७।।
जो आपल्या अंगाला चितेची राख फासतो, विष खातो, दिगंबर राहतो, डोक्यावर जटा वाढवतो, गळ्यात सांप धारण करतो, हातात (भिक्षेचे) कपालपात्र धरतो, अशा भुतांच्या व पशूंच्या नाथाला जगदीश ही पदवी कशामुळे दिली जाते? हे भवानी, अर्थातच तुझे पाणिग्रहण (तुझ्याशी विवाह) केल्याचेच हे फळ त्याला मिळाले असणार.
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभवाच्छापि च न मे।
न विज्ञानापेक्षा शशिमुख सुखेच्छापि न पुनः।।
अतस्त्वां संचाये जननि यातु मम वै।
मृडानी रुद्राणी शिवशिवभवानीति जपतः।।८।।
मला मोक्ष मिळवण्याची इच्छा नाही, जगातील वैभवाची अभिलाषा नाही, विज्ञानाची अपेक्षा नाही, सुखाची आकांक्षा नाही. हे चन्द्रमुखी माते, तुझ्याकडे माझे एवढेच मागणे आहे की माझा जन्म मृडानी रुद्राणी शिवशिवभवानी या तुझ्या नामांचा जप करण्यात व्यतीत होवो.
नाराधितासि विधिना विविधोपचारैः।
किं रुक्षचिन्तन परैर्न कृतं वचोमि।
श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाये।
धत्से कृपामुचितमम्ब परे तवैव।।९।।
नाना प्रकारच्या पूजा सामुग्रीद्वारे तुझी विधिवत् पूजा माझ्याकडून घडली नाही. नेहमी रूक्ष चिंतन करणा-या माझ्या वाचेने कोणकोणते अपराध केले नसतील? हे श्यामा माते, तरीही तू स्वतः प्रसन्न होऊन माझ्यासारख्या अनाथावर थोडीशी कृपा करतेस हे तुझ्या योग्यच आहे.
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशि।।
नैतच्छठत्वं मम भावमेथाः क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति।।१०।।
करुणेचा सागर अशा माता दुर्गे, संकटात सापडल्यानंतर मी तुझे स्मरण करीत आहे. (आधी केले नाही) पण ही माझी शठता आहे असे मानू नकोस कारण तहान भूक लागल्यावरच मुलाला आईची आठवण येते.
जगदम्ब विचित्रमय किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी।
अपराध परंपरा परं न हि माता समुपेक्षते सुतम्।।११।।
हे जगदम्बे, माझ्यावर तुझी पूर्ण कृपा आहे हे आश्चर्य आहे मुलगा अपराधावर अपराध करीत गेला तरी माता कधीही त्याची उपेक्षा करीत नाही.
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि।
एवम् ज्ञाता महादेवी यथा योग्यं तथा कुरु।।१२।।
हे महादेवी, माझ्यासारखा पापी कोणी नाही आणि तुझ्यासारखी पापाचा नाश करणारी कोणी नाही हे जाणून तुला जे योग्य वाटेल ते कर.
---------------------------------------------------------
मराठी अनुवाद करतांना मी माहितीजालावर मिळालेल्या कांही हिंदी व इंग्रजी भाषांतरांचा उपयोग करून घेतला आहे. मी स्वतः कधीच संस्कृत किंवा धर्मशास्त्रे शिकलेलो नसल्याने त्यामधून कदाचित मूळ संस्कृतमध्ये अभिप्रेत नसलेले शब्द किंवा अर्थ आले असण्याची शक्यता आहे. पण माझ्या कल्पनेप्रमाणे तपशीलात न जाता स्तुतीमधला एकंदर भाव मला बरोबरच समजला आहे असे मला वाटते.

स्व.मोगूबाई आणि श्रीमती किशोरीताई


हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या विश्वात गुरुशिष्यपरंपरेला अपरंपार महत्व आहे. शिष्याने किंवा चेल्याने अत्यंत लीनवृत्तीने गुरूकडून कणाकणाने विद्या संपादन करायची आणि गुरूजी किंवा उस्तादजी यांनी अगदी श्वासोच्छ्वास आणि शब्दोच्चारापासून संगीताचा संपूर्ण अभ्यास त्याच्याकडून चांगला घोटून घ्यायचा अशा पद्धतीने या दिव्य शास्त्राचा प्रसार पिढ्यानपिढ्या होत आला आहे. संगीतज्ञांच्या घरी जन्माला आलेल्या मुलांना तर त्याचे बाळकडू अगदी जन्मल्यापासूनच मिळायला सुरुवात होते. श्रेष्ठ अशा पितापुत्रांच्या अनेक जोड्या या क्षेत्रात होऊन गेल्या आहेत, पण स्व.मोगूबाई कुर्डीकर आणि श्रीमती किशोरीताई आमोणकर यांची अत्युच्चपदापर्यंत पोचलेली आई व मुलगी यांची अद्वितीय जोडी आहे.


स्व.मोगूबाई कुर्डीकर यांचा जन्म गोव्यातील कुर्डी या गांवी १५ जुलै १९०४ रोजी झाला. गोड आवाजाची देणगी मिळालेल्या आपल्या मुलीने संगीताच्या क्षेत्रात चांगले नांव मिळवावे असे त्यांच्या आईला वाटत होते. त्यामुळे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या गायनाच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आधी स्थानिक देवालयात होणारी भजने वगैरे शिकल्यानंतर तिला एका संगीत नाटक कंपनीत पाठवण्यात आले. नाटकांत कामे करण्यासाठी त्या सांगलीला आल्या. तेथे त्यांची संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांच्याबरोबर भेट झाली. पुढे अल्लादियाखाँसाहेब मुंबईला आल्यावर त्यांच्याबरोबर त्याही मुंबईला आल्या. त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी जयपूर अत्रौली घराण्याच्या गायनाचे शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य प्राप्त केले. आवाजाची दैवी देणगी, खाँसाहेबांची तालीम आणि कठोर परिश्रम यांच्या योगावर त्या स्वतः उच्च कोटीच्या गायिका झाल्या. देशभरातील अनेक मंचावर त्यांनी आपल्या गायनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. संगीत नाटक
अकादमी आणि संगीत रिसर्च अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळाले भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण ही पदवी प्रदान करून त्यांचा सन्मान केला. त्या जशा स्वतः उत्कृष्ट गायिका होत्या तशाच फारच चांगल्या शिक्षिका ठरल्या. पद्मा तळवलकर, कमल तांबे, सुहासिनी मुळगांवकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड यासारख्या त्यांच्या शिष्यगणानेही दिगंत कीर्ती मिळवली आणि जयपूर घराण्याचे नांव पसरवले.


या सर्व शिष्यवर्गात मेरूमणी शोभेल असे सर्वात ठळक नांव त्यांच्या सुकन्या किशोरी आमोणकर यांचे आहे. किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ रोजी झाला. कळायला लागल्यापासूनच त्यांनी आपल्या आईकडून शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि लवकरच जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकीत नैपुण्य मिळवले. जयपूर घराण्याचा मूळ बाज कायम ठेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि गायन कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःची अशी अद्भुत शैली निर्माण केली आहे. आजच्या जमान्यातल्या त्या सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गायिका मानच्या जातात. त्या श्रेष्ठ गायिका तर आहेतच, पण बुद्धीमत्ता, विद्वत्ता, व्यासंग आदि अनेक गुण त्यांच्या अंगात आहेत. संगीतशास्त्राचा तसेच संगीतविषयक साहित्याचा त्यांनी खूप अभ्यास केला आहे. त्यावर सखोल विचार केलेला आहे. या सा-या गोष्टींचा प्रभाव त्यांच्या गायनात दिसून येतो.


शास्त्रीय संगीतातील ख्यालगायन तर त्या करतातच, पण ठुमरीसारखे उपशास्त्रीय संगीत, भावपूर्ण भावगीते
आणि भक्तीरसाने ओथंबलेली भजने त्यांनी गायिलेली आहेत. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडी निघालेल्या आहेत आणि अफाट लोकप्रिय झाल्या आहेत. त्याद्वारे त्यांचे गायन आता जगभर घरोघरी पोचले आहे. त्यांचा कोठलाही सार्वजनिक कार्यक्रम ऐकायला दुरून येऊन श्रोते गर्दी करतात आणि तो हाउसफुल झाल्याशिवाय रहात नाही.


किशोरीताई कांहीशा शीघ्रकोपी आहेत अशी एक समजूत पसरवली गेलेली आहे. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी रंगमंचावरील वादक साथीदार, मंचामागील संयोजक आणि समोरील श्रोतृवृंद हे सगळेच त्यांच्या धाकात असल्यासारखे वाटते. त्यांचे गाणे सुरू असतांना कोणाचा मोबाईल वाजता कामा नये, कोणीही त्याचे रेकॉर्डिंग करू नये वगैरे सूचना कडक शब्दात दिल्या जातात आणि त्यांचे कसोशीने पालनही होते. पण एकदा त्यांचे गाणे रंगात आले की सारेजण आपोआपच ब्रम्हानंदात विलीन होऊन जातात. कांहीतरी अद्भुत आनंद घेऊनच प्रत्येक श्रोता सभागृहाच्या बाहेर पडतो.


किशोरीताईंनासुद्धा पद्मविभूषण या पदवीने सन्मानित केले आहे. हा खिताब मिळालेली आई व मुलगी यांची ही एकमेव जोडी असावी. त्याशिवाय त्यांना राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. इतर सन्मानांची तर गणनाच करता येणार नाही. अशी आहे ही माता व कन्या यांची अद्वितीय जोडी.

गानहिरा


हिराबाई बडोदेकर हे सुप्रसिद्ध नांव माझ्या अगदी लहानपणापासून कधीकधी कानावर पडत होते, वाचनात
होते, पण शास्त्रीय संगीताची साधी तोंडओळखसुद्धा झालेली नसल्यामुळे त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या यापलीकडे मला हिराबाईंची कांहीच माहिती नव्हती. त्यांच्या जन्मशताब्दीचा सांगतासमारोह म्हणता येईल असा एक सुरेख व सुरेल कार्यक्रम पहायला व ऐकायला मिळाला होता त्यात मला ठाऊक नसलेली थोडी माहिती मिळाली. त्याच्या आधारावर त्यानंतर आलेल्या २९ मे रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्य चार ओळी लिहाव्यात असे वाटल्याने लिहिलेला लेख पडून राहिला होता. तो आज सादर करीत आहे.


किराणा घराण्याचे अध्वर्यू पै.उस्ताद अब्दुल करीमखान यांच्या त्या कन्यका. त्यांचे घरातले नांव चंपूताई असे होते पण सार्वजनिक जीवनात त्या हिराबाई बडोदेकर या नांवाने वावरल्या. संगीतज्ञ व गायक पं.सुरेशबाबू माने हे त्यांचे ज्येष्ठ बंधू व प्रख्यात गायिका सरस्वती राणे या त्यांच्या कनिष्ठ भगिनी होत्या. त्यांच्या मातोश्री ताराबाई या अब्दुल करीमखाँ यांच्यापासून फारकत झाल्यानंतर आपल्या मुलांसह पुण्याला स्थाईक झाल्या. उस्ताद अब्दुल करीमखान यांनी स्वतः हिराबाईंना कधीच संगीताची तालीम दिली नाही. पण त्यांचे गायन व इतर विद्यार्थ्यांना शिकवणे ऐकून हिराबाईंनी एकलव्याच्या निष्ठेने त्यातील बरेच काही ग्रहण केले. आपल्या शास्त्रीय संगीताच्या रीतसर शिक्षणाची सुरुवात त्यांनी वडील बंधू सुरेशबाबू यांच्याकडून केली आणि त्यानंतर लवकरच उस्ताद अब्दुल वहीदखान यांच्याकडे त्या शिकायला लागल्या. मधुर आवाज, कुशाग्र बुद्धीमत्ता व अद्वितीय ग्रहणशक्ती यांचे वरदान लाभलेल्या हिराबाई लहान वयातच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात पारंगत झाल्या. त्यांच्या मातोश्री ताराबाई यांनी त्यांना जीवनामध्ये पुढे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या काळात कुलीन स्त्रिया सार्वजनिक जागी गायन करीत नसत. जात्यावरल्या ओव्या, देवाची भजने, हदगा किंवा मंगळागौर यासारख्या उत्सवात म्हणायची स्त्रीगीते एवढीच त्यांच्या गायनाची मर्यादा होती. दहा लोकांसमोर गाणारी बाई म्हणजे नायकीण असेच समीकरण रूढ होते. त्या नायकिणी उभे राहूनच हावभाव करीत गायच्या व प्रेक्षकांचेही त्यांच्या गायनापेक्षा अदाकारीकडेच अधिक लक्ष असायचे. अशा काळात हिराबाईनी सर्रास संगीत मैफलींमध्ये जाऊन व बसून गायला सुरुवात केली, एवढेच नव्हे तर तिकीट लावून स्वतःच्या गायनाचे प्रयोग केले व शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या व त्या अफाट लोकप्रिय झाल्या. त्या काळात मराठी संगीत नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुष नट करीत होते व बालगंधर्व यशाच्या शिखरावर होते. स्वतःची नाट्यसंस्था सुरू करून त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून हिराबाई रंगमंचावर उभ्या
राहिल्या आणि त्यांनी या क्षेत्रातही आपली जागा निर्माण केली. प्रख्यात लेखक ना.सी.फडके व मामा
वरेरकरांनी त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेली नाटके खास त्यांच्यासाठी लिहिली. ललित व संत मीराबाई
यासारख्या कांही चित्रपटांतसुद्धा हिराबाईंनी भूमिका केल्या तसेच कांही मधुर भावगीते मराठी रसिकांना दिली. या सगळ्या खटाटोपामागे त्यांच्या मातोश्री ताराबाईंचा व वडील बंधूंचा सक्रिय पाठिंबा हिराबाईंना मिळाला व त्याला स्वतःच्या प्रयत्नांची जोड देऊन त्यांनी संगीत, नाट्य, चित्रपट या कलाक्षेत्राचे दरवाजे घरंदाज मुलींसाठी खुले करून दिले. त्यांच्या कलेला व कर्तृत्वाला भरपूर वाव मिळेल असे नवे मार्ग तयार त्यांना करून दिले. हे यश गांठण्यापूर्वी त्यांना किती वेळा उपहास, विरोध, मानहानी वगैरेचा सामना करावा लागला असेल व खंबीरपणे त्याला तोंड देऊन त्या ठामपणे उभ्या राहिल्या असतील याची आज कल्पना करता येणार नाही.


हे सगळे ऐकतांनाच किती अद्भुत वाटते ना? हिराबाईंच्या शतकमहोत्सवाच्या निमित्याने त्यांचेवर एक विस्तृत चित्रफीत बनवली आहे. त्यातील निवडक भागांचे दर्शन व त्यासोबत आजच्या कांही गायकांचे गायन अशा स्वरूपाचा 'गानहिरा' हा कार्यक्रम पुण्याच्या स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेने सादर केला. यात हिराबाईंच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती होती. अनेक प्रसंगी थोरा मोठ्या लोकांसोबत काढलेली त्यांची दुर्मिळ छायाचित्रे होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, खुद्द राष्ट्रपती अशा मंडळींचा त्यात समावेष होता. तसेच कांही दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात पु.ल.देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, ज्योत्स्ना भोळे वगैरे प्रभृतींनी हीराबाईंच्या गायनकलेबद्दल तसेच शालीन वागणुकीबद्दल भरभरून सांगितले होते. खुद्द बालगंधर्वांनी हिराबाईंच्या नाट्यगीतांचे कौतुक केले होते. पद्मभूषण हा सन्मान त्यांना लाभला होता तो स्वीकारीत असतांनाचा क्षण होता. हिराबाईंच्या शास्त्रीय गायनाची थोडी झलक दाखवणारे व त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे नमूने त्यात समाविष्ट केलेले होतेच.


मधुर आवाज, उत्तम तयारी आणि प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा यांचा संयोग करून त्या आपले गाणे रंगवीत असत. त्यांचा तार सप्तकातील 'सा'चा नाद हुबेहूब तानपुरा छेडल्याइतका स्पष्ट व कणखर येत असे. त्यामुळे त्यांचे श्रोते त्या दिव्य षड्जाची आतुरतेने वाट पहात असत असे म्हणतात. त्यांच्या गाण्याइतकेच त्यांचे बोलणे मृदु होते व वागणे शालीनतेचे होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व लोकांवर त्यांनी आपली छाप पाडलेली होती असे दिसते. त्यांच्या आठवणी सांगतांना असे सांगितले गेले की त्या जशा उत्कृष्ट गायिका होत्या तशाच पाककुशल होत्या. बडे गुलाम अलीखान यासारखे मोठे कलाकार जेंव्हा पुण्याला यायचे तेंव्हा त्यांचा मुक्काम हिराबाईंच्या घरी असायचा व त्या त्यांच्यासाठी खास लज्जतदार खाना बनवून देत असत.


हिराबाई बडोदेकर या श्रेष्ठ गायिका तर होत्याच, त्याशिवाय अनेक रंगांनी रंगलेले बहुरंगी, सोज्ज्वळ तसेच प्रभावी व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते आणि विरोधाला न जुमानता नवे रस्ते निर्माण करून त्यावरून वाटचाल करण्याची धडाडी त्यांच्यात होती. आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सहजपणे वावरणा-या महिलांच्या मार्गाचा पाया हिराबाईसारखींनी घातला होता हे कित्येकांना ठाऊक नसेल.

Thursday, September 25, 2008

महाराष्ट्र देश


आपले महाराष्ट्र हे राज्य आपल्या भारत या देशाचा एक भाग आहे हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे, पण "बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।" आणि "मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा । प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।" अशासारख्या सुप्रसिद्ध जुन्या कवितांमध्ये 'महाराष्ट्रदेश' असे वर्णन आले आहे. या गीतांचे कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि गोविंदाग्रज या सुविद्य व्यक्तींना महाराष्ट्र हा एक देश नसून ते एक राज्य आहे इतकी साधी गोष्ट माहीत नव्हती कां त्यांच्या मनांत भारतातून फुटून निघून महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश बनावा असे देशद्रोही विचार होते असे कोणाला वाटेल. पण तसे कांहीसुद्धा असणे शक्य नाही. मग नेमका काय घोळ आहे?

पहायला गेले तर 'देश', 'प्रदेश', 'राज्य', 'राष्ट्र' वगैरे शब्द जुनेच आहेत, पण या शब्दांचा जो अर्थ आपण काढतो तो मात्र तितकासा जुना नाही. एका राजाच्या अंमलाखालील प्रदेश म्हणजे 'राज्य' या अर्थाने हा शब्द प्राचीनकालापासून रूढ होता. मोठा बलशाली राजा असेल तर तो सम्राट या नांवाने ओळखला जात असे व इतर राजे त्याचे मांडलीक बनून रहात. त्या सर्वांचे मिळून त्याचे 'साम्राज्य' बनत असे. शंभर वर्षापूर्वी जगातील पांचही खंडांत इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा केनिया, युगांडा यांप्रमाणेच इंडिया किंवा हिंदुस्तान हा त्याचा भाग होता. आपल्या सोयीसाठी इंग्रजांनी आधी त्यातून बर्मा (ब्रम्हदेश किंवा आताचा मायनामार) व सिलोन (आताची श्रीलंका) वेगळे केले व स्वातंत्र्य देण्यापूर्वी हिंदुस्तानाचे विभाजन करून त्यातून भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले. या शिवाय हैदराबाद व म्हैसूरसारखी प्रचंड आकाराची तसेच सांगली वा जमखंडी यासारखी छोटेखानी अनेक संस्थाने इंग्रजांच्या अधिपत्याखाली होती. तेथील संस्थानिकसुद्धा स्वतःला 'राजे' म्हणवून घेत व त्यांचे संस्थान हे त्यांचे 'राज्य' असे. माझ्या लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकांत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यू.एस्.ए.) चा उल्लेख 'अमेरिकेची संयुक्त संस्थाने' असा केला जात असे. ब्रिटिश इंडियाची विभागणी मुंबई, मद्रास, बंगाल, पंजाब इत्यादि इलाख्यांमध्ये (प्रॉव्हिन्सेसमध्ये) केलेली होती.

इंग्रजी साम्राज्याला विरोध करून स्वातंत्र्याचा लढा देणा-या स्वातंत्र्यवीरांनीच 'देश' आणि 'राष्ट्र' हे शब्द आज रूढ असलेल्या अर्थाने प्रचारात आणले असावेत. आता ते 'कंट्री' आणि 'नेशन' या इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द वाटतात. पण भौगोलिक सीमारेषा दाखवणारा 'कंट्री' हा शब्द आणि त्या सीमांमध्ये राहणा-या लोकांचा समूह म्हणजे 'नेशन' इतका स्पष्ट फरक 'देश' आणि 'राष्ट्र' या शब्दांचा उपयोग करतांना केला जात नाही व हे दोन्ही समानार्थी शब्दच असावेत असे वाटते. संपूर्ण हिंदुस्तान हा एक देश असावा ही भावनाच इंग्रजांना मान्य नव्हती व त्यांना सोयीची नव्हती. शिवाय ते इकडे येण्यापूर्वीसुद्धा तो अनेक राज्यांमध्ये विभागला गेलेला होताच. त्यामुळे त्या काळात आपण व आपल्या ओळखीच्या व्यक्ती रहात असलेल्या जागेच्या आजूबाजूचा आपल्या परिचयाचा भाग तेवढा 'देश' आणि त्याच्या पलीकडील सगळा अपरिचित भाग 'परदेश' या अर्थाने हे शब्द वापरले जात असावेत असे जुनी पुस्तके वाचतांना वाटते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी सगळी संस्थाने खालसा करून त्यांच्या अंमलाखालील भूभाग भारतीय संघराज्यात विलीन करून घेतल्यानंतर जुनी राजेशाही संपुष्टात आली होती. त्यानंतरच्या काळात भारताची जी फेररचना करण्यात आली त्यात 'राज्य' या शब्दाला नवीन अर्थ दिला गेला, त्याची नव्याने व्याख्या केली गेली. 'प्रांत' हा त्या काळी प्रचारात असलेला शब्द बदलून त्याऐवजी 'राज्य' या संस्कृत शब्दाला प्राधान्य दिले गेले व अनेक 'राज्यां'चे मिळून भारतीय 'संघराज्य' करण्यात आले. तसेच भारत हा एक 'देश'असे सर्वसामान्यपणे समजले जाऊ लागले.

खरे तर 'प्रदेश' हा 'देशा'पेक्षा मोठा असायला हवा. पण त्याचा संकोच करून 'उत्तर प्रदेश', 'मध्यप्रदेश', 'आंध्रप्रदेश' अशी नांवे राज्यांना दिली गेली. त्याचप्रमाणे 'महाराष्ट्र' हे राष्ट्रापेक्षा महान असले पाहिजे, पण खूप काळ घासाघीस करून शेवटी ते नांव आपल्या राज्याला देण्यात आले. यासाठी मोठा लढासुद्धा दिला गेला होता. हे करतांना फक्त व्याकरणाचा विचार न करता कांही परंपरा व लोकांच्या भावनांना महत्व देण्यात आले.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही कविता ज्या काळांत लिहिल्या गेल्या तेंव्हा 'राज्य' ही संकल्पनाच वेगळी होती आणि 'देश' शब्दाचा तत्कालिन रूढ अर्थही वेगळा होता. पण महाराष्ट्राचा भूगोल आणि इथल्या रहिवाशांच्या पूर्वजांनी रचलेला इतिहास या दोन्हींचे अत्यंत मार्मिक वर्णन या दोन्ही कवितांमध्ये दिले आहे आणि त्या अजरामर झालेल्या आहेत. इंग्रजांच्या राज्यात मराठी भाषा बोलणारी जनता मुंबई व मध्यप्रांतात तसेच हैद्राबाद संस्थानात विभागून इतर भाषिक लोकांबरोबर रहात होती. १ मे रोजी आपण जो महाराष्ट्रदिन साजरा करतो त्या दिवशी मुख्यतः मराठीभाषिक लोकांची वस्ती असलेल्या या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करून त्याचे एक वेगळे राज्य बनवण्यात आले. ही एक प्रशासनिक पुनर्रचना होती. यापूर्वीसुद्धा तेथील मराठी लोक व त्यांची संस्कृती अस्तित्वात होतीच. महाराष्ट्राचा 'जन्म' त्या दिवशी झाला म्हणजे तिथे पूर्वी कांही नव्हते अशातला भाग नाही. 'महाराष्ट्र' या नांवाच्या एका राज्याचा नवा प्रशासनिक कारभार त्या दिवशी सुरू झाला.

अग्निप्रलय ?


ही घटना मागच्या आठवड्यात घडली. दादरकडे जाणा-या बसमध्ये दोन मध्यमवयीन महिला चढल्या आणि स्त्रियांच्या राखीव जागेवर जाऊन बसल्या. त्यातली एक काठापदराचे लुगडे नेसलेली, कपाळाला रुपयाएवढा कुंकवाचा टिळा लावलेली अशिक्षित बाई होती. आपण त्यांना मावशी म्हणू. तर दुसरी हल्ली प्रचलित असलेल्या पोषाखातली पांढरपेशा वर्गातली चांगली सुशिक्षित दिसत होती. त्यांना ताई म्हणू. दोघींच्या राहणीत अंतर असले तरी दोन महिला शेजारी बसल्यावर त्यांचे बोलणे सुरू होणार हे अपेक्षित होते, पण त्या दिवशी मावशीबाईंच्या मनात कांहीतरी डुचमळत होते आणि ते कुणाला तरी भडाभडा सांगून टाकल्याखेरीज त्यांना चैन पडली नसती. त्यामुळे त्यांनीच सुरुवात केली. "ही बस लवकर मिळाली ते बरं झालं हो बाई. मला आता आधी सिध्दीविनायकाचं दरसन घ्येऊन विक्रोळीच्या मुलीलाबी भेटून यायाचे हाये."

"कां, आज कांही खास दिवस आहे कां? "

"म्हंजी, तुमाला कायबी ठावं न्हाई? अवं उद्याला समदं जग जळून खाक व्हनार हाय म्हनत्यात! फकस्त आजचा दीस हाय आपल्याकड़े."

"असं कसं होईल? असं कुणी सांगितलं तुम्हाला ?"

"अवं, आजच्या प्येपरात छापून आलंय म्हनं, तुमी त्ये वाचलं न्हाई का?"

ताईंना स्वतःचीच थोडी शरम वाटली. त्या कधीकाळीच्या चांगल्या 'डबल एम्मे' असल्या तरी आता शंभर टक्के 'कर्तव्यदक्ष गृहिणी' झाल्या होत्या. त्यांना रोजच्या त्याच त्या राजकारणातल्या बातम्या वाचण्यात रस नव्हता. खून, बॉंबस्फोट अशी सनसनाटी किंवा सिनेनटीच्या लफड्या कुलंगड्यासारखी चविष्ट बातमी पहिल्या पानावर नसेल तर ते पान लगेच उलटून ताई नाटक सिनेमा किंवा साड्यांचा सेल वगैरेंच्या बातम्यांच्या पानाकडे वळत असत. सायन्स या विषयाशी त्यांचे कधीच सख्य नव्हते. त्यामुळे त्या विषयावर ठळक मथळा दिला होता त्याकडे तुच्छतेने पाहून त्यांनी ते पान उलटले होते. त्या म्हणाल्या,"अहो, आज मला बाहेर जायचं होतं ना, त्यामुळे पेपर वाचायला वेळच मिळाला नाही बघा. त्यात असं काय छापून आलंय्?"

"ते लोक लंढनला कसला स्फोट करणार हायेत म्हनं, त्यात यवढी मोठी आग तयार व्हईल की ती समदं जग जाळून टाकनार हाये."

"पण असं केलं तर ते लोक पण मरतील ना? ते कशाला असं करतील?"

"कायकीबाई! पन त्यांनी कायबी चूक केली तर ते सोताबी मरतील आनि आपनबी खलास होऊन जानार. जगातलं अक्षी सगळं कांही जळून खाक होनार हाय म्हनत्यात."

"हो का, मला मेलीला हे माहीतच नव्हतं. आता सिद्धीविनायकाला जाताच आहात तर त्यालाच कायतरी गा-हाणं घाला."

"त्यासाठीच तर म्या तकडं चाललेय्, पन लेक आनि नातवंडांनाबी येक डाव पाहून येईन, पुन्हा नदरंला पडतील की न्हाय कुणास ठावं."

"बरोबर आहे" असे म्हणत ताईंनी पर्समधून मोबाईल काढला आणि चौकशी करण्यासाठी नव-याचा नंबर लावला.


..................................


Large Hadron Collider (LHC) या महाप्रयोगाबद्दल एका उच्चशिक्षित आणि आदरणीय अशा सद्गृहस्थाची प्रतिक्रिया: विश्वातल्या सर्वात सूक्ष्म अशा कणाचा शोध घेण्यासाठी या लोकांनी आजवर तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रसामुग्रीपेक्षा मोठी अशी विशालकाय उपकरणे निर्माण केली आहेत. वैदिक काळातल्या आपल्या ऋषीमुनींना हे सारे ज्ञान फक्त ध्यानधारणेतून प्राप्त झाले होते.(!!!)

यावर आता मी काय म्हणणार?

Tuesday, September 23, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - ५


दुस-या महायुध्दानंतर साम्राज्यशाही नष्ट होऊन आशिया आणि आफ्रिका खंडातले बहुतेक सारे देश स्वतंत्र झाले. त्यामुळे अनेक नवी राष्ट्रे निर्माण झाली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुध्दा 'इंडिया'चा संघ युनियन जॅकखाली ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत होता. तो कदाचित अपवाद असेल. स्वातंत्र्याच्या आधीच त्यातून बर्मा (आताचा मायनामार) आणि सिलोन (श्रीलंका) वेगळे झाले, भारताच्या स्वातंत्र्याबरोबर पाकिस्तान जन्माला आले आणि त्यातून कालांतराने बांगलादेश वेगळा निघाला. नेपाळ व भूतान यांनीही ऑलिम्पिकमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या इथेच एकाचे सात झाले. यू.एस.एस.आर.ची सोळा शकले झाली, कित्येक अरब शेख आणि महासागरातल्या छोट्या बेटांनी आपापल्या जागा बनवल्या. अशा रीतीने ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवात भाग घेणा-या संघांची संख्या वाढत गेली.
महायुध्दानंतर लगेच यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये जगाचे धृवीकरण झाले. पं.नेहरूंनी नॉनअलाइन्ड देशांचा तिसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा समर्थ बनला नाही. धृवीकरण झालेल्या देशांमध्ये शीतयुध्द सुरू होऊन बराच काळ ते चालले. त्याचा परिणाम ऑलिम्पिक खेळांवरही झाला. कधी एका गटाने त्यावर बहिष्कार टाकला तर कधी दुसरा गट त्यापासून दूर राहिला. त्यामुळे कांही वर्षी खेळाडूंची उपस्थिती किंचितशी घटली. तरीसुध्दा याच काळात विमानवाहतूकीत प्रचंड प्रगती होऊन दूरचा प्रवास सुरक्षित, सोपा आणि स्वस्त झाला यामुळे दरवर्षी खेळाडूंची संख्या वाढत गेली. १९४८ साली लंडनला ५९ देशातून ४१०४ खेळाडू आले होते. त्यांची संख्या वाढत वाढत आता या वर्षी बीजिंग इथे २०४ संघातून ११०२८ इतकी झाली आहे. क्रीडास्पर्धांची संख्यासुध्दा १३६ वरून दुपटीपेक्षा जास्त ३०२ इतकी झाली.


पहिली अनेक वर्षे यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्याची चुरस होती. कधी यातला एक संघ पुढे असे तर कधी दुसरा. जेंव्हा एका गटाने बहिष्कार टाकला तेंव्हा यातला जो संघ उपस्थित असे त्याची चंगळ होत असे. तो निर्विवादपणे इतर सगळ्या देशांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येत असे. यू.एस.एस.आर.चे विघटन झाले आणि चीनने या स्पर्धेत प्रवेश केला त्यानंतर रंग पालटला. या वर्षी चीनने यू.एस.ए आणि रशिया या दोघांनाही मागे टाकून अव्वल नंबर पटकावला आहे.


मधल्या काळात टेलिव्हिजनच्या प्रसारणात झालेल्या क्रांतीमुळे ऑलिम्पिकचे खेळ पाहणे तरी आता घराघरात पोचले आहे. यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळते आणि त्याबरोबरच त्याला व्यवसायाचे परिमाण प्राप्त झाले आहे. अर्थातच आता तो संपूर्णपणे हौशी खेळाडूंचा खेळ राहिलेला नाही.


ऑलिम्पिकबद्दल अजून खूप कांही लिहिण्यासारखे आहे. पण आता या वर्षीच्या मेळाव्याचे सूप वाजून ती जुनी झाल्यामुळे आता चार वर्षे तरी कोणाला या विषयात रस वाटणार नाही. तेंव्हा ही मालिका इथेच आटोपती घेतलेली बरी.
. . . . .. . . . (समाप्त)

Monday, September 22, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - ४


आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथांच्या मालिकेतला हा लेख माझ्या संगणकात बिघाड झाल्याकारणामुळे देता आला नव्हता. त्यानंतर गणरायाचे आगमन झाले. आता पुन्हा हा विषय घेऊन ही मालिका पूर्ण करायची आहे.


दोन महायुध्दांच्या दरम्यान जगभरातले राजकीय वातावरण अस्थिरच राहिले. रशियात राज्यक्रांती होऊन कम्युनिस्टांनी सत्ता हातात घेतली. रशिया या मूळच्या देशासह त्याच्या झार सम्राटांनी वेळोवेळी जिंकून घेतलेला मध्य आणि उत्तर आशिया व पूर्व युरोप खंडामधला अतीविस्तृत भूभाग सोव्हिएट युनियन या नांवाने ओळखला जाऊ लागला. जगातील सर्व कामगारांना एकत्र आणण्याची घोषणा देऊन कम्युनिस्टांनी पश्चिमेकडे विस्तार करायला सुरुवात केली. पहिल्या महायुध्दातल्या पराभवाने आणि त्यानंतर झालेल्या तहामधल्या जाचक अटींनी दुखावलेला जर्मनी हिटलरच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभा राहिला आणि सैनिक सामर्थ्य वाढवून शेजारच्या लहान सहान राष्ट्रावर दमदाटी करू लागला. इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला आणि तो देशही दंड थोपटू लागला. घरात चाललेला समाजवादाचा लढा आणि जगभर पसरलेल्या साम्राज्यातल्या देशांचे स्वातंत्र्यलढे या दोन आघाड्या सांभाळतांना इंग्लंड, फ्रान्स आदि परंपरागत मुख्य राष्ट्रांमधली लोकशाही सरकारे मेटाकुटीला आली. यापासून दूर असलेल्या अमेरिकेने (य़ू.एस.ए.ने) औद्योगिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आर्थिक महासत्ता बनण्यात यश मिळवले. पूर्वेला जपाननेही औद्योगिक, आर्थिक व सैनिकी या सर्वच आघाड्यांवर अभूतपूर्व अशी प्रगती करून आपला जम चांगला बसवला.चीनमधली राजेशाही नष्ट झाली पण तिथे लोकशाही रुजली नाही यामुळे अस्थिरता होती. अशा प्रकारे जगभर अशांत आणि संशयाचे वातावरण होते.


तशाही परिस्थितीत क्रीडाप्रेमी लोक विश्वबंधुत्वाचा नारा देऊन ऑलिंपिक खेळांचे आयोजन करीत राहिले. तोपर्यंत या खेळांना जागतिक महत्व प्राप्त झाले असल्यामुळे हे खेळ आपल्या देशात भरवणे हादेखील एक राजकीय पटावरला पराक्रम समजला जाऊ लागला होता. त्यामुळे ते खेळ भरत राहिले, पण राजकीय परिस्थितीची सांवलीही त्याच्या आयोजनावर पडतच राहिली.


१९२०, १९२४, १९२८, १९३२ आणि १९३६ साली अनुक्रमे बेल्जियम, फ्रान्स, नेदर्लँड, युनायटेड स्टेट्स आणि जर्मनीमध्ये हे खेळ झाले. त्यात तीस चाळीस देशांमधल्या दोन तीन हजारांच्या संख्येने खेळाडूंनी भाग घेतला. ही संख्या कमी जास्त होत राहिली. सर्व जागी शंभरावर स्पर्धा झाल्या. युनायटेड स्टेट्स फार दूर असल्यामुळे यापूर्वी सेंट लुईला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांची पुनरावृत्ती होऊन फक्त तेराशेहे खेळाडूच येऊ शकले. यापूर्वीच्या तीन्ही जागी य़ू.एस.ए ने पदकांच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला होताच, स्वगृही झालेल्या स्पर्धातली बहुसंख्य बक्षिसे तिथल्या खेळाडूंनी मिळवली. त्यानंतर बर्लिन इथे झालेल्या स्पर्धात सर्वात जास्त खेळाडू आले तरी त्यांची संख्या चार हजारापर्यंत पोचली नाही. इथे मात्र जर्मनीच्या खेळाडूंनी य़ू.एस.ए वर मात करूत पहिला क्रमांक पटकावला. हिटलरच्या हडेलहप्पीचा परिणान खेळाडूंच्या आणि पंचांच्या कामगिरीवर पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यानंतर दुसरे महायुध्द सुरू झाले व त्यामुळे १९४० आणि १९४४ साली ऑलिंपिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण ऑलिंपिकचे असे वैशिष्ट्य आहे की या न होऊ शकलेल्या स्पर्धांचीसुध्दा क्रमांकानुसार नोंद ठेवली जाते. त्यामुळे १९१६ साली बर्लिन येथे न झालेली ६ वी तसेच १९४० व १९४४ साली न झालेल्या स्पर्धा १२ व १३ व्या धरल्या जातात. बर्लिन येथे झालेल्या ११ व्या ऑलिंपियाडनंतर १९४८ साली लंडन येथे एकदम १४ वे ऑलिंपियाड भरले.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - ३


कोबर्टीनच्या अथक प्रयत्नाने १८९६ साली आधुनिक ऑलिंपिक गेम्सची सुरुवात झाली. ग्रीसची राजधानी अथेन्स इथे घाईघाईने भरवलेल्या या क्रीडामहोत्सवात युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन खंडातील १४ देशातल्या २४१ खेळाडूंनी भाग घेतला. ९ प्रकारच्या खेळात एकंदर ४३ स्पर्धा ठेवल्या होत्या. एथलेटिक्स, सायकलिंग, फेन्सिंग (तलवारबाजी), जिम्नॅस्टिक्स, शूटिंग (नेमबाजी), स्विमिँग (जलतरण), टेनिस, वेटलिफ्टिंग आणि रेसलिंग (कुस्ती) एवढेच ते ९ क्रीडाप्रकार होते. य़ूएसए ने सर्वात जास्त म्हणजे ११ सुवर्णपचके पटकावली तर ग्रीक क्रीडापटूंनी एकंदरीत सर्वात जास्त, ४३ इतकी पदके मिळवली. हा उत्सव १० दिवस चालला होता.


त्यानंतर चार वर्षांनी झालेल्या पॅरिस येथील दुस-या ऑलिंपिकमध्ये सर्वच आंकड्यात चांगली घसघशीत वाढ झाली. २४ देशातील ९९७ म्हणजे जवळजवळ हजार स्पर्धकांनी या खेळात हजेरी लावून आपले कौशल्य दाखवले. त्यामुळे खेळाडूंची संख्या एकदम चौपट झाली. प्रथमच महिला खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच युनियन जॅकच्या झेंड्याखाली भारतीय पथकाचा समावेश करण्यात आला.क्रीडाप्रकार आणि स्पर्धा यांच्या संख्याही दुप्पट झाल्या. १९ क्रीडाप्रकारातल्या ९५ स्पर्धा पॅरिस येथील महोत्सवात घेतल्या गेल्या. २६ सुवर्णपदकासह १०१ पदके मिळवून फ्रान्सने यूएसएवर आघाडी मारली. हे खेळ तब्बल चार महिने चाललेले होते.


त्यानंतर १९०४ मध्ये अमेरिकेतील सेंट लुई इथे स्पर्धा झाल्या. त्यात १७ क्रीडाप्रकारातल्या ९१ स्पर्धा झाल्या. त्या काळात राईट बंधूंचे विमानउड्डाणाचे प्रयोग चालले होते. परदेशी जाण्यासाठी जहाज हेच वाहन होते. या कारणाने स्पर्धकांची संख्या रोडावली. १२ देशातून फक्त ६५१ खेळाडू आले. त्यातले बहुतेक करून (५७८) अमेरिकेतलेच होते. इतर खंडांतून हाताच्या बोटावर मोजण्याइतपत स्पर्धक आले. साहजीकच अमेरिकन लोकांनी ९० टक्क्याहून अधिक पारितोषिके मिळवली. ही स्पर्धा नुसती नांवालाच आंतरराष्ट्रीय झाली असे म्हणता येईल.


त्यानंतर दोनच वर्षानंतर ग्रीसमधील अथेन्स इथे पुन्हा हा मेळावा भरवला गेला होता, पण त्याला अधिकृत मान्यता मिळाली नाही. १९०८ साली लंडन इथे आणि १९१२ साली स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथे अनुक्रमे चौथी आणि पांचवी ऑलिंपिक स्पर्धा घेतली गेली. प्रत्येक वेळी वाढ होत होत गेली. १९०८ मध्ये लंडन इथे २२ देशातून २००८ तर १९१२ मध्ये स्टॉकहोम इथे २८ देशातून २४०७ स्पर्धक आले, त्यात ४८ मुली होत्या. लंडनला ब्रिडनने अर्धी पदके पटकावली तर स्टॉकहोम इथे यूएसए व स्वीडन यांनी मिळून तेवढी घेतली. दोन्ही स्पर्धात स्थानिक स्पर्धकांनी सर्वात जास्त पदके मिळवली. लंडनला २२ खेळांच्या ११० स्पर्धा झाल्या तर स्टॉकहोम इथे प्रकारांची संख्या १४ वर मर्यादित केली असली तरी त्यातल्या स्पर्धांची संख्या १०२ वर नेली गेली.


त्यानंतर १९१६ साली जर्मनीमधील बर्लिनमध्ये ऑलिंपिक खेळ ठेवण्याचे ठरले होते, पण त्यापूर्वी १९१४ मध्येच पहिले महायुध्द भडकले आणि जर्मनीकडे त्यातली मुख्य भूमिका होती. युध्दाच्या त्या धुमश्चक्रीच्या काळात इतर दुसरीकडे कोठेही या स्पर्धा घेणेसुध्दा अशक्यच होते. त्यामुळे त्या रद्दच कराव्या लागल्या. या दरम्यान सन १९१३ साली पांच खंडांचे प्रतिनिधित्व करणारी पांच रंगांतली एकमेकात गुंतलेली कडी हे ऑलसिंपिकचे बोधचिन्ह ठरवले गेले होते. ते १९१४ साली सर्वमते मान्य करण्यात आले होते पण मधल्या काळात या स्पर्धाच न झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी १९२० सालापर्यंत थांबावे लागले.


युध्दाची धामधूम संपून सगळे स्थिरस्थावर झाल्यानंतर सन १९२० मध्ये बेल्जियममधील अँटवर्प इथे सातवे ऑलिंपिक झाले. २९ देशांतील २६२६ स्पर्धकांनी त्यात भाग घेतला, त्यात ६५ महिला होत्या. २२ क्रीडाप्रकारातल्या १५४ निरनिराळ्या स्पर्धा त्यात ठेवल्या होत्या. म्हणजे युध्दापूर्वी होऊन गेलेल्या स्टॉकहोम येथील स्पर्धांच्या तुलनेत सर्वच आघाड्यांवर प्रगती झाली होती. इथे यूएसए ने सर्वाधिक पदके पटकावण्यात बाजी मारली, तर स्वीडन व ब्रिटन अनुक्रमे दुसरे आणि तिसरे आले. छोटासा बेल्जियम हा यजमान देश पांचव्या स्थानावर आला.
(क्रमशः)

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - २


वैश्विक शांती, समता, बंधुभाव वगैरे आदर्श उद्देश कोबर्टिनच्या मनात असले तरी सन १८९६ चे वातावरण त्याला मुळीसुध्दा पोषक नव्हते. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांना एटलांटिक महासागराचा किनारा लाभला होता आणि त्यांनी सामर्थ्यवान नौदलांची उभारणी केली होती. त्याच्या जोरावर त्यांनी आशिया व आफ्रिका खंडांचा बराचसा भाग जिंकून तिथे आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. अमेरिका व ऑस्ट्रेलिया ही नव्याने सापडलेली खंडे तर त्यांनी पूर्णपणे काबीज करून आपसात वाटून घेतली होती. त्यातल्या कांही वसाहती फुटून बाहेर निघाल्या होत्या तर कांहींनी अंतर्गत स्वराज्य मिळवले होते. इटली व फ्रान्सने भूमध्य समुद्रापलीकडचा आफ्रिका खंडातला भाग व्यापला होता तर रशियाने त्याला सलग असलेला पॅसिफिक महासागरापर्यंतचा आशिया खंड गिळंकृत केला होता. हॉलंड आणि बेल्जियम या छोट्या राष्ट्रांनी देखील इंग्लंड व फ्रान्सच्या अनुमतीने आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. जर्मनीसारखी बलाढ्य राष्ट्रे हे करू शकले नव्हते याचे शल्य बाळगून होती. थोडक्यात सगळे जगच युरोपियन देशांच्या आधिपत्याखाली होते आणि त्या देशांचे एकमेकात आपसात फारसे पटत नव्हते. बाकीची राष्ट्रे तर गुलामगिरीत होती. जेंव्हा एकमेकांचा विश्वाससुध्दा कोणाला वाटत नव्हता तर बंधुभाव कसा असणार? अशा परिस्थितीतदेखील नाउमेद न होता खेळांच्या निमित्याने सर्वांना एका छपराखाली आणण्याचे प्रयत्न कोबर्टिन करत राहिला आणि त्याला त्यात य़श मिळाले.


स्पर्धा म्हंटले की त्यात चुरस आली, जिंकण्याहरण्यातून रागलोभ आले. मग त्या खेळाडूंना एकमेकाबद्दल प्रेम कसे वाटणार? यासाठी सुरुवातीपासून खास प्रयत्न करण्यात आले. कोबर्टिनने असे प्रतिपादन केले की ऑलिंपिक खेळात जिंकण्याहरण्यापेक्षा त्यात भाग घेणे अधिक महत्वाचे आहे."The most important thing in the Olympic Games is not to win but to take part, just as the most important thing in life is not the triumph but the struggle. The essential thing is not to have conquered but to have fought well."

कोबर्टिनचा हा संदेश आजपर्यंत शिरोधार्य मानण्यात येतो. याच कारणासाठी ऑलिँपिकमध्ये जिंकणा-या वीराला आयोजकांतर्फे फार मोठे बक्षिस दिले जात नाही. प्राचीन काळात तर फक्त ऑलिव्ह वृक्षाची फांदी देत असत. आता सोन्याचांदीचे व काँस्याचे बिल्ले दिले जातात. हे बिल्ले विकून त्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता नसते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्यापुरतीच मर्यादित असते. परवा परवापर्यंत कोठल्याही व्यावसायिक खेळाडूला ऑलिंपिक खेळात भाग घेण्याची परवानगी नव्हती. एकाद्या खेळाडूने खेळण्यासाठी पैसे घेतले असे सिध्द झाल्यास त्याचे पदक काढून घेण्यात येत असे. हे खेळ निव्वळ हौशी क्रीडापटूंसाठी होत होते. टेलीव्हिजनच्या प्रसारानंतर ऑलिंपिकसकट सर्व क्रीडाक्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. त्यामुळे हे निर्बंध थोडे सैल करावे लागले.
(क्रमशः)

Sunday, September 21, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा १


ग्रीसमधील ऑलिंपिया इथे हजार बाराशेहे वर्षे नेमाने चाललेले खेळ इसवी सनाच्या चौथ्या शतकात बंद पडले. पण त्याच्या आठवणींचे संदर्भ जुन्या ग्रीक वाङ्मयातून येत राहिल्याने शिल्लक राहिले. एकोणीसाव्या शतकात थोडे स्थैर्य आल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या क्रीडामहोत्सवाचे आयोजन करावे असे विचार सुजाण लोकांच्या मनात येऊ लागले. अर्थातच ग्रीकमध्ये हा विचार पुढे आलाच, तसा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी इतर अनेक युरोपियन राष्ट्रात तसा विचार होऊ लागला. यातल्या कांही देशात स्थानिक पातळीवर खेळांच्या स्पर्धा सुरूदेखील झाल्या.


फ्रान्समधील पीय़रे ला कोबर्टिन या गृहस्थाने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांचे आयोजन केले पाहिजे असा नवा विचार मांडला. प्राचीन ग्रीसमध्येसुध्दा नगरांनगरांमध्ये लढाया चाललेल्या असत पण ऑलिंपिकचे खेळ करण्यासाठी युध्दविराम करून सर्वत्र शांतता होत असे असा इतिहास आहे. त्यावरून बोध घेऊन सर्व जगात बंधुभाव व शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेऊन हे खेळ खेळले जावेत असे प्रतिपादन केले. त्याला त्याच्या देशात म्हणजे फ्रान्समध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण त्याने धीर न सोडता इंग्लंड, अमेरिका वगैरे देशातील जनतेला आवाहन करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याला फळ आले आणि सन १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नांवाची संस्था स्थापन झाली.


पॅरिसमध्ये सन १९०० मध्ये पहिली स्पर्धा सुरू करावी असा विचार आधी होता. पण उत्साही कार्यकर्त्यांनी विशेषतः कोबर्टिन याने सन १८९६ मध्येच सुरुवात करावी आणि या खेळांची जननी असलेल्या ग्रीसमध्येच ती करावी असा आग्रह धरला. त्या वेळेस ही जबाबदारी घेण्यास ग्रीसचा राजाच तयार नव्हता. कोणाही यजमानाला पाहुण्यांचा सोय करावी लागणारच. यावर होणारा अवाढव्य खर्च कसा परवडणार याची त्याला चिंता होती. एका धनाढ्याने यासाठी स्वखर्चाने अथेन्स इथे भव्य स्टेडियम बांधून देण्याची घोषणा केली, इतर उदार हात पुढे आले आणि ठरल्याप्रमाणे १९९६ साली आधुनिक ऑलिंपिक क्रीडामहोत्सवाचा शुभारंभ झाला. खुद्द ग्रीसच्या सम्राटाच्या हस्तेच दि.५ एप्रिल १८९६ रोजी पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाले.


प्राचीन काळातील ग्रीक ऑलिंपिक खेळात धांवणे, भालाफेक यासारख्या मैदानी क्रीडांचा समावेश होता तसेच मुष्टीयुध्द, कुस्ती वगैरे मर्दानी वैयक्तिक खेळ खेळले जात. नव्या ऑलिंपिकची सुरुवातही तिथूनच झाली आणि तीही फक्त पुरुषांपासून. पण वीसाव्या शतकातल्या महिला मागे कशा राहतील? सन १०१२ ला स्वीडन देशात झालेल्या स्पर्धात महिलांच्या स्पर्धांना समाविष्ट करण्यात आले. टेबल टेनिस, बॅडमिंटन यासारखे नव्या युगातले खेळ आले, फुटबॉल, हॉकीसारखे सांघिक खेळ सुरू झाले, पोहणे आणि सूर मारणे यांमधील कौशल्याला सामील करून घेतले गेले. अशा प्रकारे ऑलिंपिक खेळांचा पसारा वाढतच गेला.
दुस-या महायुध्दापूर्वी ऑलिंपिक खेळ फक्त युरोप किंवा अमेरिकेत होत असत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात झाले तसेच जपान, कोरिया आणि आता चीन या अतिपूर्व आशियाई देशांनीसुध्दा या स्पर्धा भरवल्या आहेत. चीनमध्ये यासाठी अतिभव्य असे पक्ष्याच्या घरट्याच्या आकाराचे अद्ययावत नवे स्टेडियम उभारले आहे. या वर्षीचे खेळ आतापर्यंत झालेल्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांपेक्षा अधिक सुव्यवस्थितपणे झाले अशी प्रशंसा सर्वांकडून चीनने मिळवली आहे.

Saturday, September 20, 2008

ऑलिँपिकराजाची कहाणी


आटपाट नगर होतं, ते ग्रीस या देशात होतं, त्याचं नांव एलिस असं होतं. एलिस नगराजवळ ऑलिंपोस पर्वत होता. त्याच्या पायथ्याला मोकळी जागा होती. तिथे अनेक खांब असलेला एक आखाडा बांधला होता. त्या जागेला ऑलिंपिया म्हणत. एलिस या गांवाला राजा नव्हता. तिथले सुजाण नागरिक शहाण्यासारखे वागत. भांडण तंटा झालाच तर पंचांकडे जात. अनुभवी पंच त्याचा निवाडा करीत. ग्रीस या देशात तेंव्हा अशीच बरीच नगरे होती. कधी कधी ती एकमेकांशी भांडत. त्यांच्यात लढाया होत. पण लढाई संपली की पुन्हा गुण्यागोविंदाने नांदत.

ग्राक लोकांचे अनेक देव होते. झीयस हा त्यातलाच एक. या देवाला सारे लोक भजत. त्याची पूजाअर्चा करीत. दर चार वर्षातून एकदा त्याचा उत्सव साजरा करीत. त्या दिवशी ते काय करीत? सारे पुरुष ऑलिंपियामध्ये जमत. स्त्रियांना तिथे यायची बंदी होती. लहान मुलींना आणणे धोक्याचे होते. त्यामुळे फक्त पुरुष तेवढे जमत. सारे झियस देवाची पूजा करीत. सर्वांच्या भल्यासाठी त्याची प्रार्थना करीत. त्याचे भजन सामूहिकपणे गात. त्याला बकरे आणि डुकरे या जनावरांचे बळी देत. प्रसाद म्हणून त्यावर तांव मारीत. प्रसादाबरोबर तीर्थ आलेच. खाऊन पिऊन आणि गाणी गात सारे धमाल करीत.

त्या समारंभातच एक धांवण्याची शर्यत लागे. एलिसमधले तसेच बाहेरून आलेले धांवक त्यात भाग घेत. कांही खेळाडू दूरदेशातून सुध्दा तिथे येत. शर्यत जिंकणा-याला बक्षिस देत. पूर्वी कांशाची तिवई मिळत असे. कालांतराने ऑलिव्ह वृक्षाची फांदी देऊ लागले. या मानाच्या पानांना खराच मोठा मन असे. विजेते लोक त्याला शिरोधार्य मानून डोक्याला बांधीत. त्यांची मिरवणूक निघे. गाजत वाजत ते आपल्या घांवी परतत. तिथे त्यांचा सत्कार होई. ऑलिव्हच्या फांद्याचे रोपटे लावून त्याचा वृक्ष बने. त्याचा खूप आदर होई. त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळे.

तरुण मुले त्या विजयी वीराकडे जात. त्याला ऑलिंपिकचा वसा विचारीत. तो म्हणे, "पहा हं, चुकाल माताल, घेतला वसा टाकून द्याल."मुले सांगत, "आम्ही चुकणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. मनापासून हे व्रत करू."मग तो व्रत सांगे, "या व्रताला काय करावं? रोज नियमितपणे व्यायाम करावा, भरपूर पौष्टिक अन्न खावं, कसरतीमध्ये घाम गाळून ते अंगात जिरवावं. एकमेकांच्याबरोबर शर्यती लावाव्यात. त्यात जिद्दीने धांवावं. पायातली शक्ती आणि छातीतला दम वाढवत न्यावा. कसलेही व्यसन बाळगू नये. असे दोन तीन वर्षे करावे. चौथ्या वर्षी ऑलिंपिकला जावे. महिनाभर तिथल्या मैदानात सराव करावा. त्या दिवसात रोज चीजचा फराळ करावा, महिनाभर व्रतस्थ रहावे, गुरुजन सांगतील त्या सूचनांचे पालन करावे. उत्सवाच्या दिवशी झीयसचे नांव घेऊन बेभान होऊन धांवावे. ज्याच्यावर झीयसदेव प्रसन्न होईल तो विजय़ी वीर बनेल. सगळे त्याचे कौतुक करतील. कवी त्याच्यावर कविता लिहितील, चित्रकार त्याची चित्रे काढतील, मूर्तीकार त्याचे पुतळे बनवतील. अशा प्रकारे तो प्रसिध्दी पावेल. ज्यांचा पहिला क्रमांक येणार नाहीत्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत रहावे."

या व्रताची सुरुवात कधी झाली? असे म्हणतात की झीयसदेवाचा पुत्र हेराक्लेस याने ऑलिंपियाचे क्रीडांगण आणि झीयसचे मंदिर बांधून याची सुरुवात केली. त्यानंतर शतकानुशतके हजारो माणसे हे व्रत घेत असत. या आख्यायिकेची कोठे नोंद नाही. पण सत्तावीसशे वर्षापूर्वी होमर नांवाचा कवी होऊन गेला. त्याने महाकाव्ये लिहिली. त्यात एका उत्सवाचा उल्लेख आहे. ही स्पर्धा इसवी सनापूर्वी ७७६ वर्षापूर्वी झाली. त्यात १७० मीटर धांवण्याची शर्यत झाली. त्यात कोरोइबोस नांवाच्या एका आचा-याने पहिला नंबर पटकावला. कांही वर्षांनी वेगवेगळी अंतरे धांवण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा होऊ लागल्या. धांवण्याबरोबरच घोडदौडीच्या, रथांच्या शर्यती सुरू झाल्या. कुस्ती, भालाफेक, थाळीफेक वगैरे अनेक खेळांना त्यात सामील करून या स्पर्धांची कक्षा वाढत गेली. हे खेळ खूप लोकप्रिय होत गेले. दूरवर असलेल्या बाहेरच्या देशातून खेळाडू या क्रीडांसाठी ग्रीसमध्ये येऊ लागले.

पुढे रोमन साम्राज्य उदयाला आले. रोमन राजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे झीयससारख्या जुन्या दैवतांची पूजा करण्याला बंदी आली आणि हे खेळ हजार वर्षे चालल्यानंतर बंद पडले. अशी ही ऑलिंपिक या खेळांच्या राजाची साठा उत्तरांची सुरस कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

Friday, September 19, 2008

चीन, चिनी आणि चायनीज - ४


चिनी लोक पूर्वीपासूनच कष्टाळू आणि उद्योगी समजले जात आहेत. चित्रविचित्र आकृत्यांनी सजवलेले चिनी मातीचे मोठाले रांजण आणि तबकड्या जगातल्या बहुतेक पुराणवस्तूसंग्रहालयात आढळतात. रेशीम हा तर तेथला प्रसिध्द उद्योग होता. रेशमाची निर्यात ज्या मार्गाने चीनबाहेर होत असे ते रस्ते 'सिल्क रूट' याच नांवाने ओळखले जात. कागद तयार करण्याची प्रक्रिया प्रथम चीनमध्ये विकसित झाली आणि नंतर जगभर पसरली. व्यास, वाल्मिकी किंवा सॉक्रेटिस, प्लूटो यांच्या बरोबरीने कॉन्फ्यूशिअस या चिनी तत्ववेत्त्याचे नांव आदराने घेतले जाते. ह्यूएनत्संग या इतिहासकालीन चिनी पर्यटकाने केलेल्या नोंदी प्रसिध्द आहेत. प्राचीन काळात चीन हा देश समृध्द मानला जात होता. मध्ययुगात तो थोडा वेगळा पडला होता आणि कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्याने सोव्हिएट युनियन सोडून अन्य जगाशी फारसे संबंधच ठेवले नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःभोवती घातलेल्या बांबूच्या पडद्याआड काय चालले आहे ते गुलदस्त्यात राहिले होते.
चिनी वंशाचे लोक पूर्वीपासूनच इतरत्र पसरले आहेत. पूर्व आशिया खंडातल्या सगळ्याच देशात ते मोठ्या संख्येने राहतात. सिंगापूरमध्ये ते बहुसंख्येने आहेत. चिनी वंशाच्या लोकांनी आपल्या पाककौशल्याचा जगभर प्रसार केला आणि सर्व प्रमुख शहरात चिनी जेवण मिळते हे मागील भागात पाहिलेच. त्यामुळे चिनी माणूस म्हंटला की तो खानसामा किंवा बावर्ची असेल असे कांही लोकांना वाटणे शक्य आहे. इतर कांही उद्योगातसुध्दा त्यांनी आपला जम बसवलेला आहे. कोलकात्याच्या बाजारात मिळणा-या वेताच्या आणि चामड्याच्या वस्तू बहुधा चायनाटाउनमधल्या असतात. कां ते कोणास ठाऊक, पण अनेक जागी चिनी दंतवैद्य असतात. इतर कांही दुखण्यांवरसुध्दा एकादे खास चिनी औषध अकशीर इलाज समजले जाते. त्यात वाघ, सिंह, गेंडा, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांचे रक्त, मांस, हाडे, चामडी वगैरेचा अंश असल्यामुळे ती प्रभावी ठरतात असा समज पसरवला गेला आहे. आजकाल कोणीही हौस म्हणून यातल्या कोणत्याही प्राण्याचे मुंडके आपल्या दिवाणखान्यात लावून ठेऊ शकत नाही तरीही या वन्य पशूंच्या देहाला चिनी औषधी बनवण्यासाठी मोठी किंमत मिळते या कारणामुळे जगभरातल्या अरण्यांत या बिचा-या वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी चिनी लोकांच्या मार्शल आर्ट्समधील मारामारीतल्या चमत्कारावर आधारलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाट आली होती. त्यानंतर जुडो, कराटे, कुंगफू, ताकिआंदो वगैरे चिनी, जपानी व कोरियन प्रकार बरेच प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले होते.
आजच्या चीनमधल्या लोकांनी मात्र असल्या परंपरागत क्षेत्रावर विसंबून न राहता आधुनिक यंत्रयुगातली नवनवीव क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास भारतातही फारशी यंत्रसामुग्री तयार होत नव्हती आणि चीनमध्येही होत नव्हती. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्विट्झरलंड यासारख्या प्रगत देशांतून आयात केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या यंत्रसामुग्रीवर भारताचे औद्योगीकरण सुरू झाले. चीनला सर्व यंत्रे कम्युनिस्ट देशांकडून जशी मिळतील तशी घ्यावी लागली. पुढे कांही भारतीय उद्योगसमूबांनी कांही यंत्रे परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने इथेच बनवायला सुरुवात केली तर चीनने स्वतः त्यातले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आणि त्यात ते अधिकाधिक प्राविण्य संपादित करत गेले. लघुउद्योगाला प्रोत्साहन आणि मोठ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्याच्या आपल्या धोरणामुळे या क्षेत्रात होणा-या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. कालांतराने लुधियाना, बटाला, राजकोट यासारख्या गांवातल्या लहान कारखान्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची साधीसुधी यंत्रे मोठ्या प्रमाणावर बनून भारतात आणि मागासलेल्या देशात ती खपू लागली. मात्र मोठ्या कारखान्यांची व्हावी तेवढी वाढ झाली नाही. आता युरोप अमेरिकेत कष्ट करू इच्छिणारा मजूरवर्ग जवळजवळ नाहीसा झाल्यामुळे तिकडचा यंत्रोद्योग उतरंडीला लागला आहे. पण भारतीय उद्योग त्याची जागा घेऊ शकला नाही. ते काम चीनने यशस्वी रीत्या केले आहे. त्यामुळे पहिल्या पिढीतली जी परदेशी यंत्रे जुनी झाली त्यांच्या जागी कांही काळ भारतीय बनावटीची यंत्रे येत होती, पण आता अधिकाधिक जागी चिनी बनावटीची नवी यंत्रे दिसू लागली आहेत. अशा प्रकारची यंत्रे इथेसुध्दा तयार होऊ शकतात, पण चिनी यंत्रे जास्त आधुनिक असूनही स्वस्तात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.
मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरणाचा जास्तीत जास्त लाभ पूर्व आशियातील देशांनी करून घेतला आहे. या नव्या धोरणाचे वारे वहायला लागताच सोनी, नॅशनल पॅनासॉनिक, होंडा, सुझुकी आदि जपानी कंपन्या आणि एलजी, सॅमसुंग, ह्युएंदाई सारख्या कोरियन कंपन्यांनी मोटारी, टीव्ही, रेफ्रिजरेटर वगैरेचे वाढते मार्केट काबीज केले. यासारखी कोणतीही मोठी चिनी कंपनी दिसत नाही पण या जपानी व कोरियन यंत्रांचे अनेक भाग चीनमध्ये बनतात असे समजते. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात लागणा-या अगणित वस्तू तर अमाप संख्येने चीनमध्ये तयार होतात आणि भारतातल्या शहरातल्याच नव्हे तर खेड्यापाड्यातल्या बाजारातसुध्दा त्यांचा महापूर येऊ लागला आहे. दिवे मिचकावणारी आणि वेगवेगळे आवाज काढणारी अतिशय आकर्षक अशी स्वयंचलित चिनी खेळणी अगदी स्वस्तात मिळतात. डासांना मारण्याची चिनी रॅकेट घराघरात पोचली आहे. महागातले टॉर्च आणि बॅटरी सेल्स यासारख्या वस्तूंच्या चिनी डुप्लिकेट अर्ध्यापेक्षा कसी भावात मिळतात. कुठलेच ब्रँडनेम नसलेल्या या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कशा इकडे येतात, खेड्यात भरणा-या आठवड्याच्या बाजारापर्यंत त्यांचे वितरण कोण करतो आणि या साखळीतल्या सर्वांचे कमिशन कापल्यावर मूळ चिनी उत्पादकाला त्यातून किती किंमत मिळते आणि ती त्याला कशी परवडते या सगळ्याच गोष्टींचे मला गूढ वाटते. एका बाजूने ग्राहकाला त्याचा फायदा होत असला तरी त्या वस्तूंचे उत्पादन करणारा भारतीय उद्योग संकटात सापडला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञांनी बरीच आघाडी मारल्याचे आज दिसत असले तरी चीन हा या क्षेत्रातला जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊ पहात आहे. लार्सन अँड टूब्रो, विप्रो, इन्फोसिस यासारख्या भारतीय कंपन्यांनी आता चीनमध्ये शाखा उघडल्या आहेत आणि आपले कांही काम ते आता तिकडे वळवीत आहेत.
उद्योगाच्या क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुध्दा चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातल्या मेडिकल कॉलेजमधल्या अव्वाच्या सव्वा झालेल्या कॅपिटेशन फी पेक्षा चीनमध्ये कमी खर्च येतो या कारणाने कांही भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत असे ऐकले. भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असूनसुध्दा चीनमध्ये शिक्षण घेणे ते पसंत करतात. व्यापारी वर्गाला अजून चीनबद्दल पूर्ण विश्वास वाटत नाही, पण तरीही जगभरातील मोठ्या कंपन्यांनी आपली जाळी चीनमध्ये पसरवायला सुरुवात तर केली आहे. रस्तेबांधणी, नगररचना आदि बाबतीत चीनने आश्चर्यजनक प्रगती केली आहे. आता तिथली प्रमुख शहरे युरोपमधील शहरासारखी दिसू लागली आहेत. त्यामुळेच आता मुंबईचे शांघाय करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.
क्रीडाक्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीने सर्व जग अचंभित झाले आहे. अगदी शून्यापासून सुरुवात करून आज चीन हा देश पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचला आहे. बीजिंग येथे सध्या चाललेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत एकाग्रता, चापल्य किंवा शरीरसौष्ठव लागणा-या एकूण एक क्रीडाप्रकारात स्त्रिया किंवा पुरुष, वैयक्तिक किंवा सांघिक अशा सर्व गटात चीनचे स्पर्धक एकामागोमाग एक विजय मिळवत आहेत असे रोजच्या रोज पहायला मिळते. हे यश खेळाडूंवर जोर जबरदस्ती करून किंवा बंदुकीच्या धांकाने मिळत नसते. त्यासाठी काय करायला हवे त्याचा सखोल विचार करून त्याला पोषक असे वातावरण तयार करावे लागते, खेळाडूंना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, तसेच त्यासाठी लागणारी उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्री द्यावी लागते. आजच्या युगात खेळातील कौशल्यातदेखील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. चीनने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे वापरून खेळाचा दर्जा वाढवण्यात चीनने एवढे यश मिळवले आहे.
ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ टीव्हीवर पाहतांनाच डोळ्याचे पारणे फेडणारा वाटत होता, प्रत्यक्षात तो केवढा भव्य वाटला असेल याची कल्पना करवत नाही. हजारोंच्या संख्येने त्यात भाग घेणारी लहान मुले आणि नवयुवक यांनी सादर केलेले कार्यक्रम फारच सुनियोजित होते. त्यातली कल्पकता, कौशल्य तसेच शिस्तबध्दता वाखाणण्याजोगी होती. दिव्यांची रोषणाई आणि आतिशबाजी अप्रतिम अशी होती. अवाढव्य आकाराचे कागद जमीनीवर अंथरून सर्व खेळाडूंच्या पायाचे ठसे त्यावर घेण्याची कल्पना अफलातून होती. हा एवढा मोठा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे बसवून कुठेही कसलेही गालबोट न लागता सादर करण्यामागे प्रचंड नियोजन केले गेले असेल आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस त्यात लागला असेल यात शंका नाही. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा भव्य सोहळा घडवून आणून चीनच्या लोकांनी "हम भी किसीसे कम नही" असेच जगाला दाखवून दिले आहे.
. . . . .. .. . . . . . . . (समाप्त)

चीन, चिनी आणि चायनीज - ३


चीनने केलेल्या आक्रमणानंतर दहा वर्षात पाकिस्तानबरोबर दोन मोठ्या लढाया झाल्या आणि १९७१ साली झालेले युध्द भारतीय सेनेने निर्विवादपणे जिंकले. विजयाच्या या उन्मादात १९६२ सालची कटु 'हकीकत' मागे पडली आणि 'चिनी' या शब्दाबद्दल वाटणारी घृणा कमी झाली. 'चायनीज' या शब्दाला मात्र या भावनेचा स्पर्श बहुधा कधी झालाच नाही. चायनीज म्हणताच माओचा कम्युनिस्ट देश डोळ्यापुढे न येता जगभर पसरलेल्या चिनी वंशाच्या माणसांनी लोकप्रिय केलेली खाद्यसंस्कृती हीच पटकन आठवते. 'चायनीज' शब्दाच्या जोडीला 'फूड' हा शब्द कायमचा जोडलेला असावा.

मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर 'मँडारिन' की 'नानकिंग' अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत. पण लहानपणापासून चिनी लोकांच्या खाण्याबद्दल जे कांही ऐकले होते त्यावरून इथे कदाचित विंचवाच्या नांगीची चटणी, झुरळांची कोशिंबीर आणि सापाचे काप असले पदार्थ 'लिंगचांगफू' किंवा 'हानछाऊशुई' असल्या अजब नांवाने मिळत असतील असे वाटे. त्यामुळे हॉटेलच्या समोरून जातांना ते कितीही खुणावत असले तरी आंत पाय ठेवण्याची इच्छा होत नसे. ताज आणि ओबेरॉयसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंच्या निमित्याने कधी तरी जाणे होत असे. एकदा चंव तरी घेऊन पहावी म्हणून तिथल्या खाद्यंतीतले चायनीज पदार्थ चाखून पाहिले आणि ते इतके आवडले की पोटभर खाऊन घेतले. त्यांची आवड दिवसेदिवस वाढतच गेली आणि अजून ती टिकून आहे.

धीर चेपल्यानंतर मित्रांच्यासोबत चायनीज हॉटेलांना भेट द्यायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणांचे मेनूकार्ड पूर्णपणे इंग्रजीतच असायचे आणि त्यात आक्षेपार्ह वाटणारा कोणताच जिन्नस दिसत नव्हता. ती हॉटेले जरी चिनी लोकांनी चालवली असली तरी तिथे येणारे सगळे ग्राहक हिंदुस्थानीच होते, त्यामुळे इथले लोक जे खाऊ शकतील असेच पदार्थ तिथे ठेवले जाणार हे उघड होते. यापूर्वी मी शेकडो मक्याची कणसे भाजून आणि तूपमीठ लावून खाल्ली होती, त्यांच्या किसाच्या गोळ्यांचे तळलेले वडे किंवा तो फोडणीला घालून तयार केलेले उपम्यासारखे पदार्थ खाल्ले होते, पण मक्याचे लुसलुशीत कोवळे दाणे वाफवून किती चविष्ट लागतात हे मला माहीत नव्हते. घरात टोमॅटोचे सार कधी केले गेले तर आम्ही जेवणाबरोबरच त्याचे भुरके मारीत असू, पुरणाच्या पोळीच्या सोबतीने कटाची आमटी व्हायचीच आणि आजारी पडल्यावर भाताची पेज प्यायला देत. या सगळ्या पेय पदार्थांना इंग्रजीत 'सूप' म्हणतात आणि पाश्चात्य लोक ते जेवणापूर्वी पितात हे मात्र तेंव्हा माहीत नव्हते. मुंबईला आल्यावर एक दोन वेळा उडप्याकडचे सूप पिऊन पाहिले, पण ते एकादी चटणी किंवा सॉस गरम पाण्यात मिसळून ढवळून दिल्यासारखे लागले, त्यामुळे फारसे पसंत पडले नाही. पण चायनीज पध्दतीचे स्वीट कॉर्न सूप पिऊन मात्र तिथल्या तिथे 'कलिजा खलास झाला'. पुढे मी अनंत प्रकारची 'क्लीअर' आणि 'थिक' सूप्स चाखून पाहिली, त्यात 'लेंटिल', ' तिरंगा', 'लंगफंग', 'क्रॅब' वगैरे प्रकारही आले. पण माझ्या मते तरी 'स्वीट चिकन कॉर्न सूप' हाच सर्व 'सूप' प्रजातींचा निर्विवाद बादशहा आहे.

मसालेभात, बिर्याणी, पुलाव, खिचडी आदि प्रकारात मोडणारा चायनीज फ्राईड राइस दिसायलाही वेगळा असतो आणि चवीलाही. आपला मसालेभात साहजीकच मसालेदार असणार, हैदराबादी बिर्याणीही चांगली झणझणीत असते, पुलाव थोडा सौम्य असतो आणि मुगाची खिचडी तर 'आजारी स्पेशल' समजली जाते. चांगली शिजलेली पण सुटी सुटी शिते असलेला चायनीज फ्राईड राईस मुळातच चविष्ट पण बेताचा तिखट असतो आणि त्यात आपल्याला हव्या त्या चटण्या व सॉस मिसळून त्याचे पाहिजे तसे संस्करण करता येते. शिवाय त्यासोबत मांचूरियाची ग्रेव्ही असली म्हणजे आहाहा ! ! ! क्या बात है? नूडल्सची गुंतागुंतीची भेंडोळी सोडवावीत का कापावीत या संभ्रमात पडून ती खातांना आधी आधी थोडी पंचाईत होत असे. त्याचे तंत्र जमायला लागल्यानंतर ती आवडायला लागली.

या सगळ्या चायनीज पदार्थात भोपळा मिरची, पातीचे कांदे, फरसबी, गाजर वगैरे एरवी वेगवेगळे खाण्यात येणारे पदार्थ एकत्र असतात आणि त्यातून निराळीच चंव निर्माण होते. कांही पदार्थात बांबूचे कोंब, बेबी कॉर्न, लसणीची हिरवी पाती यासारखे नवखे पदार्थही असतात. मुख्य म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर "सर्वात मका" असतो. तो कधी दाण्यांच्या रूपात असेल तर कधी त्याचे मैद्यासारखे गुळगुळीत पीठ ग्रेव्हीला लावलेले असेल किंवा त्या पिठात बुडवून तळलेले गोळे असतील. जोडीला सोया सॉससारख्या वेगळ्या चवी असतात. तेलाचा वापर माफक प्रमाणात केलेला असतो. कदाचित आले आणि लसूण या पाचक गोष्टी त्यात सढळ हाताने मिसळलेल्या असल्यामुळे ते पदार्थ पचायला हलके पडत असतीलही. निदान अशी समजूत तरी असते. या सगळ्या गुणांमुळे चायनीज खाणे जगभर सगळीकडे दिवसेदिवस लोकप्रिय होत गेले. मुंबईतल्या फोर्टमधल्या खास हॉटेलांतून लवकरच ते उपनगरांमधल्या सर्वसामान्य उपाहारगृहांमध्ये आले आणि आता तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वडापावाच्या स्टॉल्समध्ये व हांतगाड्यांवर चायनीज खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. अगदी लहान गांवातल्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉटेलातल्या मेनूकार्डावर चायनीज विभाग असलेले मी पाहिले आहे. 'मॅगी टू मिनिट नूडल्सने' त्यांना घराघरात पोचवले आणि आता जागोजागी चायनीज पदार्थ करायला शिकवणारे क्लासेसही दिसतात. सगळेच खाद्यजग असे 'चायनीजमय' झाले असल्यामुळे निष्णात किंवा शिष्ट खवय्ये लोक आता 'थाई' आणि 'मेक्सिकन' 'क्युझिन'चे कौतुक करू लागले आहेत.

पण आपल्या भारतीय हॉटेलात मिळणा-या चायनीज पदार्थांचे बरेचसे भारतीयीकरण झालेले असते. त्यातल्या जिरे, मिरे, लवंग, वेलदोडे, कोथिंबीर, पुदिना वगैरे मसाल्यांचा चंवी ओळखून येतात आणि लोकांना त्या आवडतात. चीनला जाण्याची संधी कांही मला मिळाली नाही, पण पश्चिमेकडे मात्र बहुतेक ठिकाणच्या चायनीज हॉटेलांत चिनी वंशाचे वाटणारे नकटे चपटे लोकच काम करतांना दिसतात. आता सगळीकडे 'इंडियन फूड' सुध्दा मिळते, पण त्याच्या खानावळी एकाद्या गल्लीबोळात आडबाजूला असतात. चायनीज रेस्तराँ मात्र शहरांच्या मध्यवर्ती भागांत मोक्याच्या नाक्यांवर झोकाने विराजमान दिसतात. तिथे मिळणा-या अन्नाची चंव वेगळीच असते. आपण जन्मात कधी न पाहिलेली पाने, फुले आणि बिया व त्यांचे अर्क त्यात घातलेले असतात. त्यातल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे व्हिनेगारसारख्या द्रवात भिजवून ठेवत असतील. एकादा पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की त्यात काय होते ते ओळखण्याएवढा मी त्यातला तज्ञ नाही, पण पूर्वी खाल्लेल्या पदार्थापेक्षा त्यात कांही तरी वेगळे असे आहे इतपत समजून येते. या आगळ्या चंवी कधी खूप आवडतात तर कधी नाही. पण मिळमिळीत कॉंटिनेंटल पदार्थांपेक्षा त्या नक्कीच उजव्या असतात.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, September 17, 2008

चीन, चिनी आणि चायनीज - २



भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. आजवरच्या इतिहासात कोठलाही शत्रू तिला पार करून भारतापर्यंत येऊन पोचू शकला नव्हता. जी कांही आक्रमणे झाली ती वायव्येकडच्या ज्या खैबरखिंडीतूनच झाली होती, ती तर आता पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानशी सख्य नसल्यामुळे पाकिस्तानच्या सरहदीकडेच लक्ष ठेवावे लागले होते आणि आपला बहुतेक सारा फौजफाटा त्या सीमेवरच तैनात होता. चीनच्या सीमेवर हिमालय पर्वताच्या रांगा आणि निबिड जंगल यामुळे अत्यंत प्रतिकूल अशी भौगोलिक परिस्थिती होती. ब्रिटीशांना कधी तिथे सैन्य पाठवण्याची गरज पडली नसावी, त्यामुळे त्यांच्या काळात तिकडे दुर्लक्षच झालेले होते. सीमेपर्यंत पोचायला धड रस्तेसुध्दा बांधले गेले नव्हते. पं.नेहरूंच्या काळात राजकीय मंचावर "हिंदीचीनी भाईभाई" चा घोष चालला होता. साम्यवादी क्रांतीनंतर चिनी समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात तिथले राज्यकर्ते गुंतलेले होते. या खंडप्राय देशाच्या कान्याकोप-यापर्यंत क्रांतीचे लोण पोचवणे कर्मकठिण होते. या सर्व त-हेने विचार करता चीनच्या बाजूने भारतावर अकस्मात आक्रमण होऊ शकेल असे कुणालाही स्वप्नातदेखील वाटत नव्हते. या गाफीलपणाचाच फायदा घेऊन चीनने सन १९६२ मध्ये अचानकपणे हल्ला चढवला.
भारतीय जनतेच्या मनाला पहिल्या क्षणाला बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरताच त्याची जागा संतापाने घेतली. भाईभाई करत गळ्यात गळा घालताघालताच पाठीत खंजीर खुपसण्याच्या या विश्वासघातकी कृत्यामुळे चीन हा क्षणार्धात देशाचा शत्रू बनला. ज्या चिनी लोकांबद्दल कालपर्यंत कुतूहलमिश्रित कौतुक वाटत होते त्यांना दुष्ट, क्रूर, पाताळयंत्री, माणुसकीला काळिमा वगैरे विशेषणांची लाखोली वाहिली जाऊ लागली. ब्रिटीशांच्या जमान्यातच कोलकात्याला येऊन स्थाइक झालेल्या चिनी लोकांनी तिथे एक चायना टाउन बनवले होते. पण तेवढा अपवाद सोडला तर भारतातल्या इतर शहरातल्या लोकांनी चिनी माणूस कधी पाहिला देखील नसावा. मित्र म्हणूनही त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे तो एक अमूर्त असा शत्रू बनला. त्याचा निषेध तरी कसा करायचा? त्या काळात चीनबरोबर फारसा व्यापार होत नव्हता. त्यामुळे त्यावर बहिष्कार तरी कसा घालणार आणि चिनी वस्तूंची होळी पेटवण्यासाठी काय जाळणार? कागदावर माओ आणि चौ यांची चित्रे काढून आणि कापडांच्या बुजगावण्यावर त्यांची नांवे लिहून त्यांचे जागोजागी दहन करण्यात आले.
चिनी लोकांवर राग काढणे कठीण असल्याची कसर सरकारवर चिडून व्यक्त करण्यात आली. नेभळट, बावळट, पुळचट, अदूरदर्शी, मूर्ख वगैरे शेलक्या विशेषणांनी सरकारची संभावना करण्यात आली. त्या काळात देशापुढे कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसपुढे पं.नेहरूजींना पर्यायच नव्हता. त्यांची जागा घेऊ शकणारे दुसरे कोणी नजरेसमोर नसल्यामुळे ते वाचले पण संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना जावे लागले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जागी केंद्र सरकारमध्ये बोलावून घेतले गेले. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धांवून गेला अशा शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले गेले. चीनने केलेल्या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी तांतडीने उपाययोजना करण्यात आल्या. सैन्याची कुमक आणि त्याला लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य, कपडेलत्ते, औषधपाणी वगैरेंची रसद सरहदीकडे रवाना करण्यात आली. पण सीमाभागातली दळणवळणाची साधने अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे ती तिथपर्यंत पोचण्यात अनंत अडचणी होत्या. त्यामुळे जेथपर्यंत रस्ते होते तेथपर्यंत जाऊन त्या ठिकाणची ठाणी मजबूत करणे एवढेच ताबडतोब करण्यासारखे होते.
दुर्गम भागातल्या या दळणवळणाच्या अडचणी चिनी सैन्यापुढेही होत्याच. पण त्यांनी कित्येक महिने आधीपासून गुपचुपपणे तयारी करून पुरेसा साठा त्यांच्या भागात करून ठेवला असणार. सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने सीमेवरील अनेक आघाड्यांवर एकदम हल्ला चढवला आणि मिळतील तेवढी छोटी छोटी भारतीय ठाणी उध्वस्त करीत ते धीमेधीमे पुढे चाल करीत राहिले. दोन्ही सैन्यांची अमोरसमोर येऊन हातघाईची लढाई अशी झालीच नाही. कांही दिवसांनी चिन्यांनी आपण होऊन युध्दविराम जाहीर केला. त्यांच्या सैन्यावर प्रतिहल्ला चढवून तिला सीमेपलीकडे हाकलून देण्याएवढी लष्करी शक्ती आपल्या सैन्याकडे त्या वेळेस नव्हती आणि भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्यामुळे असले धाडस करण्यात कांही अर्थ नव्हता. त्यामुळे झाली तेवढी मानहानी पत्करून ती लढाई तिथेच थांबवणे भाग पडले.
हळूहळू या युध्दाचे तपशील पुढे येत गेले. ज्या भागात चिनी सैन्याने चढाई केली होती तो सगळा अत्यंत विरळ लोकवस्ती असलेला जवळजवळ निर्जन असा प्रदेश होता. त्या दुर्गम भागाचा बाह्य जगाशी कसला संबंधच नव्हता. त्या भागात कशाचेच उत्पादन होत नव्हते, त्यामुळे तिथून कुठलाही माल बाहेर जात नव्हता की बाहेरचा माल विकत घेणारे कोणी ग्राहक तिथे रहात नव्हते. सीमेवरचा असा थोडासा ओसाड भाग जिंकून घेतल्याने चीनला त्याचा कांहीही आर्थिक फायदा झाला नाही की भारताच्या इतर भागांचे त्यामुळे कांही नुकसान झाले नाही. दोन्ही देशांतल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात कांहीच फरक पडत नव्हता. चीनने घुसवलेले सैनिकसुध्दा अशा बर्फाच्छादित प्रदेशात अन्नपाण्यावाचून किती दिवस आणि कसे राहतील आणि अशा बिकट जागी नुसते बसून राहण्यासाठी किती काळ रसद पुरवता येईल या गोष्टींना मर्यादा येतातच. त्यामुळे कालांतराने तेही मायदेशी माघारी गेले. या लढाईत दोन्ही बाजूचे कित्येक लढवय्ये मारले गेले. हे भरून न येण्याजोगे नुकसान करून चीनने काय मिळवले हे एक अगम्य कोडे आहे. कदाचित राजकारणाच्या पटावर त्याचा घसघशीत लाभ चीनला त्या काळात मिळाला असेल.
कागदावर काढलेल्या नकाशावर रेघा मारून सीमा दाखवणे सोपे असले तरी दुर्गम भागात प्रत्यक्षात त्या कोठे आहेत ते ठरवणेसुध्दा कठीण असते. ज्या ठिकाणी माणूस पोंचूच शकत नाही तिथला सर्व्हे करून, तिथे खुणा कशा करणार किंवा तिथे कुंपण कसे घालणार? "उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंचइंच लढवू" वगैरे गाण्यात छान वाटते. प्रत्यक्षात तो इंच कोठपासून मोजायचा तो बिंदूच सापडत नाही. खाजगी मालमत्तेमध्येसुध्दा जेवढ्या प्रदेशात माणसांचा वावर असतो तेथपर्यंतच तो आपला मालकी हक्क बजावू शकतो. त्यापलीकडे असलेल्या 'नो मॅन्स लँड' मध्ये जेंव्हा तो स्वतः जाऊन राहू शकत नाही, त्या वेळी दुसरा कोणी तेथे येणार नाही तेवढे त्याला काळजीपूर्वकरीत्या पहात रहावे लागते. चीन आणि भारत यांच्या सीमा हिंदुस्थानचे ब्रिटीश सरकार आणि तिबेट यांच्यात झालेल्या तहात ठरल्याप्रमाणे तयार केलेल्या नकाशाप्रमाणे ठरतात. आजचा चीन ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमेवरचा कांही भाग दोन्ही देश आपापल्या नकाशात दाखवतात. प्रत्यक्षात त्यातल्या कांही भागात कोणीच वस्ती करू शकत नाही. आज तो कोणाच्या ताब्यात आहे ते नक्की सांगता येणार नाही. अशा जागेवर फक्त जंगलचा कायदा चालतो. त्यातल्या त्यात थोडे सौम्य हवामान असलेल्या मोक्याच्या जागी राहुट्या बांधून कांही सैनिकांच्या तुकड्या तिथे मुक्काम ठोकतात आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत असतात. शत्रूने देशाच्या आंतपर्यंत शिरू नये याची खबरदारी घेण्यासाठी हे जरूरीचे असते.
या सगळ्या गोष्टींची जाणीव हळूहळू होत गेली, सीमेवरील भागात रस्तेबांधणी आणि विकासाची कामे झाली, त्या भागातली गस्त वाढली आणि १९६२ च्या युध्दात झालेल्या मानहानीचे शल्य मनातून फिकट होत गेले, तसतशी चिनी लोकांबद्दल मनात बसलेली आढी सौम्य होत गेली. त्यानंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात त्या युध्दाची आठवणदेखील असणार नाही. त्यामुळे ती अधिक मोकळेपणाने विचार करू शकते.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

चीन, चिनी आणि चायनीज


बीजिंग येथे चालू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवाचा अतिभव्य उद्घाटनसोहळा पहात असतांना नकळतच मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे मागे जात होते. आमच्या लहान गांवात पंजाबी किंवा तामिळ माणूससुध्दा पहायला मिळत नव्हता तिथे चिनीजपानी कोठून दिसणार? रात्रीची गस्त घालणारे एक दोन गुरखे होते, त्यांचे चेहेरे पाहून मंगोलियन वंशाच्या लोकांबद्दल थोडी कल्पना येत असे. गोष्टींच्या पुस्तकांमधल्या चिनी लोकांचे बसके चेहेरे, मिचमिचे डोळे, फुगीर गाल, नकटे नाक, डोक्यावरचा अंबाडा, विचित्र दाढीवर लोंबत्या मिशा, पायघोळ लोळणारे कमालीचे ढगळ कपडे वगैरेंनी बनलेले त्यांचे 'ध्यान' पाहून गंमत वाटत असे. त्यांची लिपी पाहून ते चित्र आहे की अक्षर याचा संभ्रम पडे, प्रत्येकी दहा बारा शेंड्या आणि शेपटे असलेले प्रत्येक अक्षर एक वेगळी कलाकृती वाटे आणि अशी किचकट अक्षरे काढून कांहीही लिहायला किती वेळ लागत असेल याची कल्पना करवत नसे. कदाचित त्यामुळेच कागदावर कांही लिहिण्यापेक्षा त्याचा पतंग करून तो उडवणे अनेकांना अधिक आवडत असावे. 'च्याओ, म्याव' किंवा 'लिंग, पिंग' असली त्यांची नांवे वाचून ते पुरुषाचे असेल की बाईचे ते समजत नसे, कदाचित ते त्यांच्या गांवाचे किंवा खाद्यपदार्थाचेदेखील असण्याची शक्यता असे. कावळे-चिमण्या, उंदीर-मांजर, साप-विंचू असले कसलेही जीव ते सरसकटपणे जेवणात खातात हे ऐकल्यावरच कसेसे वाटून पोटात ढवळत असे. अशा या मुलखावेगळ्या चिनी लोकांच्याबद्दल मनात नेहमीच एक गूढ वाटत असे.
घरातल्या कपबशा 'चिनी' मातीच्या असत. त्यामुळे या पीतवर्णी लोकांच्या देशातली मातीसुध्दा पांढरी असते की काय असा प्रश्न पडे. पुढे भूगोल शिकतांना तिथेही सुपीक प्रदेश आहेत आणि त्यांवर चांगल्यापैकी भातशेती होते वगैरे वाचले. आपल्या भारताच्या अडीचपट क्षेत्रफळ असलेला हा देश अस्ताव्यस्त पसरलेला आहे, लोकसंख्येच्या बाबतीत तर तो जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण एवढ्या विस्तीर्ण भूभागावर राहणारी इतकी सारी माणसे एकच भाषा बोलतात याचे प्रचंड आश्चर्य वाटत असे. आपल्याकडे वीसबावीस वेगवेगळ्या भाषा आहेत आणि प्रत्येकीच्या दहाबारा तरी बोली बोलल्या जातात. आज शिक्षणाच्या प्रसारामुळे नागपूर, कोल्हापूर आणि डहाणूकडचे लोक एकच प्रमाण मराठी भाषा वेगवेगळे हेल काढून बोलतात, पण दर पंधरा कोसांवर भाषा बदलते अशी जुन्या काळातली समजूत होती. चिनीमध्येसुध्दा अशा अनेक बोली असतील, पण एकच भाषा देशभरात सगळीकडे पसरवली गेली हे कौतुकाचे आहे.
भारताप्रमाणेच चीनलासुध्दा हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे या साम्यामुळे एक प्रकारची आपुलकी वाटत असे. आपल्या गौतमबुध्दाच्या शिकवणुकीचा चीनच्या लोकांवर प्रभाव पडलेला आहे हे वाचतांना कॉलर ताठ होत असे. पण सर्वभक्षी चिनी लोकांनी अहिंसेचा उपदेश करणा-या गौतमबुध्दाचे कोणते विचार घेतले असतील ते कांही समजत नसे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे युरोपियन लोकांनी चीनच्या किनारपट्ट्यांवरचा थोडा मुलुख आपल्या ताब्यात घेऊन त्यांवर वसाहती बांधल्या होत्या आणि दुस-या महायुध्दाच्या काळात थोड्या दिवसांसाठी जपान्यांनी चीनचा बराच मोठा प्रदेश काबीज केला होता तेवढे अपवाद वगळता चीन हा देश नेहमी स्वतंत्रच राहिला. रेशमाची वस्त्रे, कागद, सुरुंगाची दारू अशा अनेक वस्तू चीनने जगापुढे आणल्या असे सांगतात. चीनबद्दलची सर्वात अधिक प्रसिध्द असलेली गोष्ट म्हणजे चीनची हजारो मैल दूर पसरलेली ऐतिहासिक भिंत. डोंगर द-या पार करत जाणारी एवढी लांबलडक भिंत यांत्रिक साधने नसतांनाच्या काळात माणसांच्या श्रमातून उभी केली गेली आणि ती इतकी मजबूत आहे की अजूनपर्यंत टिकून राहिली आहे. एकंदरीतच चीनबद्दल कुतूहल वाटत असे आणि त्या मानाने फारच थोडी माहिती मिळायची. त्यामुळे " या बांबूच्या पडद्याआड दडलंय काय?" असा प्रश्न मनात रेंगाळत असे.
पंडित नेहरूंच्या परराष्ट्रधोरणात त्यांनी चीन या शेजारी देशाला खूप महत्व दिले होते. भारताला ब्रिटीशांकडून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असल्यामुळे वसाहतवादी पाश्चिमात्य देशांपासून त्याने अंतर बाळगणे साहजीकच होते. आकारमान, वैविध्य, नैसर्गिक रचना आणि त्यातून येणारी संकटे वगैरे अनेक बाबतीत भारत व चीन या दोन देशात बरेच साम्य असल्यामुळे त्यांना एकमेकांची मदत घेता येईल असा कयास त्यांनी बांधला असणार. या दोन्ही देशांतील लोकांनी इतिहासकाळात सुवर्णयुगे पाहिलेली असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन नव्या युगात चमत्कार घडवावा असे मनातले मांडे ते खात असावेत. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मिळून 'पंचशील' या नांवाने कांहीतरी केले होते. तो एक करार होता की ती एक विचारसरणी होती ते त्या वेळी मला समजले नव्हते. पंडित नेहरूंना अभिप्रेत असलेला समाजवाद आणि माओचा साम्यवाद यातला फरक कळण्याचे माझे वय त्या काळी नव्हते. एकंदरीत 'हिंदी चीनी भाई भाई' ही घोषणा त्या काळात लोकप्रिय होती.
असे सुरळीत चालले असतांना काय झाले कोणास ठाऊक चीनने भारतावर लष्करी आक्रमण केले असल्याची बातमी आली आणि सगळीकडे हलकल्लोळ उठला.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

गणेशोत्सव आणि पर्यावरण - ५


दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांची संख्या वाढते आहे, तसेच त्यात बसवण्यात येणा-या मूर्ती व त्यांची सजावट यांच्या आकारांचाही विस्तार होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे नवनवे पदार्थ, उपकरणे आणि प्रक्रिया यांचे पंख कलाकारांना लाभले असल्यामुळे आपल्या कल्पकतेच्या बळावर ते कलाविश्वात स्वैर भरा-या मारू लागले आहेत. त्यांचे अद्भुत आणि मोहक कलाविष्कार पहातांना कधीकधी भान हरपायला होते. अनंत देव्हा-यांमध्ये आसीन झालेल्या मंगलमूर्तीची कोटी कोटी रूपे यांतून पहायला मिळतातच, शिवाय पौराणिक कथा, ऐतिहासिक प्रसंग व सामाजिक समस्या अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे मनोहर देखावेसुध्दा यात उभे केले जातात. सर्व प्रेक्षकांना या कलाकृती आनंदाबरोबर माहिती व बोधही देतात. कोणाला त्यातून स्फूर्ती मिळते तर कोणाला कल्पना सुचतात. प्रसिध्द चिनी तत्ववेत्ता कॉन्फ्यूशियस याच्या शब्दात सांगायचे झाल्यास कारीगरांना त्यातून भाकरी प्राप्त होते व ते त्यावर जीवंत राहतात आणि दर्शकांना असे फूल गवसते की ज्याला पाहून त्याला जीवनाचे प्रयोजन समजते. सगळे लोक कदाचित इतका सूक्ष्म विचार करत नसतीलही पण त्यांच्या नकळत ते घडतच असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्याने केलेली आरास ही समाजाला अनेक दृष्टीने उपकारक आहे यात शंका नाही. इतर प्रसारमाध्यमातून कधी कधी दिसून येणारा गलिच्छपणा किंवा ओंगळपणा याची बाधा गणरायाच्या दरबाराला अजून तरी झालेली नाही.
नवनवीन दृष्ये दाखवणारे गणेशोत्सवाचे मंडप पाहतांना महिनोमहिन्यांच्या परिश्रमातून साकारलेले हे देखावे आठदहा दिवसानंतर नष्ट करण्यात येणार आहेत हा विचार अस्वस्थ करतो. यातील निवडक देखावे एकाद्या विशाल सभागृहात ठेऊन त्याचे लंडनच्या मादाम तुसाद म्यूजियमसारखे संग्रहालय करता येईल असेही वाटते. पण त्यातील सर्वात महत्वाच्या स्थानी असलेल्या गणेशाचे तर विसर्जन करायचे असते. शिवाय आपल्याकडे एवढ्या तेवढ्या कारणांवरून कोणा ना कोणाच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यातून निषेध, दंगेधोपे आणि हिंसाचाराचे सत्र सुरू होते या बातम्या वाचल्यानंतर मनातला तो विचार मागे पडतो.
एकदा उत्सव संपला की या सगळ्यांचे स्वरूप अमूक इतके टन किंवा घनफूट प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल एवढेच उरते आणि ते पर्यावरणाच्या स्वाधीन केले जाते. यालाच पर्यावरणाप्रेमी लोकांचा आक्षेप आहे. त्यापासून कोणकोणते दुष्परिणाम होण्याची शक्यता असते ते या लेखाच्या पहिल्या भागात मी सांगितले आहे आणि त्यावर सुचवलेले उपाय कोणते आहेत हे मागील भागात दिले आहे. ते कां अंमलात येत नाहीत ते या भागात पाहू.
कोणताही नवा पदार्थ उपयोगात येण्यापूर्वी त्याचे गुणधर्म, उपलब्धता, उपयुक्तता आणि मूल्य यांचा विचार केलेला असतो. यात जो सकस ठरतो तो टिकतो आणि जुन्या तत्सम पदार्थाची जागा घेतो हा जगाचा सर्वसाधारण नियम आहे. ऑटोरिक्शा आल्यामुळे अनेक टांगेवाल्यांचा धंदा बसला आणि साखरेच्या आगमनानंतर अनेक गु-हाळे बंद पडली ही त्याची उदाहरणे आहेत. या गोष्टींना इलाज नाही कारण आपण कालचक्र उलट फिरवू शकत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल यांच्या ऐवजी कागदाचा लगदा आणि पुठ्ठा वापरणे लहान प्रमाणात शक्य होईल पण आज जे भव्य देखावे तयार केले जात आहेत ते या माध्यमातून शक्य होणार नाही. त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा थर्मोकोल न वापरणे याचा अर्थ या प्रकारच्या कलाकृती निर्माण न करणे असाच होईल. त्यापासून समाजाचे जे फायदे होतात ते मिळणार नाहीत त्यामुळे तो उपदेश मान्य होणार नाही. तेंव्हा हे करूच नये असा नकारत्मक विचार न करता त्यातून होणारे संभाव्य तोटे कसे कमी करता येतील यावर विचार व्हायला हवा.
असा विचार वेगळ्या कारणांमुळे आधीपासून होत आला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पुण्याच्या मुळामुठा या नद्यांच्या उथळ पात्रात मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन करणे शक्य नाही. त्या मूर्ती वाजत गाजत नदीच्या तीरापर्यंत नेऊन परत आणल्या जातात. मुंबईला समुद्रकिनारा असल्यामुळे अथांग सागर सगळे समाविष्ट करून घेईल असेच कोणालाही वाटेल. पण प्रत्यक्षात त्यात विसर्जित केलेल्या ब-याचशा मूर्तींना तो भग्न स्वरूपात किना-यावर आणून सोडतो. ते दृष्य हृदयविदारक असते आणि अनिरुध्द अकॅडमीसारख्या सेवाभावी संस्थांचे हजारो स्वयंसेवक विसर्जनाच्या दुस-या दिवशी किना-यांची सफाई करून त्यात वाहून आलेल्या मूर्तींचे पुनर्विसर्जन करतात. अशा गोष्टी समजावून सांगून समाजाच्या मनाची तयारी केली तर पुण्याचे उदाहरण मुंबईत गिरवता येण्यासारखे आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि थर्मोकोल हे पदार्थ कांही गणेशोत्सवासाठी मुद्दाम शोधले गेलेले नाहीत. अनेक प्रकारच्या उद्योगव्यवसायात त्यांचा उपयोग सर्रास मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यांचे पुढे काय होते? अशा प्रकारच्ये पदार्थ इतर कच-यापासून बाजूला काढून त्याची व्यवस्थित रीतीने विल्हेवाट लावणे हे नगरपालिकेचे काम आहे आणि ते करण्याचे प्रयत्न बृहन्मुंबईसह जगभरातल्या सगळ्या नगरपालिका करत आहेत. त्याच तंत्रांचा वापर थोड्या निराळ्या पध्दतीने करून गणेशोत्सवातून तयार होणारे हे निर्माल्य पर्यावरणाला कसे अपायकारक ठरणार नाही यासाठी काय करता येईल हे पाहिले पाहिजे आणि सुदैवाने तसा विचार होतही आहे. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये आजकाल सारा भर एकाच प्रकारच्या प्रचारात दिला जात असल्यामुळे "गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण" आणि म्हणून "ते पर्यावरणाच्या विरोधी" अशी समीकरणे मांडली जात आहेत ती पूर्णपणे बरोबर नाहीत आणि समाजाला मान्य होणारी नाहीत.
या निमित्याने पर्यावरणाकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आणि रोजच्या जीवनात केले जाणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न तिने आपण होऊन केला तरी त्यातून बरेच कांही साध्य होईल.
. . . . . . .. (समाप्त)