Friday, May 02, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग २)

माझ्या विचारावर खालीलप्रमाणे एक प्रतिक्रिया आली.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील सिध्दांतांचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. ( म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे काय सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि संपन्न
स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वज तसे असतीलच!
६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.

वर वर पाहता यातला युक्तीवाद कोणाला बिनतोड वाटेल. अशा प्रकारचा प्रचार अनेक माध्यमातून विशेषतः सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांमध्ये सतत चाललेला असतो आणि बरेच लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे त्यावर योग्य दिशेने विचार करणे गरजेचे आहे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: